नाटकाला..एक "जाणं"

नाटकाला जाणं ही नाटका इतकीच एक सांस्कृतिक बाब आहे या निष्कर्षाला मी आता येऊन पोचलो आहे. सध्या मुळातच इतकी "विनोदी" नाटकं येताहेत की त्या विनोदांची दहशतच बसावी. त्यामुळे अशात नाटकाला जाण्याचा योग आला नसला तरी आपण आपल्या संस्कृतीचे पालन करत असुच या या आशे वर ही प्रस्तावना संपवतो.

माझ्या नाटक बघण्याचे मुख्यतः ३ टप्पे असावेत. गुलझारांना नमस्कार करुन पहीला फ्लॅशबॅक..

आठवतय तेंव्हा पासुन मी कलोपासकच्या नाटकांना जातोय. ही लातूरची एक मस्त संस्था आहे. बहुतेक प्राध्यापक मंडळींनी चालवलेली आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम दाखवणारी. इथे मी काय नाही पाहीलं? राजा ईडीपस, महानिर्वाण, शांतता कोर्ट चालु आहे... मराठीतील एकाहुन एक सरस नाटकं.

नुस्ती नाटकंच का? वा उस्ताद! होण्या अगोदरचा झाकीर! माझ्या आठवणीनुसार तो अल्लारखां सोबत आला असेल पहील्यांदा आणि जेमतेम २०-२२ वर्षांचा असेल. त्याचा एका बहीणीच्या शेजारी मी बसलेलो, खुप लहान असेन, बोटांनी ताल धरला होता. बरयाच वेळ ते बघून ती आईला म्हणाली " समज चांगली आहे. शिकवाल तर बरं"..हाय रे कंबख्त. उमज समज नसणार वय, शुन्यभर अक्कल आणि भिडस्तपणा या सदगुणांच्या बळावर मी ही संधी घालवली!
लातुरचे हे कार्यक्रम म्हणजे एक अफलातून प्रकार होता. कोणतही नाट्यगॄह नाही, सारं चालायचं ते open air ground किंवा एका मंगल कार्यालयात. पण लोक भारी रसिक आणि जाणते. त्यामुळे सारे कलाकारही उत्साहाने perform करायचे.
तर अश्या ठिकाणी नाटकाला जायची तयारी करायची म्हणजे नक्की काय? सर्वात आधी दादांना पटवून त्यांच्या सोबत कमीतकमी २ तास आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचणे, तिथे गाद्या घालू लागणे आणि सर्वात पुढच्या गादीवर स्वतः पासुन ते चपलां पर्यंत सगळं काही पसरवून जागा "book" करणे! माणुस हा कधीही समाधानी नसतो. इतक्या पुढे बसुनही हेवा वाटायचा तो वाजीद नावाच्या sound वाल्याचा. कारण तो स्टेजच्या पायरीवर बसून नाटक बघायचा. मोठ्ठा झाला की वाजीदच व्हायचं, पैसेही मिळतात आणि नाटकही जवळून बघता येतं असं माझं किती तरी दिवसांचं स्वप्न होतं.

पहील्या अध्यायाच्या तयारीतच दुसरा अध्यायही सुरु होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला शिवाजीला बालनाट्य बघणे. हा तसा लिमिटेड कार्यक्रम होता, सुट्टीपुरता. सिंड्रेला, हिमगौरी आणि ७ बुटके असली वेगळ्याच जगात घेऊन जाणारी नाटकं! त्यांचे भारी भारी सेट, त्यातल्या स्तिमीत करणारया जादु...सारं वेगळंच. पण तिथेही आमची वेगळी तयारी होतीच! खादाडी!!! नाटका इतकच खाणं हा त्या संस्कॄतीचा अविभाज्य भाग आहे हे मला तिथे पटलं. आपल्यावर नुसते नाटकवालेच नाही तर बाहेरच्या बटाटेवडावाल्यालाही पोसण्याची उच्च जबाबदारी आहे हे जाणवल्यावर कर्तव्याच्या ओझ्याखाली मी पार दबून गेलो. वेफर्स आणि पॉपकॉर्न ही उच्चवर्णीय खाद्यही खाणावळीत सहज सामावून गेली. आता त्या वेफर्स आणि पॉपकॉर्नचा किती आवाज येत असेल या कल्पनेनेपण लाज वाटते पण आता ऎकु येणारया मोबाईलच्या खणखणीत रिंगेपेक्षा तो आवाज जास्त पाचक होता.

आता मुख्य भाग. पुण्यात किंवा पार्ल्यात, गेला बाजार शिवाजीत (मोठा झाल्यावर) नाटक बघणे. कोणी जर उगाचच टी शर्ट आणि जीन्स घालून आलं असेल तर हा नवशिक्या हे इथलं उघड सत्य. बायकांचे कसे (कोणाच्याही) लग्नातले असे वेगळे कपडे असतात, कायमच; तसे नाटकाचे म्हणून वेगळे कपडे असतात. पुरुषमंडळींनी कायम झब्बा घालावा, वय, उंची, अंगकाठी याचा विचार न करता. झब्ब्याखाली पायापर्यंत येणारे कोणतेही वस्त्र चालते; पायजमा, चुडीदार किंवा फारच Yo असाल तर जीन्सही चालते. संगीत नाटक असेल तर शक्यतो प्रौढ लोकांनी (तसे ही संगीत नाटकांना तेच जातात हल्ली. "फुला सारखी हलकी हलकी" असं म्हणणारा कवळी लावलेला कॄष्ण आणि ४० वर्षाची लठ्ठ्मुठ्ठ हलकी हलकी राधा आपल्याला तरी नाही बाबा बघवत) एखादं जॅकेट घातलं तरी हरकत नाही. पायात फक्त "चपला". आजकाल लोक फ्लोटर किंवा सॅंडलही घालतात; कालाय तस्मै नमः म्हणायचं आणि काय! मोबाईल असतोच, तो silent/off करायचा. नस्त्या ठिकाणी श्रीमंती दाखवायची नाही. मधे पुण्या (अजून कुठे?) विक्रम गोखलेंनी, लोक वारंवार विनंती करुनही मोबाईल ऑफ करत नाहीत म्हणून नाटक थांबवून साष्टांग नमस्कार घातला आणि स्वतःच्या थोबाडीतही मारुन घेतली म्हणतात. असली वेळ खरा नाटकवाला कधीच दुसरयावर आणत नाही. so point is, switch off your mobile. . खिश्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चिल्लर. कोणताही गजरेवाला (प्रस्तावना लक्ष्यात येतेय नां?) आणि कॉफीवाला तुम्हाला चिल्लर देत नाही. So better you carry it with you.

नाटकाला तयार होणे यात ३ भाग असतात; पुरुषांचे तयार होणे, मुलांचे तयार होणे आणि बायकांचे तयार होणे. यातले पहीले २ भाग मी स्वानुभवावरुन लिहीले आहेत. आता तिसरा भाग हा मुख्यतः "अनुभवणे" यावर आधारीत आहे. जसा पुरुषांना झब्बा, तशी बायकांना भारीची साडी MUST! इथे Yo दिसण्यापेक्षा Old Wine दिसणं जास्त महत्वाचं. गजरा पुर्वी MUST होता, आता केसांसोबतच अश्या गरजाही कमी झाल्या आहेत. आणि नाटकाला आल्याचा एक विशिष्ट भाव चेहरयावर यायला हवा. मुलं ही "ब्याद" असून "नवरा" नावाचा गॄहस्थ या ब्यादेला सांभाळण्यासाठी सोबत आणला आहे हे त्या "विशिष्ट भावा"च रहस्य.

नाटकाला जाणे यातला नाटका इतकाच किंवा जास्त महत्वाचा भाग म्हणजे मध्यंतर. घाई घाईत जाऊन वडे आणणे, कॉफीचे कप सांभाळणे, ते ही स्वतःचे आणि दुसरयाचे कपडे खराब न करता हे जितके महत्वाचे तितकेच महत्वाचे म्हणजे नाटकावरची चर्चा. बालगंधर्व किंवा यशवंतरावला जर कधी असा मध्यंतर अनुभवला तर आपण चुकुन नाट्यप्रशिक्षण शिबिराला आलेलो असून इथे विजयाबाई किंवा दुब्यांचे गुरु हे नाटक अजून कसं चांगलं होऊ शकलं असतं हे सांगताहेत असा भास होतो.

कॉलेजच्या गॅदरींगच्या दर्जाची नाटक यायला लागल्या पासून नाटक पाहाणं खुप कमी झालं असलं तरी अधुनमधून झटका आल्यासारखी चांगली नाटक येतातही. I am sure to experience the same culture again there!

Comments

mastach! balnatyancha kida nawhata ka tumachya balpani? mala tar aai waterbag bharun, daba deoon 'nimmashimma rakshas' pahayala 'ektila' pathwaychi tyachi aathwan zali.
mastach.
Samved said…
बालनाट्याचा किडा होता ना. पण आम्ही नाटक बघण्यापेक्षा करण्याकडे जास्त झुकलो होतो ना..मी लहान पणी इतक्यांदा "राजा" झालो होतो की माझे एक सर मला कायमच राजा म्हणायचे:)
mad-z said…
सम्व्या तू म्हणजे एक भन्नाट साहित्यीक हे आधीपासनच माहिती होत. पण लग्नानन्तर देखिल तूझ डोक सुपिक आहे हे पाहून बर वाटल.

लिहीत रहा, वाचायला आम्ही आहोतच.
Monsieur K said…
mast lihila aahe. :)
~ketan
Megha said…
tuza blog vachun kalopasakchya aathvani jagya zalya