चित्रे गेले

ऑटम


माझ्या तळहातावर पडतो सूर्यास्ताचा ठसा

सर्व झाडांची पानं चरत जाणारं नाजूक ऍसिड

शिशिरातल्या संध्याप्रकाशाचं

पुसून टाकतं तीव्र रेषा


आता मी इतका पोखरला गेलोय

बासरीसारखी भोकं पडून आपसूक अंगाला

फक्त वारा सुटायचा बाकी आहे

पानगळीपलिकडचं संगीत ऎकू यायला


आणि तू मात्र अनिमिष इथे, नदीकाठी,

पाण्यात गाढ झोपलेल्या लव्हाळ्यासारखी

आकाशाचं प्रतिबिंब पांघरुन

मोसमाची आच न लागता

तरीही त्याच्याच मुशीत



- दिलीप चित्रे




चित्रे गेले. विंदांच्या भाषेत सांगायचं तर पंचमहाभुतातल्या भुतासारखी कविता मागे ठेवून गेले. तुकारामांनी विमान पाठवलं नाही याचं नवल करावं की त्यांच्या कविता बुडणार नाहीत याची व्यवस्था केली असेल याचं कोडं सोडवावं येव्हढाच प्रश्न!


मटात आलेली ही त्यांची ताजी मुलाखत

मराठी कवितेला आगळ्या उंचीवर नेणारे ज्येष्ठ कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा ७०वा वाढदिवस गेल्या आठवड्यात मुंबईत साजरा झाला. त्यावेळी पोएट्रीवाला आणि अभिधानंतर प्रकाशनातर्फे त्यांच्या एकूण कविता १, २ व ३ मधील निवडक कवितांचा त्यांनी स्वत: केलेला इंग्रजी अनुवाद 'शेष' प्रकाशित झाला. याप्रसंगी दिपुंशी केलेली बातचीत-
तुमच्या कवितेने आता जागतिक कवितेत महत्त्वाचं स्थान निर्माण केलंय, तुम्हाला काय वाटतं ?

- जागतिक कविता असा काही प्रकार नसतो. तो फक्त शाब्दिक भ्रम आहे.

मग तुम्ही तुकाराम इंग्रजीत आणून त्याला जागतिक पातळीवर नेला, असं का म्हणता?

- जे युरोपियन, अमेरिकन साहित्य होतं त्याला जागतिक साहित्य मानलं गेलं. पण या समजाला धक्का देणारं आणि उच्च दर्जाचं जगात अन्यत्रही आहे. त्या साहित्याच्या मर्यादा तोडणारी आपली ताकदवान काव्य परंपरा आहे हे सिध्द करण्यासाठीच मी तुकाराम इंग्रजीत आणला. त्यामुळे मी जागतिक साहित्य म्हणून कुठल्या साहित्याकडे पाहात नाही. तौलनिक साहित्य म्हणून पाहतो.

तुमच्या अलीकडच्या कविता वेगळ्या आहेत आणि सोप्याही आहेत. कवी शेवटी शेवटी सोपेपणाकडे येत जातो का, जसे कोलटकर आणि ढसाळ आले?

- हे सांगणं अवघड आहे. ते त्या कवीवर अवलंबून आहे. कोलटकरांची कविता वेगळी होती. नामदेव ढसाळ सोपा झाला पण तो पूवीर् जी जटिल कविता लिहायचा तिच्यातली ताकद आता हरवून बसला. पण कविता सोपी का व्हायला हवी? कवी म्हणजे मास्तर नव्ह,े प्रत्येक गोष्ट सोपी करून सांगायला. कवीने कठीण होऊनच वाचकांसमोर यायला हवं. वाचकाने त्या कठीणपणाचा सामना करायला हवा. तरच त्याच्या पदरात काही पडणार आहे.

म्हणजे वाचकाने नक्की काय करायला हवं?

- कवी जिथून आला आहे तिथवर वाचकाला स्वत:ला घेऊन जावंच लागेल. त्याची पाळंमुळ खणावी लागतील. वाचकाला जसा हवा तसा तो कधीच समोर येणार नाही. कवीला वाचकाने भिडायला हवं.

आजच्या कवितेबद्दल तुमचं मत काय आहे?

- आजची पिढी स्वत:चं कविता मुद्दाम सोपी करून मांडते आहे, असं मला वाटतं. ग्लोबलायजेशनला प्रतिक्रिया म्हणून, मांडणी केली जाते आहे. हे बरोबर नाही.

एकूणच मराठी कविता आणि तुमची स्वत:ची कविता पुढे गेलीय, असं तुम्हाला नाही वाटत?

- कविता पुढे वगैरे काही जात नसते. कवीही आपल्या जागीच असतो. कविता स्वत:तच मोठी किवा लहान होते. ग्रामीण कविता, नैसगिर्क कविता, आत्मनिष्ठ कविता असे कवितेचे जे कप्पे पाडतात तेही मला मंजूर नाहीत. वेगवेगळ्या वादांमध्ये साहित्याचे तुकडे पाडता येत नाहीत. हा अकॅडेमिक सोयीसाठी केलेला उपद्व्याप आहे. आता देशीवादाचं घ्या. देशीवादाचे समर्थक भालचंद नेमाडे ते जमिनदारीच्या पार्श्वभूमीतून आले. जसे रवींदनाथ टागोरही जमिनदार होते. कदाचित म्हणूनही नेमाडेंना टागोर अध्यासन मिळालं असेल. दुदैर्वाने नेमाडेंच्या अजूनही हे लक्षात आलं नाही की जमिनीचा मालक कधीही जमिनीवर राबत नाही.

नामदेव ढसाळांनी म्हटलंय की यानंतरची तुमची कविता लोकसंगीताकडे, खऱ्याखुऱ्या लोकभाषेकडे वळेल.

- नामदेव ज्यातिषी कधीपासून झाला हे मला माहीत नाही. माझ्या कवितेचा पुढचा टप्पा काय असेल हे मलाही सांगता येणार नाही. कोणी सांगावं, कदाचित या टप्प्यावर ती पूर्ण थांबेलही.

भुजंग मेश्ाामची कविता मराठी कवितेचे महत्त्वाचे टप्पे ओलांडून, नामदेवच्याही पुढे गेलेली कविता आहे, असं विधान अलीकडे कवी चंदकांत पाटील यांनी केलं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

- ते मूर्खपणाचं आहे. नामदेवने कवितेला पहिला दलित आवाज दिला तो फक्त रडगाणी गाण्यासाठी नाही. घोषणांसाठीही नाही. त्याच्या कवितेत एक हायपर रिअलिझम (परम वास्तववाद) होता. माणसांच्या भोवतालाचं अख्यानच त्याने उभं केलं. नामदेव खूपच मोठा आणि महत्त्वाचा कवी आहे. संत तुकाराम आणि नामदेव ढसाळसारख्या कवींमध्ये मुळातच अराजक असते, तेच त्यंाच्या काव्याला महान बनवतं. विसाव्या शतकातील पाच मोठया कवींपैकी नामदेव एक आहे. भुजंगची कविता वेगळी आहे. पण तो शब्दांचे फार खेळ करतो असं मला वाटतं.

तुम्ही तुकारामाकडे बहुजनवादी अंगाने बघता का?

- नाही, तुकारामाकडे तसं बघता येणार नाही. त्याला कुठल्याही वादात अडकून ठेवता येणार नाही. तो खूप उंच आहे. वैश्विाक आहे. काही लोकांनी मात्र तुकारामाचा गैरवापर केला आहे. साताऱ्याचे विचारवंत आ. ह. साळुंखे यांचं नाव घेता येईल. त्यांनी फक्त ब्राम्हण-ब्राम्हणेतरवादासाठी तुकारामाचा वापर केलाय. सदानंद मोरंेसारखे विचारपूर्वक लिहिणारे संशोधक तुकारामांच्या घराण्याच्या परंपरेतून पुढे आले आहेत, ही मात्र त्यातही आनंदाची गोष्ट आहे.

Comments

HAREKRISHNAJI said…
चित्रे कधी वाचलेच नाही, काहीतरी राहुन गेले
Megha said…
chitre gelyacha kalach MATA madhe vachala...mala vatalach hota tuza post yeilach mhanun..kavita changali dilis pan ajun jastichi apeksha hoti....
a Sane man said…
:(

"म्हणजे वाचकाने नक्की काय करायला हवं?

- कवी जिथून आला आहे तिथवर वाचकाला स्वत:ला घेऊन जावंच लागेल. त्याची पाळंमुळ खणावी लागतील. वाचकाला जसा हवा तसा तो कधीच समोर येणार नाही. कवीला वाचकाने भिडायला हवं.

आजच्या कवितेबद्दल तुमचं मत काय आहे?

- आजची पिढी स्वत:चं कविता मुद्दाम सोपी करून मांडते आहे, असं मला वाटतं. ग्लोबलायजेशनला प्रतिक्रिया म्हणून, मांडणी केली जाते आहे. हे बरोबर नाही."

sahi na?