Sunday, January 29, 2012

आभासी विश्वाचे वास्तव

वेब २.० आलं आणि दुतर्फा संवादाच्या असंख्य शक्यता नव्याने जन्माला आल्या. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग इ. ही सारी वेब २.०ची अपत्ये. प्रत्येकाचा हेतु एकच-संवाद. संवाद या एका मुलभुत गरजेच्या किती म्हणून मिती असाव्यात याच्या साऱ्या कल्पनांना मोडीत काढत, या माध्यमांनी, नवनवीन आभासी विश्वांना जन्म दिलाय.
ब्लॉग बद्दल बोलायचं तर थोडसं नोंदवही/डायरी, असं रुप असलेलं, तुलनेनं अनाकर्षक असं हे माध्यम. आपण लिहीलेलं कुणी आणि का वाचावं या संभ्रमात असलेले ब्लॉगर्स (ब्लॉग-लेखक), शब्दांच्या महापुरात नेमकं काय आणि किती वाचावं याचा अंदाज घेऊ न शकणारे वाचक आणि (मुख्यतः) इंग्रजीतून संवादाचं बंधन यामुळे या माध्यमाचं भविष्य काय हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच युनिकोडच्या रुपानं प्रादेशिक भाषांमधे लिहीणाऱ्यांसाठी एक छोटीशी क्रांतीच झाली. युनिकोडमुळे कुठल्याही विशेष सॉफ्टवेअर्सच्या गरजांशिवाय मातृभाषेत लिहीण्याची सहजच सोय झाली. बघता बघता मराठीतही ब्लॉगर्सचा सुकाळ झाला. साहित्यीक, पाककलाविषयक, भविष्याबद्दल, तांत्रिक माहीती देणारे असे एक ना अनेक विविध विषयांवर मराठी ब्लॉग वेगाने उदयाला आले आणि बरेचसे वेगाने बंदही झाले.
याच सुमारास, ब्लॉगवरच्या साहित्यविषयक नोंदींचं संकलन करण्याच्या संकल्पनेला एक ठोस स्वरुप देण्यासाठी संवेद (http://samvedg.blogspot.com/), मेघना (http://meghanabhuskute.blogspot.com/), अ सेन मॅन (http://asanemanthinks.blogspot.com/) आणि ट्युलिप (http://tulipsintwilight.blogspot.com/) ही ब्लॉगर मंडळी एकत्र आली. या मंडळींनीं रेषेवरची अक्षरे (http://reshakshare.blogspot.com/) या नावाने २००८ मधे पहीला ब्लॉग-दिवाळी अंक काढला. या उपक्रमाचे सर्वात महत्वाचे नियम म्हणजे निवडलेल्या नोंदी साहित्य-प्रकारात मोडणाऱ्या असाव्यात आणि ठराविक कालावधीत प्रसिद्ध झालेल्या त्या सर्वोत्तम नोंदी असाव्यात. या साऱ्या प्रक्रियेत संपादक म्हणून आमच्यापुढे असंख्य अडचणी असतात. काही समान आवडींमुळे आम्ही चौघे एकत्र आलो आहोत पण ही ओळख इंटरनेटच्या आभासी विश्वाला साजेशीच आहे. आम्ही चौघे कधीही एकत्र भेटलेलो नाहीत. काही टोपणनावांखालच्या खऱ्या ओळखी सोडल्या तर अगदी चेहरेही सर्वथा अनोळखी! दिवाळीच्या काही महीने आधी आम्ही आमच्या वाईट्ट व्यावसाईक वेळापत्रकातून वेळ काढून, जगाच्या कोण कोपऱ्यातून रात्रीबेरात्री इंटरनेटच्या माध्यमातून भेटतो. सर्वसाधारणपणे १५०-२०० ब्लॉग आणि त्यावरच्या पाचसहाशे नोंदी आम्ही संपादकाचा चष्मा लावून चाळून काढतो. प्रत्येक संपादकानं निवडलेली प्रत्येक नोंद ही कशी सर्वोतम आहे हे इतर तीन संपादकांनां पटे पर्यंत प्रत्येक लेखाचा कीस पाडला जातो. आणि इतर बऱ्याच खटाटोपींनंतर रेषेवरची अक्षरेचा अंक प्रकाशित होतो.
आज गेली चार वर्ष सलग हा उपक्रम चालवल्यानंतर मागे वळून बघताना या उपद्व्यापामागच्या उर्जेचा शोध घेताना बरंच काही उमजत गेलं. रेषेवरची अक्षरे सुरु केलं तेव्हा ब्लॉगवरच्या काही सर्वोत्तम साहित्यिक नोंदींचं संकलन एव्हढाच ढोबळ उद्देश होता. पण या मागची व्यापकता कालांतराने उलगडली. ब्लॉग हा तसा बऱ्यापैकी हौशेचा मामला. आपापले व्यवसाय सांभाळत लिहीताना काळ-काम-वेग या त्रैरासुराच्या राज्यात लिखाणाचा कोंभ कधी कोमेजून गेला हे बऱ्याच चांगल्या ब्लॉगर्सनां समजलंही नाही. अनुभवांनां निव्वळ शब्दबद्ध करणं म्हणजे लिखाण नाही, गजलेचं वजन सांभाळल्यानं चांगली गजल बनत नाही, बेताल कविता म्हणजे मुक्तछंद नाही हे आणि असेच जुनेच अनुभव संपादक म्हणून आम्हाला नव्यानं आले. इंटरनेटच्या महाजालात चांगलं लिहीलेलं विरुन जायला वेळ लागत नाही हे ही लक्षात आलं. संपादकाची भुमिका थोडीशी गंभीर झाली. रेषेवरची अक्षरेचे चारही वर्षांचे अंक आम्ही संदर्भासाठी म्हणून एका जागी आणले. ब्लॉगरनां लिहीण्याची उर्मी सोडली तर कसलंच मोटीव्हेशन, फायदा नसतो. त्यांना लिहीतं ठेवण्यासाठी नोंदींचा खो खो असे काही उपक्रमही आम्ही केले. "मला मुळात लिहावं का वाटतं?" किंवा "मावशीबोलीतल्या कविता" हे काही समाधान देऊन गेलेले खो खो. एका ब्लॉगरनं लिहायचं आणि परिचित ब्लॉगरला याच विषयावर लिहीण्यासाठी खो द्यायचा असं काहीसं या खेळाचं स्वरुप. या वर्षी एक पायरी ओलांडून आम्ही "लैंगिकता आणि मी" या विषयावर रेषेवरची अक्षरेच्या अंकात मुक्तचिंतन ठेवलं होतं. त्याला लिहीणाऱ्यांचा आणि वाचणाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकाच विषयावर कथा, कविता, आत्मचिंतन अशा कित्येक प्रकारे ब्लॉगर प्रकट झाले.
ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही मराठी साहित्याला नवं वळणं द्यायचा प्रयत्न करतो असं म्हणणं फार धाडसाचं आहे. पण आमच्या ग्लोबल गावकरी असण्याने, विविध संस्कृतींना सामोरे जाण्याने, बहुभाषिक असण्याने मराठीत नवे संदर्भ येताहेत हे नक्की. कथांमधे चित्रकलेसारखे क्युबिझमचे प्रयोग केले जाताहेत. चित्रकलेला शब्दात रंगवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जागतिक संस्कृतीचे दुवे स्थानिक संदर्भात मिसळुन गंभीर कथा लेखन होत आहे. एकीकडे पारंपारिक वळणाच्या अलंकारीक कवितांना उजाळा मिळताना दिसतोय तर दुसरीकडे स्वतःला अंतर्बाह्य तपासणाऱ्या कविता मुक्तछंदातून प्रकट होताना दिसताहेत. पारंपारिक अर्थाने किंवा प्राध्यापकीय समिक्षा नसेल पण कविता: आधी, आता आणि पुढे? किंवा कोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना असे अत्यंत गंभीरपणे केलेले लिखाण समिक्षेच्या आयामात आपल्या परिने भर घालत आहे.
ब्लॉग हे माध्यम आम्ही गंभीरपणे घेतोय. गरज आहे ती या प्रयत्नांना प्रोत्साहान देण्याची, मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाशी या नव्या दमणुक करणाऱ्या माध्यमाला एक समांतर प्रवाह म्हणून मान्यता देण्याची. विविध व्यवसाय, विविध देश, विविध भाषा आमच्या लिहीण्यावर, वाचण्यावर, विचारक्षमतेवर पूर्वी कधीच नव्हता एव्हढा प्रभाव टाकताहेत. त्यातून मिळणारे अनुभव काही प्रस्थापित चौकटी मोडणारेही असतील आणि काही नवनिर्माण करणारे असतील. या आभासी विश्वाचं खरं तर एव्हढंच वास्तव!

>>>> युनिक फीचर्स गेल्या वर्षीपासून ई-साहीत्यसंमेलन भरवतय. गेल्यावर्षी रत्नाकर मतकरी या संमेलनाचे अध्यक्ष होते तर या वर्षी ग्रेस. यंदाच्या अंकात ब्लॉग माध्यमात नक्की काय चाललय याचा धांडोळा घेण्याची संधी मला मिळाली. हा लेख मुळ स्वरुपात इथे उपलब्ध आहे. एका चांगल्या उपक्रमाचे आणि अजून महत्वाचे म्हणजे ब्लॉगवरच्या साहीत्यीक लिखाणाला गंभीरपणे घेतल्याबद्दल युनिक फीचर्सचे आणि शितलचे मनःपुर्वक आभार!

Friday, November 25, 2011

भिन्न षड्ज

हल्ली अचानक चांगलं घडण्यावर फारसा विश्वास उरलेला नाही. चांगलं घडवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि याउपरही काही बरं घडेल याची खात्री कमीच. पण तसं अचानक घडलं खरं. कोऱ्या मनानं क्रॉसवर्डमधे हिंडत असताना सवयीनं एक चक्कर सीड्यांमधून मारली. गेली कित्येक वर्षं एकही सीडी विकली न गेल्यासारखा तो सेक्शन. तेच ते अगम्य इंग्रजी आल्बम, जुनेच जसराज, भिमसेन, तडकामारु पण त्यातल्यात्यात खपावु रिमिक्स आल्बम वगैरे वगैरे. मला इथून हिंडताना शेवाळल्यासारखं वाटतं. तरीही आशाळभुतपणे मी काही वेगळं मिळेल म्हणून चौकस डोळे फिरवले. "भिन्न षड्ज". मी घाईघाईनं सीडी उचलली. एकच होती. कुणी हिसकावुन घेतली तर? नकळत सीडीवरची पकड घट्ट झाली. सीडीत काय आहे हे माहीत असतानाही परत एकदा कव्हर वाचून काढताना आजि म्या ब्रम्ह पाहीलेची अनुभुती आली.
खरं म्हणजे मी स्वतःपुरत्या काही चौकटी आखलेल्या आहेत. ब्लॉगवर आवडती सार्वजनिक माणसं आणायची नाहीत हा त्यातला एक महत्वाचा नियम. ब्लॉगवर कविता पिटायच्या नाहीत हाही एक समजुतदार नियम. पण बऱ्याचदा हव्यासापोटी हे नियम मोडले गेले. आतली गाठ नियमांपेक्षा मोठी ठरली.
भिन्न षड्ज तर नियमांपलीकडे जाणाऱ्या माणसाचा सिनेमा. म्हणून परत एकदा नियम बाजुला ठेवून मी लिहायला बसलोय. हा खरं तर विरोधाभास आहे. बाईंना एकुणात शब्द खटकतात. त्यांना स्वरांनीच सगळं सांगायचं असतं. कितीतरी वेळा हे ऎकलय मी. आणि परत शब्दच वापरुन सगळं लिहीतोय मी. दुसरा गोंधळ, जवळची किंवा जवळीक दाखवणारी माणसं त्यांना ताई- किशोरीताई म्हणतात. मी अगदी जन्मल्यापासून नाही तरी आठवतं तेव्हापासून त्यांना बाईच म्हणतो म्हणजे बाई अगदी आग्यावेताळ आहेत हां किंवा बाईंनी आज कत्ल केला असं. गोंधळागोंधळात मेंदु अजून थोडा सुरकुतला.
अमोल पालेकरांनी आयुष्यात अनेक धाडसी कामं केलीत, बादल सरकार महोत्सव त्यातलंच एक महत्वाचं. पण किशोरी आमोणकरांवर डॉक्युमेंटरी करणं हे जीवावर बेतु शकणारं काम. बाईंचे मुड्स सांभाळणं हा मोठा धोका झालाच पण त्याहूनही धोकादायक म्हणजे बाईंच्या अलौकीक गाण्याचं, त्यांच्या वेगळेपणाचं नेमकं संक्षिप्तीकरण करुन ते लोकांसमोर ठेवणं. पण पालेकरांनी हे काम केलं, बऱ्या प्रमाणात यशस्वीरित्या केलं.
बाईंच्या गाण्यातलं वेगळेपण फार सुंदररित्या त्यांनी स्वतः तर सांगीतलं आहेच पण गंमत म्हणजे शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया आणि झाकीर हुसेन यांनीही जवळ जवळ ते तसंच पकडलय. बाई म्हणतात, मी गाताना गाण्यातला भाव होऊन जाते! कुणी गाताना असं गाणंच होऊन जात असेल तर बाई, तुम्ही त्रासदायक अ-तरल महाभागांवर खुशाल ओरडा. या डॉक्युमेंटरीचा एक चांगला गुण म्हणजे इथे पिसाटलेला निवेदक नाही. बहुतेक वेळ बाई बोलतात किंवा इतर सहकलाकार. बाईंना तापट म्हणणाऱ्यांना बाईंच एक वेगळंच रुप या फिल्म मधे बघायला मिळतं जेव्हा त्या मोगुबाईंबद्दल बोलतात. आईनं मला शिकवलं असतं तर मी आज कुठे असते असा सवाल बाईंच्या तोंडून ऎकायला मिळाला, तेव्हा गरगरायला झालं. बाईंची मी स्वतः विकत घेऊन ऎकलेली पहीली कॅसेट म्हणजे हंसध्वनी. एखाद्या रागाचा इतका सुंदर विस्तार फार विचारी गायकालाच करता येतो असं माझं तेव्हाचं प्राथमिक मत जेव्हा मी आज बाईंच्या या वाक्याशी ताडून बघतो तेव्हा तापट बाई खऱ्या की गुरुभक्त शिष्या बाई खऱ्या हाच प्रश्न उरतो. इथे नकळत लता-माई दुकलीशी तुलना झाली. बाईंचा आवाज गेला तेव्हाची परिस्थिती बाईंच्या मुलांनी सांगीतली आहे. दहा वर्ष- न गाता- शक्यय? बाईंनी तत्व सोपं केलं, मी आतल्या आत गात होते! डिट्टो कुमार!! दिशा असली की प्रवासाला शिस्त राहाते खरंय पण मुळात प्रवासातच जर हरखुन जाता येत असेल तर कुठं जायचयं कितपत महत्वाचं मानायचं? एखाद्या गुढ कोड्याचा उलगडा व्हावा तश्या बाई उलगडत जातात. बाईंवर घराण्याची परंपरा मोडल्याचा आरोप होतो. मला स्वतःला कुणा क्रिएटीव्ह माणसानं नियम वगैरे तोडला की प्रचंड आनंद होतो. आता नक्कीच नवं काही तरी होण्याची एक शक्यता तिथे जन्माला आलेली असते. कुमारांनी बऱ्याच चौकटी पारच मोडून टाकल्या. बाईंनी तेव्हढी नासधुस केली नाही याच उलट मला वाईटंच वाटतं. कुणाला घराण्याला बांधीलच आलापी ऎकायच्या असतील तर आद्य-पुरुषाच्या रेकॉर्डच ऎका. एकच राग जेव्हा गायक वेगवेगळ्या मैफिलीत गातो, तेव्हा प्रत्येक वेळी ती नव-निर्मीती असते हे हिंदुस्थानी गान परंपरेचं वैशिष्ट्य. दोन स्वरांमधलं अवकाश कसं पेलायचं, स्वरांना आकार कसा द्यायचा यावर विचारी गायक जेव्हा चिंतन करतो, तेव्हाच नवं काहीतरी निर्माण होतं. झापडबाज समिक्षकांना देव क्षमा करो!
अगदी भाबडेपणे सांगायचं तर अमोल पालेकर आणि संध्या गोखलेंनी फार पुण्याचं काम केलय. उच्च निर्मितीमुल्य, नेमका फोकस, फापटपसाऱ्याला चाट, दुर्मिळ क्लिप्स, नेमकेपणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सव्वा तास शब्दांपलीकडच्या गाण्याचं तत्वज्ञान आणि ते मांडणारी तत्ववेत्ती!
तरीही...
पालेकरांनी काही गोष्टी करायलाच हव्या होत्या...
बाईंनी त्यांच्या पुस्तकात राग-विचार मांडला आहे. स्वराचा उगम, त्याचं वैशिष्ट, प्राचीन परंपरा इ. बाईंनी थोडं ते इथं सोपं करुन सांगीतलं असतं तर ....
बाईंनी काही भजनं फार सुंदर म्हटली आहेत विशेषतः मीरेची. त्या आर्ततेमागे बाईंचं आत्मा-परमात्मा असं काहीसं तत्व आहे. ते स्वतः बाई सांगत्या तर...
बाईंनी काही वर्कशॉप्स केली होती. त्याचे काही तुकडे फिल्म मधे आहेत. पण या वर्कशॉप क्लीप्स निवांत मिळत्या तर....
बाई कश्या शिकल्या याबद्दल थोडक्यात उल्लेख आलाय. पण त्या शिक्षणावर बाईंनी कसा विचार केला आणि बाई इतरांच्या पन्नास पावलं पुढे कश्या गेल्या कळतं तर...
फिल्म सव्वा तासा ऎवजी अजून मोठी असती तर............

काही लोक समाधानी नसतात हेच खरं. पण ते किती बरंय!

Monday, November 21, 2011

रेषेवरची अक्षरे - स्टार माझा

स्नेहलमुळे यावेळी रेषेवरची अक्षरे स्टार माझा वर चमकलाय! थॅन्क्स स्नेहल
Thanks to Snehal, Reshewarchi Akshare is covered by Star Maza!

http://www.youtube.com/user/starmajha#p/search/0/0k0pisLF3SU

Saturday, October 29, 2011

लैंगिकता आणि मी-2



Visit-http://reshakshare.blogspot.com/2011/10/blog-post_1661.html

लैंगिकता आणि मी-1


To know more, visit- http://reshakshare.blogspot.com/2011/10/blog-post_4998.html

Wednesday, October 26, 2011

रेषेवरची अक्षरे २०११

मंडळी,



सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही.


इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे.


दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि दर्जानंही आहे तिथेच आहे, याची खंत आहेच. पण ब्लॉगरांकडून नवं काही लिहून घेण्याचा प्रयोग यंदा यशस्वी झाला आणि ’लैंगिकता आणि मी’ यासारख्या अनवट विषयावरचं साहित्य अंकात सामील करता आलं, त्याचा आनंदही आहे. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत.


अंक वाचा, आपल्या सुहृदांना पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना, सुधारणा कळवा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत.


तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरपूर सकस साहित्याची जावो...




ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे
२०११

Wednesday, August 31, 2011

चौकटी बाहेरचं गाणं: मुझे जां ना कहो मेरी जां...


काही समज असतात म्हणजे पक्केच असतात. उदा. सिनेमातलं गाणं म्हणजे किशोर आणि लता. मापटं दाबून दाबून मी त्यात आशा बसवतोच, पर्यायच नाही. सिनेमातलं गाणं म्हणजे आर डी., सलीलदा वगैरे वगैरे. जिनिअस लोकांमधे असली प्रतवारी करायलं बसलं की तुम पुकार लो वाला हेमंतकुमार, आपकी याद आती रही वाली छाया गांगुली, लग जा गले वाला मदन मोहन, सिने मे जलन वाला जयदेव ते पार.. दिल से वाला रहमान येऊन आपल्याकडे "यू तुच्छ!" अशी नजर टाकताहेत असा सॉलीड भास होतो. तोंडावर असं सण्णकुन आपटल्यावरही जित्याची खोड जात नाही.

मग ठरवलं काही तरी सर्वसमावेश (!) करु आणि आपल्याला बिनतोड कोण आवडतं ते एकदाचं (हाय...) ठरवुनच टाकु.

निवांतात कॉम्बिनेशन्स बघायला बसलो. लता- आर डी- गुलजार, आशा- आर डी - गुलजार इ. इ. म्हटलं यातून लसावि काढू आणि वा वा....गणित आणि कला यांचा अपूर्व संगम घडवुन आणि. . हे वेडेचाळे अजून किती चालले असते माहीत नाही पण मुझे जां ना कहो मेरी जां..आठवलं आणि खेळ खल्लास झाला. जिनिअसांमधे नंबरांची उतरण कसली लावायची?

गाणं- गुलजार
संगीत- कनु राय
आवाज- गीता दत्त

मेरी जां, मुझे जां ना कहो, मेरी जां
जां ना कहो अनजान मुझे, जान कहां रहती है सदा
अनजाने क्‍या जानें, जान के जाए कौन भला
मेरी जां, मुझे जां ना कहो, मेरी जां ।।


सर्कसच्या धुवट प्रकाशात जग्लरनं सराईतपणे चेंडु हवेत फिरवावेत तसं गुलजार शब्द फिरवतो. जीवलगाची ही जीवघेणी विनवणी! सगळ्या भाषांमधे अशीनतशी शब्दांची गंमत असतेच. पण हिंदी/उर्दुला जो लहेजा आहे, जी आदब आहे, जे वजन आहे ते (कबुल करुनच टाकतो) मराठीला नाही. मराठी तशी टणक आणि प्रसंगी उग्र भाषा आहे. अर्थात आरती प्रभु वगैरेंनीं त्यातूनही नक्षीकाम केलेलं आहे ही त्यांची प्रतिभासाधना. असो. शब्दांचे खेळ खेळताना हे सिनेमातलं गाणं आहे याचं गुलजारनं कुठंच भान सुटु दिलं नाहीए. पती-पत्नीतला दुरावा जां ना कहो अनजान मुझे या एकाच ओळीत अधोरेखित करुन आख्ख्या सिनेमाचा गाभा हा असा पकडायला फार ताकद लागते. प्राण-प्राणनाथा अशी उतरंड रचताना नात्यांमधली अनोळख सारा सारीपाट क्षणार्धात उधळु शकते ही शक्यता, नव्हे, ही भिती, गीता दत्तच्या आवाजात लख्ख ऎकु येते.

हे गाणं गीता दत्तखेरीज कुण्या दुसऱ्याच्या आवाजात ही कल्पना देखील असह्य आहे. किंचित अनुनासिक, अस्पष्ट, बंगाली छापाचा गीता दत्तचा आवाज गाण्याच्या दोन-तीन मिनिटात गाण्यात भावना पाहीजे म्हणजे काय याचं प्रात्यक्षिकच आहे. गाण्याच्या सुरुवातीला मुझे जां ना कहो मेरी जां वर निव्वळ अर्धा मिलिमीटरचं हसु, जां शब्दावर अंग-बेतलेलं कंपन आणि गाणंभर पसरलेली कमालीची दुखावलेली मादकता.

सुखे सावन बरस गए
कितने बार इन आंखोसे
दो बुंदे ना बरसे, इन भिगी पलकों से
मेरी जां...

या कडव्यात दुसऱ्या ओळीत गाणं आऊट ऑफ ट्युन होण्याचं किंवा यतीभंग होण्याचं भय काय असतं हे कुठलाही गानवेडा सहज सांगु शकतो. कनु रायनं काय चतकोर-पाव सुरात ते जे काही सांभाळलय त्याला तोड नाही! या गृहस्थाविषयी आपल्याला काहीच माहिती नसावी? पाप..

तिसरं कडवं परत गुलजार आणि गीता दत्तच्या नावानं!

होंठ झुके जब होठोंपर
सांस उलझी हो सांसोमें
दो जुडवा होठों की, बात कहो आंखोंसे
मेरी जां...

दबलेल्या श्रृंगाराची अव्यक्त अनुभुती अजून किती समर्पक शब्दात सांगावी गुलजार माणसा? आणि गीता दत्तनं सांस उलझी हो सांसोमें ओळीत सांस शब्दावर जे काही चेटूक केलय ते शब्दातीत आहे.शहाण्या माणसानं लौकीक अर्थानं श्वास रोखून पुनःपुन्हा या ओळी ऎकाव्यात. प्रत्येक कडव्याच्या पहील्या दोन ओळींच्या पुनरावृत्तीत, कंपनांमधे अतीसुक्ष्म फरक आहे. पहील्यांदा येताना या ओळी किंचित आवेगाने, ठसठशीतपणे येतात. पुनरावृत्तीत मात्र हताश झाल्यागत, साशंकपणे सोडुन दिल्याप्रमाणे प्रवाही येतात. शेवटच्या कडव्यात हे प्रकर्षानं जाणवतं सांस शब्दावर. पहील्यांदा गाताना तो शब्द किंचित आत ओढून घेतलेला आहे. जिनिअस! गाण्याविषयी बोलताना पडद्यावर ते साकारणाऱ्या पात्रांना टाळायचा मी फार प्रयत्न करतोय पण या कडव्यात ते अशक्य होऊन बसलय. स्मिताविषयी लिहीताना मागं मी लिहीलं होतं की सध्या सिनेमात इतके प्रयोग सुरु असताना त्या प्रयोगांना न्याय द्यायला स्मिता आज हवी होती. संजीवकुमारच्या बाबतीत हेच वाक्य मी काना-मात्रेचा बदल न करता म्हणु शकतो. पुर्ण गाणंभर त्यानं अवघडलेपण, हरवलेपण, रितेपण अत्यंत सहजतेनं वागवलय. दो जुडवा होठों की ओळींवर मात्र त्यानं त्याचे सिग्नेचर लुक्स दिलेत. ठाकुर डोळ्यांनी बोलतो तो असा! तनुजाच्या बाबतीत म्हटलं तर अन्यायच झाला. नुतनच्या अव्वल बेंचमार्कशी तुलना आणि तिचा स्वतःचा ढांग स्वभाव यामुळे तनुजा कायमच रॉ राहीली. कुठल्याही अविर्भावाशिवाय तनुजा या संपुर्ण गाण्यात हातातुन काही तरी अनमोल निसटण्याची धास्ती, कोसळतय ते सावरण्याचे आटोकाट प्रयत्न, अवस्थ तरी आपण आखलेल्या वर्तुळाविषयी अश्वस्त भाव देहबोलीतून सहज दाखवत राहाते.

गाणं संपतं ते परत मेरी जां..च्या अवीट सुंदर समेवर. फक्त यावेळी भर पडली असते ती गीता दत्तच्या लाडीक हसण्याची...


------**********------

आपण असंख्य गाणी ऎकतो. काही बकवास असतात, काही ऑल टाईम ग्रेट असतात, तर काही क्षणिक लाडके असतात. यातही परत काही कायम काळजाच्याजवळ असतात ते विशिष्ट "चौकटीं"मुळे. ही चौकट म्हणजे ठराविक संगीतकार, गीतकार आणि /किंवा गायक-गायिका इ इ यांची युती. हा खो खो सुरु करतोय तो अश्या गाण्यांसाठी जी तुमच्या लाडक्या चौकटीबाहेरची आहेत पण तुम्हाला जवळची आहेत. खो कुणाला द्यायचा, किती जणांना द्यायचा असा काही नियम नाही. शक्यतो एकाच गाण्याविषयी लिहीलेलं बरं आणि गाणं नवं की जुनं, गाजलेलं की न ऎकलेलं असली बंधनं नाहीत. एकच प्रामाणिकपणा स्वतःशी बाळगायचा तो म्हणजे आपली चौकट स्वतःच ठरवायची आणि त्याबाहेरचं गाणं निवडायचं.