मत्त गे गंडस्थळ झिंगुरांचे (1)

यत्ता आठवी म्हणजे कंच चिंच. कुमार बियाणीनं शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्याभरात आपण माजावर आल्याचा दाखला दिला. त्यानं कुमारी लाहोटीच्या सायकलवर खडुनं आरपार बाण गेलेलं दिल चितारलं आणि सोबत किडमिड्या अक्षरात एक चिठ्ठी. कुमार बियाणी जात, धर्म, सांस्कृतीक आणि त्याहुन महत्वाचं आर्थिक, सामाजीक इ इ सारं सारं अभ्यासुन कुमारी लाहोटीच्या प्रेमात पडला होता. पण हाय रे किस्मत. आदीम काळापासून प्यार का दुश्मन जमाना. अकबरानं जसं अनारकलीला भिंतीत चिणून सलीमच्या प्रेमाचा निक्काल लावला तस्स्संच खेळ शिकवणाऱ्या राठौर सरांनी काडीमात्र बियाण्याला आपल्या साडेसहा फुटी विशाल देहानं ढकलत ढकलत भिंतीच्या एका कोपऱ़्यात जवळ जवळ चिणलाच. ते विस्मयकारी, अभद्र विनोदी, भितीदायक इ इ दृश्य बघून बाजूनं जाणारा डब्बल भिंग्या न किंचाळता तर प्रेमापोटी चिणला गेलेला पहीला वीर म्हणून अनारकलीसारखंच कुमार बियाणीचं नाव झालं असतं. यत्ता आठवीची सुरुवात ही अशी दणदणीत झाली.शाळेत निदान दीड डझन मास्तरांचं नाव कुलकर्णी. त्यामुळे प्रत्येक मास्तरांना विशिष्ट उपनाम होतं. असेच एक आप्पासाहेब कुलकर्णी उर्फ आप्पासाहेब आठवी ड चे वर्गशिक्षक झाल्याचे कळाल्यावर बियाणी, डब्बल भिंग्या, काळा पहाड यांनी जोरात तर चिचुंद्री, चिमणी, मिस वन आणि थरकाप यांनी शालीनपणे आनंद व्यक्त केला. मुली शालीन असतात असा शाळेचा ठाम विश्वास असल्यानं काय तो हा फरक. ही बाळं कसला न कसला पराक्रम करण्यात शाळेत पुढं असायची म्हणून त्यांची प्रतिक्रिया महत्वाची. उर्वरित वर्ग हा अद्वैत तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारा असल्यानं त्यांना कोण शिकवतो हे महत्वाचं नव्हतं.आप्पासाहेब इतिहास आणि मराठी शिकवायचे. वर्गशिक्षक असल्यानं त्यांचा रोजचा पहीला तास. शालिनी करंजेचा आवाज चांगला म्हणून आप्पासाहेबांनी तिला वर्गाकडून रे हिंद बांधवा- थांब या स्थळीचालीत म्हणून घ्यायला सांगीतलं. मराठीत करुण दाते आणि आठवी ड मधे शालिनी करंजे स्वतःला तलत महमुद समजत. त्यातही करुणपेक्षा शालिनीच सरस; गाणं म्हणताना तिचा नुस्ता आवाजच नाही तर आख्खा देहही थरथरायचा. तिनं पहील्या दिवशी सुर लावला आणि डब्बल भिंग्या फिस्सकन हसला. "थरकाप बघ कसलं गाणं म्हणतेय." काळा पहाड गारा पडल्यासारखा टपाटपा हसला. "उठा मोहन साळेकर, सोन्या देशमुख. आज काय माकड छाप वापरुन दात भादरले का? सारखे आपल्या मुखाबाहेर पडतायत" आप्पासाहेबांनी उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार सगळ्यांचा गोपाळकाला करत आदेश दिला. "सर, सोन्या नाही, सोहन" काळा पहाडनं एकही दात कमी न करता प्रसन्नपणे उत्तर दिलं. "थरकाप, आपलं हे शालिनी, कसलं गाणं म्हणत होती म्हणून हसु आलं" तोंडातुन फुटलेले शब्द सावरता सावरता डब्बल भिंग्याला घाम फुटला. "या असे पुढे या, साळेकर आता तुम्ही एकतिस ते चाळीस असे पाढे पाठ करा आणि देशमुख तुम्ही तास संपेपर्यंत सुर्यनमस्कार घाला" आप्प्पासाहेब फाशीची शिक्षा सुनावल्यागत खडु मोडत पुढे सरकले. उरलेला तास आप्पासाहेब त्यांच्या भसाड्या आवाजात आणि मागोमाग ताज्या फुटलेल्या आवाजात मुलं आणि गदगदलेल्या आवाजात मुली रे हिंद बांधवा- थांब या स्थळीम्हणत अश्रु ढाळत होत्या.
यत्ता आठवी म्हणजे दोनाचे चार होण्याचे दिवस. साध्या गणिताचे बीजगणित आणि भुमिती झाले, सामान्य विज्ञानाचे वनस्पती अन जीवशास्त्र झाले. आठवड्याभरात आप्पासाहेबांनी साऱ्या विषयांची फाळणी करुन पोरांना वेळापत्रक वाटून टाकलं. नशिब थोर म्हणून दोन्ही गणितांना मिळून आख्ख्या एक देशपांडेबाई मिळाल्या. विज्ञानाचं नशीब मात्र सामान्य होतं. वनस्पती शिकवायला शिंदे सर तर जीवशास्त्राला महाजनबाई असे दोन गुरुजन होते. "अय्या, म्हणजे मोनी मावशी शिकवणार!" सावली पाटील तिच्या टोपणनावाला साजेसं लगेच चिवचिवली. "अबे, महाजनबाई म्हणजे चिमणीच्या मोनी मावशी म्हणे" बियाण्यानं सदा टवकारलेल्या कानांनी ऎकलेलं क्षणभरही न साठवता उपडं केलं. "म्हणजे आता नुस्ता चिवचिवाट!" डब्बल भिंग्या सुस्कारा सोडत पुटपुटला "एक चिमणी-अनेक चिमण्या । शेतावरती जमलेल्या॥" "दिदी दिदी फिर क्या हुआ?" काळा पहाडानं काळवेळ न बघता मोठ्यानं विचारलं आणि परत एकदा चार बाकांमधे खसखशीचं पिक आलं. आणि बुद्ध परत हसला!" स्वतःशीच बोलत आप्पासाहेब काळा पहाडजवळ आले. "आता परत आवाज आला तर देशमुख यावेळी तुम्ही सुर्यनमस्कार घालाल आणि साळेकर तुम्ही पाढे पाठ कराल. बियाणी तुम्हाला मी खेळाच्या मैदानावर पाठवेन; राठौर सरांकडे, पिटी करुन घ्यायला. येतय नां लक्षात?" आप्पासाहेबांनी करकच्चून दम भरला अन वर्गात स्मशान की काय म्हणतात तसली शांतता पसरली.तर कुठे होतो मी?" आप्पासाहेबांनी अत्यंत अपेक्षेने पहील्या डेस्कावरच्या मंजु पाटीलला विचारलं. ती भाषणात (त्याला काळा पहाड कॉन्फीडंटली वक्रुत्व म्हणतो), अभ्यासात, श्लोक पाठ करण्यात हट्कुन पहीली असते. सर, शिवाजी.." मंजु उर्फ मिस वन नम्र आवाजात तुटलेला धागा हल्काच जोडून देते.आप्पासाहेब इतिहास शिकवताना बाबासाहेब पुरंदरे बनतात "हां तर मी म्हणत होतो की बादशहाच्या दरबारात संतापानं थरथरत राजे म्हणाले-" "-आत येऊ का कुलकर्णीसर"या असल्या योगावर ताशाच्या तडतडाटासारख्या वर्ग हसला. आप्पासाहेबांनी हसु दाबत दाराकडं बघितलं. नुस्तंच गोल गरगरीत पोट... त्यांनी डॊळे ताणून बघितलं. पोटापासून बऱ्याच अंतरावर उरलेला देह होता!ही शाळेतली नवी एन्ट्री असणार हे ओळखुन आप्पासाहेबांनी हजेरीपटाकडं बघत आवाज दिला "ये पुष्कर"काही सेकंद गेले. अजून काही सेकंद गेले.आधी चिर्रर्र आवाज आला आणि मग रत्नाच्या घशातून आवाज फुटला "कुणी येत का नाहीए?"बियाण्यानं किडक्या देहातून बटाट्यासारखे डोळे ताणून बाहेर काढले "ते बघ ते बघ पुष्करचं पोट आलं. अर्रे, तो बघ मागोमाग उरलेला पुष्करपण आला"सोहन काळा पहाड होता तर पुष्कर शुभ्र चुरमुऱ्यांचं फुसफुशीत पोतं होता. बघता बघता दोनच दिवसात पुष्कर लाल आईस्क्रीमची कांडी जीभेवर विरघळावी तसा वर्गात मिसळुन गेला. नवीन येणाऱ्यात नुस्ता पुष्कर नव्हता. त्याच्या मागोमाग आठवड्याभरात वि.. सहमोरे सर पण आले, भुगोल शिकवायला.

Comments

Panchtarankit said…
बेक्कार हसतोय राव अजून
Sheetal Bhangre said…
मस्त. याच्या पुढचे भागही टाकणार ना?
हाहाहाहा
लौकर यौदे पुढ्चा भाग

बाकी नेहमीप्रमाणेच, शब्दांचा योग्य वापर, नवीन पात्र(व्यक्ती)ची ओळख करून द्यायची हातोटी आणि प्रत्येक वाक्यामागून अजून घट्ट होत जाणारी पकड
Snehal Bansode. said…
यत्ता आठवी म्हणजे 'दोनाचे चार' होण्याचे दिवस...हा ..हा...!
arp said…
आई शप्पत
arp said…
आई शप्पत
Samved said…
निनाद- थॅन्क्स
शितल- थॅन्क्स. पुढचा भाग टाकणार नां!
अनिकेत- धन्यवाद मित्रा
स्नेहल- :) धन्यवाद
एआर्पी-धन्यवाद
Samved said…
Meghana Deshmukh- kasala masta lihilas....vakyavakyala hasat hote...aata laukar lihi pudhacha bhag.....keshavraj -dolyapudhe ubhi kelis....sarani vachayala pahije...
Samved said…
Amol Parwekar- आई शप्पत.... गजब लिहिले आहे
a Sane man said…
यत्ता आठवी म्हणजे दोनाचे चार होण्याचे दिवस.

खिखिखि :)

आमच्यावेळी ते नववीत होत ;)
Samved said…
Megha, Amol- Thanks
Sane- arrre. it happened in 8th for us :)