अर्धा माझा भास..अर्ध सत्य तुझे..त्याच्या साठी ओझे आभाळाचे

प्रिय ग्रेस,

"संध्यामग्न पुरुषाची लक्षणे" वाचतोय सध्या. अत्यंत अभिरुचीहीन कव्हर केलय तुमच्या पुस्तकाचं, मनापासून वाईट वाटलं. असं या आधीतरी कधीच झालं नव्हतं, मग आत्ताच का? पुस्तक जुनं वाटावं किंवा स्वस्तातलं वाटावं इतकं कव्हर टाकाऊ? सुभाष नेहमीच तुम्हाला "वाचतो", मग हा त्याचा प्रयोग म्हणायचा की काय? तसं असेल तर फसला असं वाटतय. सामनातल्या तुमच्या लेखमालेचं पुस्तक म्ह्टल्यावर जरा धास्ती होतीच. तुम्ही काही "लिही" म्हटलं की लिहीणारया पंथातले नव्हे. त्यात या कव्हरची भर. अजून पुस्तक वाचतोच आहे आणि अजूनतरी कुठेच शॉक लागलेला नाही. "मृगजळाचे बांधकाम" सुरुवातीपासूनच जड गेलं. करायचं म्हणून अवघड केल्यासारखं! हेही त्या पंथातलं असतं तर मात्र एक आत्मीक मैत्र मिटल्याचं दुःख झालं असतं.

तुमच्या कविता मी कधीच एका बैठकीत वाचत नाही; नाही सहन होत मला. अंगात भिनण्या आधी स्वःतच अलिप्त होते ती. तुमच्या भाषेत सांगायचं तर "दुःख टेकण्यापुरती संदीग्ध." तुमचा संदर्भ तिथेच संपतो, सीतेच्या जनकासारखा. किंवा तुमच्या आणि जीएंच्या झाल्यानझाल्या भेटीसारखा. तिथून पुढे ती कविता तुमची असेल तर नाही भेटावं वाटत मला. हे सारं काय आहे? कशासाठी आहे? "पाठशिवणीचा खेळ पोटशिवणीच्या साठी..."

समिक्षा का करावी? करावी का? ज्याचा त्याचा प्रश्न. आपलं लिहीणं झालं की आपण तुटून जावं. तुमच्या कवितांचं आम्ही काय करावं? कसं तपासावं एकेक अंग? तुमच्या वैयक्तीक आयुष्याशी सांगड घालून? की भाषेचा एकेक कोपरा तासून? परत तिथेही तुमचा आणि माझा सारखाच अट्टहास आहेच की " You can take off my cloths, but you can't make me naked." तुम्ही म्हणता तसं लोकं तुमच्या कवितेविषयी कमी बोलतात आणि त्याच्या परिणामाविषयी जास्त बोलतात. मी काय करतो? मला तर तुमची कविता अचानक भेटते, जाणवते. कुणी विचारलं तर काय सांगु तिचे अर्थ?
"मोडूनी परतीच्या वाटा
आलो तोडूनी माळं
देशील कारे गोंदून
मज कोरे आहे भाळं"

मीही आता कोणाला काही सांगत नाही. पण एखादा क्षण बेसावध असतो जशी "साजणवेळा." जसं गाणं तशी कविता; वेगळी करताच येत नाहीत मला. त्वचा सोलून आतला आत्मा शोधू पाहाणारा मुकुंदचा आवाज आणि "पुरातून येती तुझे पाय ओले"ची मोडकांनी बांधलेली अप्रतिम कॉंम्पोझीशन. थकायला होतं मला शब्द-अर्थ-सत्य यांच्या इतक्या जवळ जाऊन.

तुमच्या सारखीच मलाही प्रिय ते ते नाकारण्याची सवय आहे ग्रेस! कधी ते हरवण्याची भिती असते म्हणून तर कधी त्याची सवय होईल या धास्तीने. तुमच्या सावलीला नाकारता आलं नाही म्हणून मी माझे लिहीते हात कलम केले. घाबरु नका, रुढार्थाने नव्हे. मला माझी ओळख गमवायची नव्हती, सत्व गमावलेली कलाकृती तुम्हालाही आवडली नसतीच नां?

"...
मी असममित शरीराचा-
ढासळतात माझे तोल तू
असण्याच्या प्रत्येक शक्यतेवर;
पण आत्म्याची शालीन
छंदबध्दता कधी मोडलीच नाही,
जसा जपावा प्रत्येकानेच
आपापला अवकाश.
अवघड असतात नेहमीच वागवणं निर्वासितासारखे
या शरीराचे साज
आणि आकृतीबंधातून तुला शोधायचे
सराईत छंद.
देहवाती भोवती काजळी धरणं
म्हणजे निर्वात काळसरपणात कोंडून जाणं
शोधूनही सापडत नाहीत आता
पारदर्शक मनाचे ढवळलेले तळं"

कविता पोस्ट करायची नाही असं सांगीतलेलं असतानाही तुमच्या साठी हा अपवाद.

--संवेद

Comments

" तुमच्या सारखीच मलाही प्रिय ते ते नाकारण्याची सवय आहे ग्रेस! कधी ते हरवण्याची भिती असते म्हणून तर कधी त्याची सवय होईल या धास्तीने. तुमच्या सावलीला नाकारता आलं नाही म्हणून मी माझे लिहीते हात कलम केले..."
नको रे असं म्हणू.. प्रभाव असतातच. त्यांना नाकारून थोडंच चालतं? त्यातूनच तर वाट काढावी लागते ना? चुकत माकत. ही पूर्वसुरींची ऋणं.. देऊनच चुकवावीत. अशी टाळून नव्हेत..
Megha said…
atishay sundar.
navasarkhach sanvedanshil aahes tu.
kavita utkrushta.
tuzya kavitancha blog post kar pls...
mad-z said…
संव्या. १४ वर्षं .. पण आजही कधी कधी वाटतं .. ओळखतो का मी तुला... तस ओळखायला आपण सोबत होतोच किती ... आणि नाही ओळखायला दूर होतोच कधी. तुझं आणि ग्रेसच नातं मला ठावूक आहे ... ग्रेस तुझ्या रक्तात असा भरलाय की साधी पत्रंही तू तशीच लिहीतोस. मला तुझं ते वाक्य आणखीही आठवतं .. "माझ्यासाठी माझा प्रत्येक माणूस एक जंगल असतो .. त्यात कुणी दुसर्यानी पाय ठेवला तर पटत नाही". ग्रेसला परत परत वाचला तरच ग्रेस समजतो. मी कधी ग्रेस वाचला नाही ... पण तुला वाचलं की मला त्याची कमतरता जाणवत नाही.

जावू दे. आता भारतात परतायचा विचार करतोय. आलो की मग आयुष्य "मार्गी" लावायचंय. बरंच वाचयच आणि जगायचंय .. या नोकरीपोटी बाकी सगळं सुटलंय ... तर आता इथनंच सुटायचंय.

मेघनानं म्हटल्यानुसार तुझ्या कवितांचा ब्लॉग पोस्ट कर .. मला माहिती आहे .. तु नाही करणार ... तेंव्हा एक तर ई-मेल कर नाहीतर आल्यावर वाचीन.
Samved said…
well well...आता लिहून publish केल्यावर काय म्हणणार..चढा हुआ था जो दरया उतर गया यारों...
मेघना, माझी कवी म्हणून काय लायकी आहे हा प्रश्न वेगळा ठेवला तरी माझा त्याबाबतीत ego मात्र कोणत्याही महाकवी इतकाच strong आहे :) कुणी प्रभावाचा आरोप करण्या आधीच आपण तोल सांभाळावा हे बरं, नाही का?

मेघू (2nd one..), दिनेश..मी बहुदा कधीच कवितांचा blog प्रसिध्द करणार नाही. केलंच तर पुस्तक करेन..माहीत नाही..नक्की काहीच नाही..पण secrecyच्या बाबतीत माझी आदर्श एमिली डिकीन्सन आहे. तिच्या इतकच मलाही गुपचूप राहाता आलं असतं तर?

दिनेश..खुपच लिहीलं आहेस..i don't agree with most of it!! I hope you are not planning to return back without giving a full thought..आणि तिडीकीत नाही
हो, ते तर झालंच! तू एमिली डिकिन्सनचा आदर्श पाळ की. (आख्खा नको अर्थातच! :)) पण हातच कलम हे जरा जास्त नाही का? कुठला स्वतंत्र लिहिणारा माणूस आयुष्यात कधीतरी कुठल्यातरी प्रभावाखाली नसतो? फेजेस्‌ असतात. प्रभाव म्हणजे नक्कल नव्हे. मुळात स्वतंत्र लिहिण्याची लायकी आणि इच्छा असेल जिवट, तर प्रभावाखालून येतोच आपण बाहेर. तेवढी स्वत:ला शिव्या घालण्याची खुजली असतेच आपल्यात.
Sneha Kulkarni said…
Mhanun to 'graceful' seasonwala reference hota hoy!! :) Anyways Grace hee ek anubhuti asate na, shabdat na mandata yenaari aani mandu nayecha attahaas asaleli. Chhan lihila aahes. Baki ajun kavita vachayala aavadatil asa mee maagach lihila hota, parat ekda tyachi punravrutti!!
Vidya Bhutkar said…
"संदिग्ध अर्थाचे उखाणे" मी बरेचदा हा ब्लॉग अपडेट झालेला मराठीब्लॉग.नेट वर पाहिला, पण त्याचं शीर्षक वाचताना मराठी भाषेतील उखाण्य़ांवर तो असावा असं वाटलं (प्लीज माझ्या बावळटपणा हसू नको हं :-( ) त्यामुळे वाचणं झालंच नाही. पण इतर ब्लॉगमध्ये तुझ्या कमेंट वाचताना वाटायचं की बघायला हवं की कोण आहे हा संवेद. :-)) तर असा आहे हा इतिहास इथे येण्यापूर्वीचा.
आता मूळ मुद्याकडे येते. तुझे लिखाण आवडले. कवितेबद्दल, पोस्ट करावे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे पण इथे वाचलेली कविता आवडली. हा पोस्ट तर आवडलाच, तसेच आधीचेही सारे. :-) गणित, यमुआत्याच धाडस, Collage हे नोट करावेसे वाटतात.
आता यापुढे हा ब्लॉग माझ्या 'आवडत्या' यादीमध्येच.... :-)
-विद्या.
Abhijit Bathe said…
संवेद - माझ्या एका मित्राने मला ’शेवटची भेट’ वगैरे म्हणुन कि काय - मला ’साजणवेळा’ भेट केलं. ते वाचायचा मागचे आठ वर्ष प्रयत्न करतोय.
तुझं हे पोस्ट वाचलं/वाचायचा प्रयत्न करतोय. आता (हे किंवा आधीचं) मी वाचलं कि नाही - याने जसा ग्रेसला फरक पडत नाही तसा तुलाही पडणार नाही. मग या कमेंटचं प्रयोजन काय? तर उगीच ’वाचलं, आवडलं, लिहित रहा’ असं पकवण्यात काही राम वाटला नाही. आणि कमेंट न लिहिता पुढं जाता आलं नाही. अशा काहिश्या ’अटका खजुरमें’ अवस्थेत ही कमेंट.
त्याचा अर्थ काय?
तर - चांगलं लिहिलंयस. वाचलं. तु लिहिलेलं सगळंच भयंकर आवडलंय वगैरे असं नाही - पण हे आणि आशी काही पोस्ट्स वाचाविशी वाटली.
च्यायला एवढी शाई वाया घालवुन मी शेवटी कंटेंटबद्दल काहीही न म्हणता शेवटी - ’वाचलं, चांगलं आहे, लिहित रहा’ हेच लिहिलंय!

समजुन घे.
Anonymous said…
डायनामिक व्हीव्यूने मला आपली कविता वाचायला मिळाली, कवितेचे अन् थोडे ग्रेसचे आपले बंध बघता आले.

पुरातून येती तुझे पाय ओले... हे अगदी जवळ आहे, ग्रेसचे शब्द असे अर्ध्यावर टाकून लिहिणे कधी जमतच नाही, किती संमोहन केलेय त्यांनी. ते पूर्ण लिहूनही अपूर्ण काही राहिले असे डाचते. कुठलाच भास परिणाम करत तो सत्य सांगत राहतो. जीवावर येते त्याचे सर्व..

माझा एक मित्र, मी ग्रेस वाच असं सुचवलेला..त्याचे भान लागले नाही, काय तो वाचतोय म्हणून, अन् मी भान कधी सोडतो तेच वाचून..एकूणच ते बेभान होणारेच.

दूर तुमची ती अनुभूती पुसटशी मला येणार नव्हती, पण इथे जे आलेय ना, ते मला काही पोह्चलेय.