कलावंताचं मरण

परवाच्या पेपरमध्ये पेरुमल मुरुगन नामक कुणा तामिळ लेखकाच्या मरणाची बातमी होती. लेखक हा माणूस असल्यानं तो कधी तरी मरणारंच त्यामुळे त्या बातमीत तसं विशेष काही नव्हतं. फक्त फरक इतकाचं की त्या लेखकानं स्वतःच्या मरणाची बातमी स्वतःच जाहीर केली होती, निमित्त होतं कुठल्याशा संघटनेनं जातीची बदनामी केली म्हणून त्याच्या पुस्तकाची होळी केली आणि पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी यशस्वीरित्या पदरात पाडून घेतली. त्यामुळे विषण्ण अवस्थेत त्या लेखकानं स्वतःच्या मरणाची घोषणा केली. ही फार खिन्न करणारी बातमी आहे.

या बातमीच्या २-३ दिवस आधी फ्रांसमध्ये प्रेषिताची खिल्ली उडवणारी चित्रं काढली म्हणून अत्यंत निघृणपणे दिवसाढवळ्या व्यंगचित्रकारांचे मुडदे पाडले गेले आणि जगभर अस्वस्थतेची लाट पसरत गेली.

कलावंताचं मरण इतकं स्वस्त असतं का? एक लिहीता माणूस म्हणून मला या आणि अश्य़ा बऱ्याच घटना अस्वस्थ करताहेत. जेव्हा एखादा कलावंत एखादी कलाकृती निर्माण करतो तेव्हा त्याच्या अस्तित्वाचा एक तुकडा काढून तो त्या कलाकृतीत ओतत असतो. प्रतिभेच्या प्रत्येक निराकार हुंकाराला मुर्त रुप देताना, ज्या आत्मक्लेषातून, ज्या मांडणीसुत्रातून कलावंत जात असतो, तो कुठल्याही कायाकल्पाहून कमी नसतो. त्याचं मोल होऊ शकत नाही. तरीही त्याच्या निर्मितीवर समाज मालकीहक्क सांगतो. समाजमनाच्या विरोधात किंवा प्रचलित समजांच्या विरुद्ध कधी कुणी काही कलाकृती निर्माण केलीच तर त्यावर बंदीची भाषा बोलली जाते. प्रत्येक बंदीगणीक, जग त्या कलाकाराला थोडं थोडं मारत जातं हे एकाद्याचा थंडपणे खुन करण्यासारखंच आहे हे आपल्याला लक्षात येतय का?

व्यक्तीस्वातंत़्र्याचं आणि त्याहूनही महत्वाचं, व्यक्त होण्याच्या स्वातंत़्र्याचं, मला दोन्ही हातांनी खरं तर भरभरुन स्वागत करता यायला हवं. या आणि अश्या बऱ्याच बंद्यांच्या विरुद्ध कंठशोष करुन मलाही घोषणाबाजी करता यायला हवी. पण हे होत नाही...पण हे होत नाही म्हणूनही मला अस्वस्थ व्हायला होतय. उदारमतवादी आणि कट्टर माणसं जशी दोनच रंगाच्या चष्म्यातून जग बघतात, तसं मला बघता येत नाही.

कट्टर लोकांना वाटतं माझ्या धर्माला, देशाला, जातीला इ. इ. कुणीच नावं ठेवता कामा नये. अश्या सगळ्या एन्टीटी ह्या कोणत्याही परिक्षणापल्याडच्या आहेत, त्या ब्रम्हवाक्य आहेत आणि त्याविरुद्ध एक शब्दही उच्चारणं म्हणजे घोर पातक आणि त्याला शिक्षाही एकच- बंदी/फतवा/शिरच्छेद/खुन इ. इ. अश्या लोकांबरोबर कोणतही तार्कीक संभाषण होऊ शकत नाही कारण त्यांनी चर्चेच्या आधीच निकाल ठरवुन ठेवलेला असतो.

किंचित ते पुर्ण उदारमतवादी, ज्यात मोठ्या प्रमाणात आपण कलावंतांची, रसिकांची, समिक्षकांची गणना करु, ते या कट्टर लोकांना यथासांग नावे ठेवित राहातात, त्यात नवीन काहीच नाही. कट्टरांच्या विरुद्ध उदारमतवाद्यांची मते. त्यांना "पुर्ण स्वातंत्र्य" हवे, संभाषणाचे, व्यक्त होण्याचे, टीका करण्याचे इ.इ. सर्व श्रद्धांना, धर्मांना आणि धर्मग्रंथांना, देशाच्या कल्पनांना, जातीत रुजलेल्या प्रथा आणि कुप्रथांना, रुढी-प्रथांना त्यांना नागडं करुन तपासायचं असतं.

या दोन्ही गटांनी त्यांची समिकरणे मांडताना, हल्ली संशोधनात करतात तसं, आपलं ते गृहीतक आणि इतर जे जे, ते स्थिर समजण्याचा सोईस्कर समज करुन घेतला आहे. कट्टर लोक उदारमतवाद्यांचं अस्तित्वच संपवण्याच्या मागे असतात आणि उदारमतवादी सगळं जगंच उदारमतवादी आहे असं समजुन वागतात. बातम्यांच्या प्रचंड गर्दीत, टीपेला गेलेल्या चर्चेच्या गुऱ्हाळात, ट्वीटर, फेसबुक इ. सोशलमिडीयातून पुर्ण जगाला केवळ या दोन भागात वाटण्याचा एक प्रचंड दबाव निर्माण केला जात आहे. कनिष्ठ बुशांनी म्हटल्याप्रमाणे दोन्ही बाजुंनां असं ठामपणे वाटतं की तुम्ही माझ्या बाजुने नसाल तर तुम्ही माझ्या शत्रुच्या बाजूने आहात. हे कुठल्या तरी टोकाला जाणं दुर्दैवी आहे.

मी सलमान रश्दीचं सॅटनिक व्हर्सेस पुर्ण वाचलेलं नाही. रश्दी हा एक सामान्य कुवतीचा लेखक आहे असं समिक्षक म्हणतात ते मला बऱ्याच अंशी पटतं. केवळ पुस्तक गाजवण्यासाठी कुणी जेव्हा मुस्लीमांना पवित्र काही व्यक्तींची नावं त्या पुस्तकातल्या वेश्या-भडव्यांच्या पात्राला देतं, तेव्हा कलावंताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा दुय्यम होऊन जातो. आणि तरीही रश्दींचा वध करण्याचा फतवा अजिबात समर्थनिय होत नाही, कणभरही नाही-क्षणभरही नाही.

मी शार्ली एब्दोचा वाचक नाही. असं काही प्रकाशीत होतं हे ही मला माहीत नव्हतं. पण फ्रांसमधल्या हत्याकांडानंतर जी काही शार्ली एब्दोची व्यंगचित्रं पाहाण्यात आली, ती कुठल्याही अर्थाने मला निखळ विनोदी वाटली नाहीत, त्यात एक रुडनेस होता, एक क्रुर थट्टा होती. एक कट्टरवादाला संपवण्यासाठी कट्टरवादाच्या दुसऱ्या टोकाला जायची तयारी होती. आणि तरीही शार्ली एब्दोच्या हत्याकांडाचं कसलही समर्थन होऊच शकत नाही.

मकबुल हुसेन ही भारतातल्या चित्र इतिहासातली ठसठसती जखम आहे. कुठल्याही संवेदनशील कलावंताच्या आणि रसिकाच्या मनात ही जखम कायमची भळभळती राहील. पाश्चिमात्य संस्कार नाकारुन या मातीतली अस्सल चित्र काढणाऱ्या एका मनस्वी वेड्याला आपण निर्वासित केलं, त्याला मृत्युनंतर त्याच्या देशाची मातीही मिळु दिली नाही. ज्यांच्या मनाची वीण कलाकाराच्या प्रतिभेशी रेझोनेट होते, त्यांनाच यातल्या वेदना समजु शकतात. आणि तरीही हुसेनंनी काढलेल्या सीता-हनुमान चित्राबद्दल दुर्गाबाई भागवतांनी मांडलेला विचारही तेव्हढाच महत्वाचा ठरतो. ’पंढरपुरात राहीलेल्या, हिंदु संस्कृती-समज पुर्णपणे समजुन असलेल्या हुसेनंनी सीता-हनुमानाच्या नात्याचं जे चित्रण केलं, ते पुर्णपणे विकृत, प्रसिद्धीलोलूप आणि म्हणूनच असमर्थनिय ठरतं.’

कलाकार हा एकाच वेळी पुर्णपणे स्वतःच्या कोषात आणि समाजाच्या चौकटीत असतो. त्याचे कोष त्याच्या विचारांना उन्मुक्तपणे व्यक्त करण्याचे अवकाश देतात तर समाजाच्या चौकटी त्याला काही नियमात बसवु पाहातात. जगात संपुर्ण/एबसोल्युट स्वातंत्र्य असं काही नसतं हे जसं कलावंतांनी समजुन घ्यायची गरज आहे तसंच कलावंताच्या व्यक्त होण्याच्या निकडीची समजानं कदर करण्याचीही गरज आहे. ही तडजोड नाही तर हा एक दोन घटकांचा वितळणबिंदु आहे. अस्सल प्रतिभावंत, चुष म्हणून नव्हे, सवंग प्रसिद्धीसाठी नव्हे, तर कलाकृतीची गरज म्हणून जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही तरी निर्मिती करतो तेव्हा ती सगळ्या विरोधांना पुरुन उरते. जगभरातले रसिक अश्या कलाकृतीच्या आणि कलावंताच्या मागे कधीनंकधीतरी ठाम पणे ऊभे राहातात हा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि म्हणूनच भविष्यही आहे. चर्चच्या इतिहासात चित्रकारांची, लेखकांची, कवींची गळचेपी झाली म्हणून त्यांनी चर्चमान्य चित्रातून गुप्त संदेश चितारले, शब्दांच्या मुखवट्याआडून स्वतःला जे सांगायचे तेच लिहीले आणि आज त्यांचे नव्याने परिक्षण होत आहे. जगभरात जेव्हा इंटरेनेट क्रांतीमुळे देशांच्या सीमा अर्थहीन होताहेत, तेव्हा या स्वातंत्र्याचा जसा गैरफायदा कट्टरपंथीय घेताहेत तसाच प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्या कलावंतानाही होईल/ होतो आहे. कुठल्याही सर्वमान्य सीमेत स्वतःला बांधून न घेता, त्यांना स्वतःला व्यक्त करता येईल. प्रश्न आहे तो त्यांच्या इंटेटचा.

 

ताजा कलम: इसिस संघटनेनं नुक्तीच कुठेतरी ७०,००० पुस्तकं जाळून टाकली असं ट्वीटरवर वाचण्यात आलं. खिलजीनं नालंदा विद्यापिठातली असंख्य पुस्तकं जाळून टाकली होती त्याचीच पुनरावृत्ती त्याच्या वंशजांनी केली...
 


Comments

mad-z said…
माणूस ... मग तो सो कॉल्ड उदारमतवादी असो की कट्टर असो किंवा तटस्थ असो ... जोवर इतरांच्या भावना समजून घेवून वागणार नाही तोवर हे असंच चालणार. माझेच विचार आणि माझीच श्रद्धा मोठी आणि एकमेव अन् बाकी सगळे non existing अशा भावनेत आपण फक्त शत्रूच जमा करू. बाहेर कशाला जा ... हिंदू मुसलमान तंटा देखील त्याच कारणाने. एक साधा सिनेमा देखील आपण सहन करू शकत नाही.
Raj said…
अस्सल प्रतिभावंत, चुष म्हणून नव्हे, सवंग प्रसिद्धीसाठी नव्हे, तर कलाकृतीची गरज म्हणून जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही तरी निर्मिती करतो तेव्हा ती सगळ्या विरोधांना पुरुन उरते.>>
Well put. Freedom of expression is most important in any democracy. What happened in case of Murugan is unfortunate and shd be stopped.
And violence in any case is not justified, no matter what the cause.

In case of Charlie Hebdo, the intention behind the cartoons and the impartial French laws
towards minorities are two imp points that most people either forget or conveniently overlook.
Samved said…
I agree Raj, people are a hurry to prove their sides now a days and world according to them is binary
Samved said…
Thats one of reasons Dinesh but honesty speaking its too complicated to write just a post
तुझ्या या पोस्टची इथे (http://aisiakshare.com/node/3650#comment-86229) झैरात केली आहे. काही लोकांचे काही आक्षेपही आहेत. बघ.

मला रुचीचं म्हणणं मान्य आहे. मी व्हर्सेस वाचलेली नाही, तरीही. कुणीही काहीही टोकाचं, कितीही वाईट, कोणत्याही उद्देशानं लिहिलं; तरीही त्याच्या खुनाचं समर्थन होऊ शकत नाही. किंबहुना त्याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात त्यानं लिहिलेली / व्यक्त केलेली / चितारलेली गोष्ट चांगली होती की वाईट हा मुद्दाच मुळी गैरलागू आहे. तो निघणं मला चिंताजनक वाटतं.
Samved said…
मेघना, धन्यवाद. प्रतिसाद वाचले, मी तिथल्या मुद्द्यांचं समर्थन किंवा प्रतिवाद करणार नाही. कारण अश्या फोरम मध्ये कडवट कंपु असतात, चांगले किंवा वाईट, ज्यात मला सामिल व्हायचं नाहीए, ना माझं तेव्हढं वाचन आहे की मी विविध संदर्भ वाचून वाद-प्रतिवाद करावेत. तरीही या इथे १-२ मुद्दे मांडतो
१) वाक्यांमध्ये काही अवकाश असतो, तो बाय डिझाईन किंवा अपघाती असु शकतो. वाचणाऱ्याच्या कल्पनाशक्तीवर आणि/ किंवा त्या लेखकाच्या लेखनशैलीशी असणाऱ्या ओळखीवर हा अवकाश कसा भरायचा हे अवलंबुन असतं
२) माझा absolute स्वातंत्र्य या प्रकारावर विश्वास नाही. कारण याचंच एक व्हरायंट म्हणजे चांगले अतिरेकी आणि वाईट अतिरेकी असं आहे. हे जेव्हढं हास्यास्पद आहे तेव्हढंच अमक्याचं पुर्ण स्वातंत्र्य चांगलं आणि तमक्याचं वाईट हे ही हास्यास्पद आहे
Samved said…
मेघना, धन्यवाद. प्रतिसाद वाचले, मी तिथल्या मुद्द्यांचं समर्थन किंवा प्रतिवाद करणार नाही. कारण अश्या फोरम मध्ये कडवट कंपु असतात, चांगले किंवा वाईट, ज्यात मला सामिल व्हायचं नाहीए, ना माझं तेव्हढं वाचन आहे की मी विविध संदर्भ वाचून वाद-प्रतिवाद करावेत. तरीही या इथे १-२ मुद्दे मांडतो
१) वाक्यांमध्ये काही अवकाश असतो, तो बाय डिझाईन किंवा अपघाती असु शकतो. वाचणाऱ्याच्या कल्पनाशक्तीवर आणि/ किंवा त्या लेखकाच्या लेखनशैलीशी असणाऱ्या ओळखीवर हा अवकाश कसा भरायचा हे अवलंबुन असतं
२) माझा absolute स्वातंत्र्य या प्रकारावर विश्वास नाही. कारण याचंच एक व्हरायंट म्हणजे चांगले अतिरेकी आणि वाईट अतिरेकी असं आहे. हे जेव्हढं हास्यास्पद आहे तेव्हढंच अमक्याचं पुर्ण स्वातंत्र्य चांगलं आणि तमक्याचं वाईट हे ही हास्यास्पद आहे