खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी


खुप आधी नाटकांविषयी लिहीलं होतं. नाट्यगीतांविषयी न लिहीतो तर कुठे तरी आत रुखरुख लागली असती.

मराठी गाण्यांची पहीली आठवण म्हणजे भावनातिरेकाने मळमळणारी करुण, दारुण भावगीते. रस्त्यावरची भिकारीण असो की कॉलेजात जाणारी चंपट पोरं असो, सारी आळवुन आळवुन शुद्ध, दाणेदार, स्वच्छ, सुमधुर आवाजातच गाणार. ते खोटे शब्द, खांडेकरी आदर्शांचा काव्यगुळ यात खरं तर मराठी गाण्यांचा आमच्या पुरता मुडदाच पडला असता पण..

..पण वसंतराव भेटले. वसंतराव म्हणजे बाप-माणुस. आधी नुस्तंच "घेई छंद मकरंद" आवडायचं कारण त्यातली तानांची भराभरा उलगडणारी भेंडोळी. "घेई छंद" चं विलंबित व्हर्जन मिळमिळीत वाटायचं आणि तडफदार वसंतरावांबद्दल आदर द्विगुणित व्हायचा. तेव्हा उत्तुंग नाट्यशिल्प (कदाचित) दुसरया कुठल्या तरी नावाखाली कॅसेटच्या स्वरुपात मिळायचं. कान जरा सेट झाल्यावर "घेई छंद" च्या विलंबित लयीची पण मजा कळायला लागली. तो पर्यंत वसंतराव नुस्ते छा गये थे. "मृगनयना रसिक मोहीनी" सारखं तलावातल्या चांदण्यासारखं संथपणे पसरत जाणारं गाणं असो की "सुरत पिया की" सारखी दमसाजाची परिक्षा घेणारं, प्रचंड चढं-उतार असणारं गाणं असो किंवा "तेजोनिधी लोहगोल" सारखी सर्वांगसुंदर प्रार्थना असो, वसंतराव वॉज अनबिटेबल. म्हटलं तर सारीच नाट्यगीते आणि म्हटलं तर प्रत्येक गीताची जातकुळी वेगळी. वसंतरावांनी सर्वच प्रकार लिलया हाताळले. वसंतरावांची तान न तान सुस्पष्ट, स्वच्छ, शब्दांची आब राखणारे उच्चार आणि रंगमंचावर अपेक्षित असणारी स्वरांची जबरदस्त फेक असा साराच अफलातुन मामला. वसंतरावांचा मोठेपणा इथेच संपत नाही. डबक्यातल्या पाण्याला वाट नाही मिळाली तर त्याला कुजका वास यायला लागतो. नाट्यसंगीताला वसंतरावांनी वास येण्याआधीच नवी वाट काढून दाखवली. बालगंधर्व, दिनानाथ यांच्या (ऎकिव)सुवर्णयुगानंतर पुढची पिढी जुनेच सुर आळवत होती. नाविन्याच्या अभावापायी महाराष्ट्राची एकमेव प्रेझेन्टेबल कला मरते की काय असं वाटत असतानाच वसंतरावांनी समर्थपणे ती परंपरा पुढे नेली.

याच पालखीचा पुढचा समर्थ भोई म्हणजे अभिषेकीबुवा. गायक म्हणून अभिषेकी थोर होतेच पण एक कॉम्पोजर म्हणून मला त्यांच्या बद्दल जास्त आदर आहे. "सर्वात्मका सर्वेश्वरा" सारखं आधुनिक पसायदान असो की "अबिर गुलाल" सारखा कल्लोळ कल्लोळ अभंग असो, बुवांचं गाणं टू द पॉंईंट असायचं, कुठेही फापटपसारा नाहीच. कट्यार काळजात घुसली हे जसं वसंतरावांचंच नाटक होतं तसं धाडीला राम तिने का वनी, मीरा मधुरा ही बुवांची नाटकं होतं. कैकयीचा त्रागा व्यक्त करणारं "मी झाले अवमानिता" असो की "कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला" मधलं भरताचा आर्त असो, त्या गाण्यांमधले भाव कॉम्पोजिशन मधे पुरेपुर उतरलेले. "लेवु कशी वल्कला" या आशा खाडीलकरांनी म्हटलेल्या गाण्यात तर वनवासातील सीतेचे फुटप्रिन्ट्स इतके ठळक आहेत की जेव्हा सीता गाते "नीट नीरीची गाठ न जुळते/नीरी वरती नीरी न जुळते//कटी वरुनी झरते, ओघळते मेखला" (शब्दांची चु.भु. दे. घे.), डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त गोंधळलेली, बावरलेली सीताच येते. आणि बाईंनी की ते गाणंही अश्या काही झोकात गायलय की तोंडून नुस्तं "वा!" असंच बाहेर पडावं. "हे सुरांनो चंद्र व्हा" बद्दल तर काय बोलावं? कुसुमाग्रजांनी जणु नवं मेघदुतच लिहीलय असं वाटतं.

या दोन महाविरांव्यतिरिक्त रामदास कामत, प्रभाकर कार्येकर, बकुळ पंडीत, अजीत कडकडे असे असंख्य जण गाऊन गेले. तरीही..

..तरीही ही परंपरा सायनोसायडल लयीसारखी खाली-वर होत राहीली. का? प्रतिभावंतांचा अभाव, गायक-नटांचा अभाव, प्रसंगाशी विसंगत कोंबलेली गाणी, काळाचा महिमा ..ही यादी अजूनही लांबवता येईल. पण उपयोग काय? आज काही छोटे मोठे अपवाद सोडले तर दामलेबुवांव्यतिरिक्त गाणारं आणि लोकांना नाट्यगृहाकडे आकर्षित करु शकणारं कोणीच नाही. लेकुरे उदंड झाली सोडली तर त्यांनी ही गाणं फार गंभीरपणे घेतलं नाही हा जरासा आपल्याच नशिबाचा वाईट भाग म्हणावा

केरळात कथक्कली, कुठेतरी भरतनाट्यम, कुठे कुचिपुडी असे विविध वारसे विविध संस्कृतींना लाभले. महाराष्ट्राला मात्र दगडांच्या देशा गाण्यागत लावणी, तमाशे, शाहीरी असे रफ-टफ प्रकार वाट्याला आले. सुस्कांरीत म्हणावा असा नाट्यगीत हा एक ठेवा या मातीला लाभलेला पण तो ही कालौघात मिटत जातोय. सध्या सारेगमात छोटी छोटी पोर ज्या तडफेने नाट्यगीतं म्हणताहेत, ते ऎकलं की उम्मीद पे दुनिया कायम है चा अनुभव येतो हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

Comments

Dhananjay said…
Good article! Vasantrao and Abhisheki.. great musicians indeed.
Megha said…
mastach zalay ha lekh pan faar apurna vatat aahe...tu ajun kititari natyageetanvar lihu shakato.. vasantrao great!!
Mi ya sagalyashi far parichit nahi... kay karm comment denar! 'damlebuwa' he matr lol!
Nandan said…
>>> सुस्कांरीत म्हणावा असा नाट्यगीत हा एक ठेवा या मातीला लाभलेला पण तो ही कालौघात मिटत जातोय. सध्या सारेगमात छोटी छोटी पोर ज्या तडफेने नाट्यगीतं म्हणताहेत, ते ऎकलं की उम्मीद पे दुनिया कायम है चा अनुभव येतो हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

-- Agadi. Rock, Metal chya jamanyathi pashchimet Opera ajoon joradar chalu asatana asa vhava ya parshwabhoomivar he ajoon janavata.
'खो'चं काय झालं म्हणे?
Yogesh said…
हा लेख फार छान झाला आहे. अभिषेकीबुवांच्या गाण्यांबाबतची टिप्पणी खासच आहे.
Yogesh said…
I saw your comment about Johaar very late. I didn't know we have stopped singing it.

Its really unfortunate to see it being stopped. :(

It was a good song reflecting realities of the past. I doubt someone will ask to stop Abeer Gulaal because it has Jaateeheen etc words.

(Sorry for English, my transliteration service is having some issues :()