Thursday, October 15, 2009

रेषेवरची अक्षरे

नमस्कार!

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

- संपादक मंडळ
http://reshakshare.blogspot.com/

Sunday, September 20, 2009

कविता: आधी, आत्ता आणि पुढे?

'Twas not my blame-who sped too slow
'Twas not his blame-who died
While I was reaching him
But 'twas - the fact that He was dead - एमिली


कवितेच्या प्रांतात सध्या एक स्फोटक शांतता आहे. हा स्फोट अनेक अर्थी आहे. कविता फारसं कुणी छापत नाही. कविता फारसं कुणी विकत घेऊन वाचत नाही. कवितेत नवे प्रयोग असे क्वचितच होताहेत. अगदी गेला बाजार, हल्ली कुणी कवींवर नवे विनोदही करत नाही! म्हणजे मराठीतली कविता मेली का? तर निदान अजून तरी नाही असंच उत्तर द्यावं लागेल. बाजारात भाराभर नवे कवी स्वतःच्या पैश्यांनी कविता संग्रह छापताहेत. सहज मराठी ब्लॉग-विश्वाचं निरीक्षण करा. कवितांच्या ब्लॉगची संख्या अगदी लक्षणीय! म्हणजेच उदंड जाहले कवडे!! वाचतय कोण? वाचल्यानंतर झिरपत जाऊन शिल्लक राहतय कोण? धोंड, विजया राजाध्यक्ष, सुधीर रसाळ या बाप-समिक्षकांनी समिक्षा केलेला शेवटचा कवी कोण? प्रश्नचिन्हांच्या ओझ्याखाली दबलात तरीही तुमचं उत्तर मला ठाऊक आहे. पाडगावकर, ग्रेस, भट, आरती प्रभु, कुसुमाग्रज, विंदा...अहो जुनी पिढी ही कवींची! सौमित्र आणि (समजा ओढून ताणून) संदीप खरे म्हणता? आणि हो,हो, सलिल वाघ देखील!! चांगले शिकलेले दिसता तुम्ही. वेळ लागला पण जमलं की उत्तर काही जणांना! बरं, मला आता असं सांगा, गेल्या दहा वर्षात पुढे आलेल्या कुठल्या कवीवर मोठ्ठ्ठ्ठी...चर्चा/वाद झालाय? कुणाच्या कवितांचा गंभीरपणे अभ्यास झालाय? कुणाच्या कवितांचे नवे अन्वयार्थ शोधण्यात येताहेत? कुणाच्या कवितांचे दाखले सहजपणे आपल्या लिहिण्या-बोलण्यात येताहेत? उत्तर येत नाही म्हणून असे नाराज होऊन चिडून नका जाऊ बुवा. कारण या प्रश्नाला उत्तर बहुदा नसावं/नाहीच. आजही मागणं मागायचं म्ह्टलं की पसायदान आठवतं, आजही पिंपातल्या उंदराचे आणि गणपत वाण्याच्या बिडीचे रहस्य शोधणे सुरु आहे, आजही सखीच्या मुलीला कसे काय द्यावे या ओळींवर जान कुर्बान करत ब्लॉगे पोस्टतायत आणि आजही सलाम म्हटलं की लोकांचा डावा हात आपसुक मागे जातोच आहे.

मग आजच्या कवींचे आणि कवितांचे नेमके संदर्भ काय? तुम्हाला त्या जुन्या चौकटी-बिकटी मोडण्याची भारी घाई बुवा. तुमची नवी चौकट ठोकायच्या आधी जुनी चौकट नक्की आहे तरी काय हे बघायला नको?

कवितेचे अभ्यासक कालखंडानुसार कवितेचे सर्वसाधारण प्राचिन, साठापुर्वीची आणि साठोत्तर असे वर्गीकरण करतात. काही जण कवींचे रोमॅन्टीक, निराशावादी, निसर्ग कवी आणि गेला बाजार दुर्बोध कवी असे ही वर्गीकरण करतात. कोण चुक आणि कोण बरोबर याचा फार काथ्याकुट न करता मी शक्यतो कालखंडानुसार आणि प्रभाव-वर्गानुसार एक इल्स्ट्रेशन करत आहे.



















(Click to view details of the illustration)

आता हे सगळं असंच आहे का? नाही.
कुसुमाग्रज १९६० आधी लिहीत होते आणि नंतरही. चित्रे, ग्रेस आजही लिहीतात. पाडगावकरांनी, विंदांनी कवितांच्या अनेक प्रांतात मुसाफिरी केली.

हे सर्वसमावेशक आहे का? नाही
तुमच्या आधी मीच सांगतो, गदिमा, महानोर सुटले! बहीणाबाई सुटल्या! पद्मा लोकूर, विलास सारंग, रमेश तेंडुलकर, यशवंत मनोहर, अर्जुन डांगळे सुटलेच..आणि कारण नसताना सुटले.

हे इल्स्ट्रेशन कवीचा भरात असण्याचा काळ आणि कवितेची सर्वसाधारण जातकुळी यावर आधारीत आहे. माझी सोय आणि माहीती यावर हे इल्स्ट्रेशन आधारलेले असल्याने काही गोष्टी चुकल्याही असतील पण आपण समिक्षक नसल्याने काटेकोरांटीचं भिंग थोडसं बाजुला ठेवून पुढे जाऊ.

कविता बाय डिझाईन, आशयघन, शब्दसंपृक्त, बंदिस्त, प्रतिमासंपन्न, नादयुक्त आणि गेयमधूर असते. पहील्या भागातले काव्य प्रकार पाहीले तर अभंग, ओवी हा एक प्रकार, पोवाडे, लावण्या हा दुसरा प्रकार आणि अलंकार-छंदयुक्त पंतकाव्य हा तिसरा प्रकार. दुसरया भागात पंतकाव्याचं लॉजिकल एक्स्टेन्शन म्हणता येईल अशी अलंकार आणि छंदयुक्त कविता जास्त प्रमाणात लिहीली गेली. याच टप्प्यात ज्युलियनांनी गजलेचे (फारसीतून) मराठीकरण केले. तिसरया भागातही अलंकार आणि छंदयुक्त कवितेचा दरारा राहीलाच तो अगदी आजपर्यंत. या टप्प्यात मुक्तछंद हा पारंपारिक छंदांना छेद देणारा प्रकार जास्त वेगाने पुढे आला. पण आजही कविता म्हटलं की अलंकार छंदयुक्त कविताच डोळ्यासमोर येते याचं कारण आधी म्हटल्याप्रमाणं कवितेचा डिझाईन फॉरमॅट. मग बाकीच्या काव्यप्रकारांचं काय? संत आणि शाहिरी काव्याचा फॉरमॅट हा त्यात येणारया विषयांना पुरक असल्याने आणि त्या विषयांवर आधारित काव्यनिर्मिती आता मर्यादित झाल्याने आता तो निव्वळ अभ्यासापुरता उरलाय. गजलेचा वारसा पुढे चालवला तो भटांनी आणि तो संपलाही त्यांच्याच सोबत. खरं तर गजल तिचे विषय, तिची नजाकत, शब्दांचे वजन, तिची पेश होण्याची पद्धत, शब्दांचा कणखर नाजुकपणा यामुळे मराठीत उपरीच. पण भटांना ते जमलं. आज विविध प्रकारे गजलेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरु आहेत पण भटांची प्रतिभा लाभलेला मात्र कुणीच दिसत नाही. आज जी गजल लिहीली जात आहे ती चुष म्हणून. मधल्या काळात जोतिबांनी अखंड, शिरीष पैंनी हायकु, किणीकरांनी उत्तर रात्र मधून काही प्रयोग केले पण त्यांचं पुढे काही झालं नाही. नाही म्हणायला उत्तर रात्रच्या धरतीवर चंगोनं मी माझा लिहीलं, ते तुफान खपलं आणि गावोगावी पॉकेटबुक सायजात काळा-पांढरा फोटो असणारे असंख्य लोकल चंगो जन्मले (आणि संपले).

नवी कविता ही छंदात किंवा मुक्तछंदात वाढणार आहे. भिती इतकीच की छंदबद्ध कविता केवळ छंदाच्या अट्टहासापाई शब्दांची तोडफोड करेल किंवा कृत्रिम वाटेल आणि दुसरी भिती मुक्तछंदातली कविता अधिकाधिक दीर्घ आणि दुर्बोध होत जाईल. मराठीतला गुलजार होण्याच्या नादात सौमित्रच्या काही फसलेल्या कविता आणि चित्र्यांच्या बरयाच दीर्घ गद्य कविता ही त्याची अनुक्रमे उदाहरणे.

कोणत्याही कलेवर होतो तितपत समाजाच्या स्थितीचा परिणाम कवितेवरही झाला/ होतो. कवितांचे विषय आणि त्यांची ट्रीटमेन्ट पाहीली की हे लगेच लक्षात येतं. जेव्हा पृथ्वी चौकोनी होती आणि सुर्य पृथ्वी भोवती फिरायचा, संतांची कविता देव, धर्म, बेसिक माणुसपणा यांच्या भोवती फिरत राहीली. राजांच्या आणि मोगली विलासी वातावरणात पोवाडे, फटके आणि लावण्या बहरात आल्या. आतल्या-बाहेरच्या, माणसाच्या-निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव व्यक्त करण्याचे भान कवितेतून उमटलं ते दुसरया टप्प्यात. कवितेतून निसर्ग, तत्वज्ञान, आंतरिक अन बाह्य सौंदर्य व्यक्त होऊ लागलं. हे होण्यामागं (इंग्रजी अमंलाखालची) नवी शिक्षण पद्धती काही अंशी जबाबदार होती. वागण्या-बोलण्यात, समाजात आलेला मोकळेपणा कवितेत परावर्तित व्हायला लागला. तिसरया टप्प्यात, शिक्षणामुळे आलेला अंतर्मुखपणा कवितेतुन उमटायला लागला. कधी नव्हे इतका "मी"पणा कवितेत डोकावायला लागला. ग्रेसांच्या कवितेतले वैयक्तिकांचे संदर्भ तपासले की कविता कशी आत्ममग्न होत गेली हे लगेच कळून येतं. याच उत्क्रांतीचा एक भाग म्हणजे इंदिराबाई, शांताबाईची कविता एक पाऊल पुढे गेली आणि प्रभा गणोरकर, वासंती मुजुमदार, अरुणा ढेरे इ. ची कविता स्त्री जाणीवा अधिक धीटपणे अधोरेखित करु लागली. शिक्षणानं आणि बदलणारया सामाजिक जाणीवांनी डोळे उघडले आणि परंपरेने किंवा निरुपायाने पुढे आलेल्यातला निरर्थकपणा जाणवायला लागला जो मांडला चित्रे, कोल्हाटकर, मनोहर ओक इ मंडळींनी. या कवितांनी पुर्वापार चालत आलेली कवितेतली संस्कार, सुरक्षितता, कुटुंबव्यवस्था, संकेत यांची चौकट जणु उद्धवस्तच करुन टाकली. निती-अनिती, अल्याड-पल्याड यांच क्रॉस-ब्रिडींग सुरु झालं ते या कवितांमधून. बदलती सामाजिक-राजकिय परिस्थिती कवितेत आली ती देखिल तिसरया टप्प्यात. शिक्षण माणसाला चौकस आणि जमलं तर बंडखोरही बनवतं. नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, दया पवार यांनी बंडखोर दलित कविता जन्माला घातली. दलित समाजाला जे हवं होतं ते कवितेतून क्रांती करुन मिळवण्यापेक्षा राजकिय माध्यमातून मिळवणं जास्त सोपं गेलं. दलित कवींचं झालेलं राजकिय अपहरण हे जसं त्या कवितेच्या पराभवाला कारणीभुत ठरलं तसाच कवितेतून बंड करता येतं हा दलित कवींचा फाजील आत्मविश्वासही. रक्त पेटवणारया बेभान आरोळ्या, सतत अस्थैर्याला आवाहन करणारी भाषा, दुःखाचं नागडं प्रदर्शन, कंठाळ प्रचारकी जहरी भाषा आणि पुनरावृत्ती यात दलित कविता मेली.

मग आजच्या परिस्थितीत कवितेत नक्की कोणते संदर्भ येणार आहेत? देव-धर्माच्या जाणीवा समुहात गडद होताहेत अन व्यवहारात फिकट त्यामुळे संत काव्यासारखे संदर्भ फिरुन नव्याने कवितेत येतील ही शक्यता जवळ जवळ नाहीच. जगण्याची गती माणसाला चक्रावुन टाकेल अशी झाली आहे आणि सौंदर्यविषयक जाणीवा बोथट झाल्या आहेत तरीही मानवी भाव-भावना या पुढे ही कवितेतून व्यक्त होत राहातील. पृथ्वी मी भोवती फिरायला लागल्याने नवी कविता अधिक अंतर्मुख, अधिक दुर्बोध, अधिकाधिक वैयक्तिक होत जाईल. पण वाढणारया निरर्थकतेमुळे आणि ग्लोबलायझेशनमुळे ती परत चित्रे-कोल्हाटकरांप्रमाणे उद्धवस्त चरणात जाते का हे पाहाणे मोठे इन्टरेस्टींग ठरणार आहे.

कालौघात टिकणे ही कवितेची परिक्षा आहे. पण हे टिकणे नर्मदेतल्या गोट्याच्या टिकण्यापेक्षा वेगळे. या टिकण्याला कवितेचे कालानुरुप बदलणारे (किंवा शाश्वत) आणि तरीही सुसंगत राहु शकणारे संदर्भ, कालातीत ताजेपणा अश्या काही कसोट्या आहेत. कविता हा निखळ भावनाविष्कार असल्याने तिच्या टिकण्यामागे रसिकांपर्यंत पोचण्याची ताकद असायला हवी हे जोडसुत्र. कवितेच्या बाबतीत हे महाकठीण काम. जनाधाराशिवाय कला टिकणे कठीण हे जर एक सत्य असेल तर कविता हा सर्वसाधारणपणे अपर क्लास वाङमय प्रकार मानला जातो हे दुसरे सत्य. कवितेची समज-उमज साधारण लोकांना नसते (बालभारती बाहेरच्या कविता कोण वाचतं रे गणु? ५ मार्कांचा ज्ञानेश्वर ऑप्शनला टाकणं जास्त सोपं !) असं क्षणभर खरं मानलं तर आई जेवु घालेना अन बाप भीक मागु देईना अशी ही कवितेची परिस्थिती.

हा चक्रव्युह १००% पार करणारी एकमेव कवीजात म्हणजे संतकवी. शतकांनंतरही ज्ञानेश्वरीचं गारुड अजून उतरलेलं नाही, तुकाराम गाथा भाषेपलीकडे जाते आहे, रामदास राज्यकर्त्यांनी वाळीत टाकले तरी ’मनातून’ जात नाहीत. या टिकण्यामागे कवितांचे समाज मनाच्या जवळ जाणारे विषय (अन त्या विषयांचे धार्मिक संदर्भ) , भाषेचा सहज-सोपेपणा, किर्तन-पुराण या मौखिक परंपरांचे पाठबळ ही काही सर्वसाधारण कारणं. चिन्हांच्या भाषेत बोलायचं तर संत काव्य हे कवितेचं सर्वात मोठं आणि सर्व-समावेशक वर्तुळ. पुढच्या टप्प्यात हे वर्तुळ लहान झालं आणि कविता तळागाळातील लोकांपासून तुटली. साधारण आणि उच्च साहित्यीक जाणीवा असणारा वर्ग कवितेचा वाचक राहीला. कवितेतून देव, धर्म, पोथी पुराण हद्दपार झाले अन निसर्ग, मानवी भाव, नाती हे विषय हाताळले जाऊ लागले. ही कविता देखिल टिकली आणि एका मोठ्या समुहापर्यंत पाझरली. साठीनंतर मात्र एक क्रांतीच झाली. मर्ढेकरांपासून पुढे कवितेचे एकसंध वर्तुळ जणु उद्धवस्तच झाले आणि त्याच्या जागी टोकदार संवेदनांची, काहीशी दुर्बोध भासणारी आणि तळागाळातीलच काय पण सर्वसामान्य माणसाशीही फटकुन वागणारी असंख्य लहान लहान वर्तुळे निर्माण झाली आणि होतच राहीली. आज ही वर्तुळे आकुंचन पावत पावत त्याच्या केंद्रबिंदुत प्रचंड वेगाने कोसळताहेत आणि वर्तुळे म्हणजे फक्त एक बिंदु बनून राहाताहेत.

पहील्या टप्प्याला लाभलेला मौखिक परंपरेचा वारसा पुढील दोन्ही टप्प्यात काही प्रमाणात उतरला आणि बराचसा यशस्वीही झाला. पहील्या टप्प्यात किर्तन, पुराण यांच्या माध्यमातुन कविता लोकांपर्यंत पोचली. तर दुसरया टप्प्यात, विशेषतः रवीकिरण मंडळ आणि बोरकरांनी काव्यवाचनाद्वारे कविता लोकांपर्यंत पोचवली. तिसरया टप्प्यात हाच प्रयोग यशस्वी केला तो विंदा, पाडगावकर आणि बापट या तिकडीने. कविता अश्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवायची का हा प्रश्न क्षणभर बाजुला ठेवला तर लोकांना या प्रयोगांनी कवितेकडे बरयाच प्रमाणात खेचुन आणले हे मात्र खरे. आज हाच प्रयोग काव्यवाचन आणि काव्यगायन यांच्या फ्युजन द्वारे पुढे जात आहे आणि त्याला प्रतिसादही मिळत आहे. भटांनी गजलेच्या बाबतीत हा प्रयोग केला तर मोडकांनी आणि काळ्यांनी ग्रेसांच्या कवितांचे साजणवेळाच्या माध्यमातून सोनं केलं. पण या प्रयोगाचे स्वस्त करमणुकीत रुपांतर व्हायला वेळ लागत नाही याची ताजी उदाहरणे म्हणजे उदंड जाहलेली कवीसंमेलने आणि सध्या चलती असणारा संदीप खरेंचा कॉलेज गॅदरिंगच्या लायकीच्या टाळ्याखाऊ कवितांचा नाच-गाण्यांचा कार्यक्रम. (मौनाची भाषांतरे हे इतकं अचाट अशक्य सुंदर नाव निवडल्यानंतरही हा माणूस तुझे तुझे तुझ्या तुझ्या असं रिमेश हेशमिया गान-स्टाईल प्रमाणे का लिहीतो? असो. कवितेबद्दल बोलु, कवीबद्दल नको).

मग आजची कविता टिकेल का? जगण्याची गती आणि गुंतागुंत इतकी वाढली आहे की कवितेसारखा निवांत आस्वाद घ्यावा लागणारा साहीत्यप्रकार पार भरडुन आणि गोंधळुन जात आहे. ज्यांना ती लिहायची आहे त्यांची आव्हानं वेगळी. पण ज्यांना ती वाचायची आहे त्यांना त्यांच्या अनुभवकक्षा वाढवाव्या लागणार आहेत, वाचनाची माध्यमं बदलावी लागणार आहेत. दुर्बोध आणि आत्मकेंद्रित बनु पाहाणारया कवितेला आपल्या अनुभवांशी जोडून तिची पडताळणी करत राहाणं हा नव्या रसिकामागचा अनंत प्रपंच.

Sunday, August 16, 2009

झाडे भ्रमिष्ट झाली

मातीत मिटून फुटलेली
बहरुन झाडे आली
पाण्यात पसरुनी नाती
आकाश पेलती झाली

झाडांची माया पुरुषी
मौनाला यावी कीव
देठाला चुकवून जेव्हा
फुल देतसे जीव

पाण्याचे गोत्र निराळे
ते तहानलेले ओले
प्रतिमा वाहून नेताना
झाडास पुसे ना बोले

झाडांचे तरते भास
माती नं मुळाला पाणी
देह विस्कटुन गाते
जणु भासामधली राणी

प्रतिमांचे साजण ओझे
झाडे जळात झुकली
माश्यांचे रडणे पाहून
पण झाडे भ्रमिष्ट झाली

Thursday, July 23, 2009

सदु स्टार डॉट स्टार

म्हणजे सदु काही हुशार नसतो. डोंबिवलीतला माणूस कसा लोकल पकडताना अचानक शुर होतो तितपत प्रसंगानुरुप हुशारी सदुला कधीमधी जमून जाते इतकंच. सदुची ऑफिसला येण्याजाण्याची वेळ हा या हुशारीचा एक नमुना. आम जनतेगत सकाळी साडेसातच्या बसने सदु कधीच जात नाही. सदु सकाळी साडेनवाची बस जमवतो आणि येताना आठची. सकाळी घरच्यांच्या धावपळीत आपली भर नाही म्हणून कौटुंबिक सदु खुश, आपण बसने जातो आणि गाडीसाठी पेट्रोल जाळत नाही म्हणून सामाजिक सदु खुश, साडेआठाला येणारी टीम आणि अकराला येणारा प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या दरम्यान आघाडी सांभाळायला मिळते म्हणून ऑफिशिअल सदु खुश वगैरे वगैरे. म्हणजे हे फार पुर्वी सदुला कधीतरी जाणवायचं. हल्ली साडेनवाच्या बसमधे खिडकीपाशी झोपायला मिळतं आणि हिंजवडीच्या कोपरयावर वाकडला भयाण ट्रॅफिक-जॅम लागत नाही एव्हढंच सत्य उरलं होतं. सदुनं विचार करत करत (सश्याचं गंडस्थळ त्या चालीवर सदुच्या परिस्थितीचं सिंहावलोकन!) कदाचित जास्तंच जोरात सुस्कारा टाकला असावा कारण त्याच्या खांद्यावर डोकं टेकवुन झोपलेल्या सुंदरीनामक प्राण्याला खडबडुन जाग आली. "अबीबी उद्री है क्या?" असं त्या द्राविडभाषिणीनं तमिळ हिंदीत विचारलं. सदुनं मान हलवत घड्याळ बघितलं आणि मग मुस्काटात बसल्यागत बाहेर बघितलं. अकरा! तब्बल एक तास त्याची बस वाकडच्या सुप्रसिद्ध (हायवे वरुन जाणारा तो उडता पुल म्हणजे रोड-प्लॅनिंग मधला एक चमत्कार असं जाणकारांचं मत!)फ्लाय ओव्हर खाली उभी होती. मागे पुढे, बघावं तिकडे बस, कार, फटफट्या यांचा नुसता पुर आला होता. एरव्ही भारताच्या प्रगतीचं हे चित्र बघून सदुला भरुन आलं असतं पण आत्ता नुस्ताच कंटाळा आला. द्राविडी सुंदरी परत झोपली होती म्हणजे कुणाशी बोलण्याचा प्रश्न नाही. खिडकी बाहेरची ही..गर्दी पाहून त्याला वाटलं सगळेच कंटाळले असतील का? या गर्दीत कोण काय विचार करत असेल? रोज घरी गेल्या गेल्या बायको आधी त्याचं स्वागत करणारया शुभ्रा आणि सुलेखा (पक्षी पार्वती आणि इंदुमती) या बाया त्याला आठवल्या. लोकांच्या मनात प्रवेश करणे, त्यांच्याकडून हवी ती कृत्यं करुन घेणे ही त्यांची विद्या आत्ता आपल्याला अवगत असती तर काय बहार आली असती असं त्याला वाटून गेलं. आणि काय आश्चर्य! बघता बघता सदु मनकवडा झाला. लोकांच्या मनातला गोंगाट बाहेरच्या कोलाहलापेक्षा कैक पट जास्त होता.

सदुनं खिडकीबाहेर बघितलं. बाहेर रस्त्यावर फ्लेक्सबोर्डची जत्रा होती. कुणी सार्वजनिक शौचालय समितीवर निवडुन आलं होतं, कुणाला दादांच्या आशिर्वादानं अठरावं वर्षं लागलं होतं, असंख्य जयंत्या-मयंत्या, कुणी बराक ओबामाचं निवडुन आल्याबद्दल अभिनंदन करत होतं तर कुणाला कुठल्या बाबाच्या कृपेनं पोरं झालं होतं. सारं कसं स्वच्छ, सार्वजनिक, पारदर्शक सुरु होतं! एका फ्लेक्सबोर्डावर मावळ्याच्या वेषात एका पोराचा फोटो होता. प्रणवदादांना दहा पुर्ण झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन करायला कोण नव्हतं? म्याडम, जान्ते राजे, त्यांचे पुतणे, आदरणीय मुख्यमंत्री, लाडके आमदार, मार्गदर्शक खासदार, खालच्या रांगेत गं.भा. चंद्रवतीबाई अश्श्श्शी फोटोची नुस्ती झुंबड उडालेली. कोपरयात महाराजही होते आणि भगव्या अक्षरात ठळक लिहीलेलं "महाराज, तुम्ही याच! मावळे तयार आहेत." हे महाराजांना आमंत्रण होतं की आव्हान, सदुला काही कळालं नाही. आणि गंमत म्हणजे त्याच बोर्डाखाली कसल्याशा रांगेत प्रणवदादा उभे. सदुनं चट्कन त्याच्या मनात उडी मारली. " च्यामायला, गावभर आम्चे फोटो लागले तरी बी आमच्या मागची लाईन काई सुटत नाही. मास्तर वर्गात कुजकट हसतय. गेल्या यत्तेतलं प्रगती पुस्तकपन छापा म्हने बोर्डावर. मायला. बापसाला पन आत्ताच फोटो छापायचा होता, त्येबी फॅन्शी. गावात सग्ळे पन्या म्हन्त्यात आन हितं प्रणवदादा. आजकाल बापुला काय जालयकी. सगळ्यांना आवो-जावो करतो. त्येच्या कडेवर बसून मिशा वोडत मुतायचो तवा बी पन्या म्हनायचा आन आता काय? प्रनवदादा, आक्कासायब..आक्की कसलं भारी म्हनायची मायला..मम्मे मम्मे. त्येबी बंद केलं. आईसायब म्हनायचं म्हनं. दिवसा आईसायब आन रात्री दारु पिवून तिला मारायचं. वा रं दादासायब! मायला रांग सरकती काय नाय फुडं?" सदुनं बाहेर डोकावुन बघितलं. सार्वजनिक संडासाच्या लायनीत प्रणवदादांना बघून त्याला घाण मळमळलं.

आता पुढं कुणाला गाठावं या विचारात असतानाच सदुला गर्दी नियंत्रण करणारा मामा दिसला. सदु लहान असताना त्याला पोलिसंच व्हायचं होतं. खाकी शर्ट चड्डी, हातात प्लास्टीकची बंदुक, डोक्यावर इन्स्पेक्टरची टोपी या अवतारात त्याचे लहानपणीचे फोटो पाहाताना आता जरी त्याला लाज वाटत असली तरी मनात कुठेतरी सुप्त आकर्षण होतंच. नेहमीच्या मामांपेक्षा हा मामा बारीक आणि कमी उग्र होता आणि त्याच्याकडे फट्फट आवाज करणारी फट्फटीपण नव्हती. सदु त्याच्या मनात डोकावला.

"शिट्टी गेली
गेली गाडी
चड्डी गेली
गेली नाडी
तरीही मी उभाच

वॉकी गेली
टॉकी गेली
साहेब आले
येतच राहीले
तरीही मी उभाच

गाडी थांबे
ट्रॅफिक तुंबे
सिग्नल लोंबे
गर्दी झोंबे
तरीही मी उभाच"

पोलिस आणि कविता? सतत घसरणारी खाकी फुल्ल चड्डी, त्यात कोंबलेलं पोट आणि वरुन तो गोल प्रकार झाकु पाहाण्याचा आटोकाट प्रयत्न करणारं शर्ट नामक वस्त्र, डोक्यावर दिशादर्शक टोपी आणि गेस व्हॉट? दहा पंधरा दिवस न केल्याने वाढलेली कवी-दाढी आणि खांद्याला कवी-शबनम घेऊन मामा बुलेटच्या सीटावर डोकं टेकवुन कविता लिहीतोय! सदुला नुस्तं ईमॅजिन करुनही धडधडलं. कविता करणारा पोलीस या उपर त्याला सहन नाही झाला आणि तो निघाला. मग त्यानं शेजारच्या भाताच्या ढिगात डोकावायचा प्रयत्न केला. शब्दांची अगम्य रांगोळी ऎकून त्याने ताबडतोब पळ काढला.

चार सिटा सोडून पलीकडे कुणी मुलगी बसली होती. सदुनं कुणाला न समजेल अश्या रितीनं मान वाकडी करुन तिच्या आयडी कार्डवरचं तिचं नाव वाचलं रो-हि-णी कां-ज-र...मान दुखायला लागली तसा सदु थांबला. तिच्या मनात डोकावताना सदुला गुलाबी चोरट्यासारखं वाटलं पण तो घुसलाच. " काय तर प्रश्न आहे? ट्ट्म्म फुगणारी गोल पोळी कशी करावी? पोळी करुन तिला किंचित छिद्रीत करावे आणि त्यात फुग्यासारखी हवा भरावी!! ब्रम्हज्ञानी गुगलवर शोधायचं म्हटलं तर की-वर्ड काय टाकु? पोळी? की ट्ट्म्म फुगणारी गोल पोळी? पोळीला द्या गोळी, सासुमां की जय. त्या दिवशी त्या सायकलवाल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न न करते तर
आज या धुराड बशी ऎवजी कारने ऑफिसात येते. मी गाडी रस्त्याच्या काठावरुन चालवत होते, सायकल दिसल्यावर ओरडून सरकायला ही सांगीतलं पण मेला हलायलाच तयार नाही. आणि आमचा नवरोबा, मलाच शिव्या घालतोय. आता खिडकीची काच बंद आहे हे मला कसं कळणार? रस्त्याकडे बघायचं की खिडकीकडे असं विचारल्यावर नवरयाने काय तो लुक दिला! आणि कारचा भोंपु , तो मेला सापडत नाही ऎन मोक्याच्या वेळी. मरो. गेल्या गेल्या त्या टेस्टरला कोड द्यायचा आहे. मेला म्हणतो कसा म्याडम, बहुत डिफेक्ट आ रहे है...अरे गाढवीच्या मी डिफेक्टफ्री कोड दिला तर तुझा जॉब जाईला नां. मरो. गेल्या गेल्या आधी ट्ट्म्म फुगणारी गोल पोळी वर गुगल करायचं. नवरे लाडावुन ठेवल्याचे परिणाम..." "आता नवरयाचा, आणि मग सासुचा उद्धार!" सदुला पुढचा ट्रॅक बर्रोब्बर कळाला आणि तो तिथून घाईघाईने निघाला. स्त्री-मन नावाचं अगम्य कोडं किंचित कां होईना म्हणून त्याने देवाचे आभार मानले.

"च्यामायला, कापून ठेवलं असतं." सदुनं दचकुन आवाजाच्या दिशेनं बघितलं. गळ्यात कुत्र्याला घालतात तशी जाडसर पण सोन्याची साखळी, कवटीला ताण नको म्हणून उडून गेलेले केस, कर्कश्श काळा वर्ण, बाह्या वर ओढलेला लाल शर्ट आणि बुडाखाली शर्टच्याच रंगाची बाईक. "सापडलं असतं बेनं तर जित्तं नस्तं सोडलं पन पळून गेलं. च्यामायला, येव्हड्या वर पान्याच्या टाक्यावर चढनार कोन? भोसडीच्याला म्हायती असनार मला उंचावर चडायचं भ्या वाटतं म्हनून तिकडुनच पळालं." व्हर्टिगो असणारा गुंड पाहून सदुला धमाल मजा वाटली. एका उंचावर टांगलेल्या फ्लेक्सबोर्डावर ही स्वारीपण होतीच. अचानक गुंडादादाच्या नावामागं लागलेल्या पै. उपाधीचा उलगडा सदुला झाला. पै. म्हणजे पैलवान! कै. च्या चालीवर सदुनं गुंडादादाला पै.-पैगंबरवासी करुनच टाकलं होतं. हे भुत जिवंत पाहून सदुला पुढचा प्रश्न पडला. गुंडादादाच्या बाजुला चार-आठ शेणफडी मुलं होती. त्यांच्या नावामागंही पै.च होतं. १०-१५ वर्ष वयाची भुस्कट पोरं पाहून सदुला त्यांच्या दंडात बेटकुळ्या सोडून द्या टॅडपॉल तरी असतील का असा प्रश्न पडला.

सदुच्या प्रश्नांना तसा फारसा काही अर्थ नसतो. ते पडतात आणि गळून जातात.

बस हलली तसा सदु भानावर आला.

बस मधे बसलेले सारे सदु सावरुन बसले.



खरं म्हणजे या गोष्टीचं नाव सदुची जादु, जादुचा सदु, मनकवडा सदु, सदा-सर्वदा-सदु असं काहीही होवु शकतं. पण सदु एकदम ऑर्डिनरी. सारे सदु एकदम शोधायचे तर वाईल्ड-कार्ड सर्च बरा पडतो म्हणून गोष्टीचं नाव सदु स्टार डॉट स्टार

Sunday, July 5, 2009

सुफी-(याना)-(नामा)

"आपल्याला मुलगी झाली तर आपण तिचं नावं सुफी ठेवु!" माझ्या गंभीर प्रस्तावावर उत्तरादाखल फक्त एक ठसठशीत मौन! याचा अर्थ कॅपिटल बोल्ड फॉन्टमधे "नाही" असा होतो हे सरावाने उत्तम संसारपट्टुला उमजुन येते. मुलगा झाल्याने नैसर्गिकरित्या प्रश्न सुटला.

कुठून आलं हे नाव डोच्क्यात? थोडासा मेमरी जॉग. कश्मिर दुरदर्शनवर झिंटबेबी नाचतेय "बुमरो बुमरो." पारदर्शी चेहरयाचा ह्रतिक खुप वर्षांनी तिला भेटायला आलाय. त्याची सहजगत्या थिरकणारी पावलं, साधेपणातूनही न लपणारं ग्रीक गॉडत्व, निरागस चेहरयामागचा दहशतवाद आणि तिचं ओसंडुन वाहाणारे हसु, त्याला भेटल्यावर देहबोलीतून अखंड पाझरणारा अविश्वास, आनंद, आश्चर्य यांचं भन्नाट मिश्रण. मंत्रावल्यागत तिचं नाव त्याच्या तोंडून बाहेर पडतं "सुफी..."

नव्हे; सुफीचा संदर्भ असेल तिथे पण उगम नाही. सम मोअर ब्रेन-ड्रॅग.

लख्खावलेले इंजिनिअरींगचे दिवस. नुसरतचा संगम कुठूनसा हातात आलेला.

जुल्फे उलझाए तो दुनिया परेशां हो
जुल्फे सुलझाए तो ये झिस्त आसान हो
जुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसीं
रेशमी रेशमी अंबरी अंबरी

आणि मग खुळावल्यागतच झालं. सुफीच्या जन्मखुणा या इथल्या.



स्वस्तात मिळणारया हार्मोनिअमवर पट्टी इतकीच झिजून गेलेली बोटं सराईत;
सुरांचं भान नाही की ते बेभान आहेत सांगणं कठीण;
ढोलकीचं कमावलेलं कातडं कडक वाजतय
"चढता सुरज धिरे धिरे ढल जायेगा"

टाळ्यांच्या कोरसला पार्थिव पार्श्वभुमी
पीर, थडगे
उद्ध्वस्त फकीराचा एकट दर्गा

साद-प्रतिसाद, सवाल-जवाब, फॉलो-थ्रु
रॉ किंवा सिनेमास्कोप
कव्वालीचा झिलकरी
गातच राहातोय

हराम वर्तनाला
धार्मिक वतन?
ऎकावं ते ते नवल!

"मैने काबे का हज कर के देख लिया"
कव्वाल, तुझ्या सहाशे वर्षाच्या इतिहासाचा भुगोल
बदलतोय

सिंहासनावरुन परमेश्वराला खेचलय कुणी
आणि काळजात खोचलय कुणी

प्रेयसीची गाणी समजता काफीर?
कंट्रोल एफ़ प्रेयसी रिप्लेस वुईथ बाप्पा
"तेरा तुझ को सौंप दे क्या लागत है मोर
मेरा मुझमें नाहीं जो होवत सो तोर"

सुफी,
ह्र्दयावर गोंदवावं
आत्म्याला पिंजून काढावं
वैराण फासळ्यांना अज्ञाताचं आव्हान करावं
इतका का परमेश्वर जवळ असतो तुमच्या सुरांच्या?
कंठाळ कोरस जाऊन ड्र्म्सचे प्लास्टीक, इलेक्ट्रॉनिक बीट्स आले
रागातून सारंगा, तुम्ही सरगम आणले
पण तुमच्या प्रार्थनांची मग्नता कश्यानेच मोडली नाही.
डोळे उघडावे कशाला?
"नैनों को तो डसने का चस्का लगा रे"
आतल्या आतच उघडतात आणि मिटतात तुमचे ऎहीक डोळे.
आतल्या आतच होतात तुम्हाला दिव्यत्वाचे साक्षात्कार.
दिव्याला पाहून नमस्कार.
सुफी,
तुमच्या सुरांनी भरती आलेले
समुद्र लपवताना तारांबळ उडते तेव्हा
आमचेही डोळे उघडतात आणि मिटतात आतल्या आत

Saturday, June 20, 2009

...आणि डार्लिंग

"आठवणी येताहेत जन्मापासून
जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. गर्भाशय हादरले,
तडकले, जागोजाग तेव्हाच्या.
आठवणी येताहेत तळघरातील भातुकलीच्या शेजारी
निवांत निजलेल्या अधोरेखित टिपणाच्या.
..
आठवणी येताहेत पहाडामागून, पहाडापूर्वीच्या.
एका उपनदीचे नाव डार्लिंग."




नदीला असतात आकार, उगम, अंत आणि काही नावे. मी अगस्त्य, समुद्र म्हणू तुला डार्लिंग? अट्टहास आणि परिणाम एकत्र तोलायचे नाहीत या जीवघेण्या बोलीवर तुझे अनंग अस्तित्व वसतीला आले माझ्या. शब्दहीन अर्थांचे पुंजके लगडले आहेत मेंदुला तेव्हा पासून. रंगीत पुंजके. निळे, हिरवे पिवळे उदाहरणार्थ अनंतपण, वासना आणि विरक्ती अनुक्रमे. आणि हो काळे आणि पांढरेसुद्धा. निम्बस; घनकल्लोळ काळेपणाला आकृतीबंधात गुंफणारा सोनेरी धागा, तो ही आहेच. रंगांचे इतके सहजी वर्गिकरण होणे नाही पण पॅलेटमधे कुस्करलेल्या रंगांच्या ट्युब्स काही तरंग सोडून जातात मनात. मी मुळचाच निसर्गवादी; पुज्य आणि सांख्य, धन आणि ऋण, निर्मिती आणि विनाश आणि हो, काळे आणि पांढरे एकत्रित आवडतात मला. या न्यायाने तुझ्या अनंग अस्तित्वाचे दुसरे शारीर टोक असणार कुठे तरी. शोधु म्हटले तर सापडणार नाही. आभाळ थोडेसे कलेल तेव्हा हाकेच्या अंतरावर थांबशील तू? कावळ्यांचे हाकारे रान उठवित नाहीत पण आत्ममग्न जंगलाची वीण उसवण्याचे सामर्थ्य असते त्यांच्या ओरडण्यात.



तू अर्थ, माझ्या शब्दातीत, शब्दहीन कवितांचे. अनुभवांचे, प्रतिमांचे ध्रुवीकरण झाले की गाभूळलेल्या पावूस थेंबागत मेंदुच्या कुठल्याश्या पाकळीत हल्केच फुलतेस तू. डार्लिंग, तुला जशी शब्दांची तहान नाही तसे मलाही तुझ्या वैश्विकरणाचे मोह नाहीत.



मैत्रिण आठवते मला. तिच्यावर रचलेले काही शब्दपुंजके, कविता म्हणते ती त्यांना, तिला भेट दिले कुणी. अपेक्षेपेक्षाही मला ते शब्दपुंजके दाखवुन वेडावण्याचेच भाव जास्त होते त्यात. काय साध्य करायचे असते त्यातून? माझी आत्ममग्न लय मोडण्याचे दुःसाहस? शब्दांची मायावी शक्ती? की डार्लिंग तुझ्या दुर्बोध, अशारीर अस्तित्वाला प्रत्यक्षात येण्याचे आव्हान?




"राम चालला पुढे असे जुनेच वाटले" आठवणी येताहेत जन्मापासून जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. अंधाराचा लख्ख कवडसा चमकतो क्षणभर. अहिल्येला मिळालेला शाप हे रघुरामाच्या स्पर्शापुरते निमित्त. स्पर्शाच्या साक्षात्कारात तुझे शब्दमल्हार, शब्दवेल्हाळ, शब्दगंधार अस्तित्व नव्याने उदयाला येते डार्लिंग आणि माझ्या कवितांना शब्दांचे शक्य आयाम मिळतात. तुझे आकार साकारताना माझ्या कविता देहचूर होतात.



राजपुत्र


लडाखच्या वाळवंटात बौद्ध भिक्षुणी चोरुन जमिन उकरते. खोलवर आत दडवलेला आरसा काढून स्वतःचे तारुण्य न्याहाळते. मोहाशिवाय मुक्ती नाही हे तिला कळेल कधी तरी? काही गोष्टी उगाच आठवत राहातात.

राजपुत्राने आरसा पाहीला. प्रतिबिंबाच्या डोळ्याला डोळा देताना बुबूळात उमटत जाणारया अंतहीन प्रतिमांच्या इंद्रजालाची त्याला भूलंच पडली. कवितांचे अमानुष वादळ संध्याकाळभर घोंघावत राहीले.

Thursday, May 28, 2009

भिंतीवरचे काळे धुके

"शेवाळ्यासारखं बुळबुळीत काही अंधार अधांतर भिंतभर पसरत होतं. धुरासारखं असलं तरी वास नव्हता त्याला. पण डोळ्यांवर अदृष्याचा पडदा ओढण्याचं अचाट सामर्थ्य मात्र होतं; धुक्यासारखं; तेही काळ्या रंगाच्या धुक्यासारखं. बघता बघता डोळ्यांदेखत घरातली भिंत काळवंडत गेली. ’ते विषारी आहे’ एक मन आतून ओरडलं पण नजरबंदीच्या प्रयोगासारखे माझे डोळे काळ्या ठीक्क पडलेल्या भिंतीवरुन काही हलत नव्हते. कुणीतरी आकाशगंगेतलं एखादं कृष्णविवर भिंतीवर मायाजालासारखं पसरवावं तसं समोरच्या भिंतीवरच्या काळ्या धुक्याकडे माझे पाय माझ्या ईच्छेविरुद्ध मला ओढत होते. अम्मांनं हाक मारली नसती तर कदाचित मी त्या धुक्यात विरुनही गेले असते. भिंतीवरची ओंगळवाणी पाल एकदा मारली तरी आपल्या मनात ती कितीतरी वेळा तडफडत मरतच राहाते तसं काही तरी झालय मला. मी ते काळं धुकं विसरुच शकत नाही. काही तरी अशुभ, विषारी आणि दुष्ट आहे इथे. आम्ही हे घर लगेच सोडलं. पण इथे जो कुणी नवीन राहायला येईल त्याच्या साठी मी, शवर्री किणी, ही नोट ठेवत आहे."


मी सलग दुसरयांदा हे पत्र वाचलं. हल्ली मी छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होत नाही. पण हे पत्र वाचून मी अस्वस्थ झालो. रादर, माझ्या घराबद्दलं असं लिहीणारया शर्वरी किणीचा मला भयंकर राग आलेला आहे. याच किणीबाईंनी एक वर्षापुर्वी याच फ्लॅटसाठी आक्काच्या किती मनधरण्या केल्या होत्या! जुना फ्लॅट आहे म्हणून भाडं ही कमी करुन घेतलं होतं. लोक सोईस्कररित्या विसरतात आणि लोकांच्या अश्या वागण्यानेच माझा संताप संताप होतो. टेक अ डीप ब्रीद. ..संतापामुळे फक्त नुकसानच होतं. पण किणीबाईंच्या एपिसोड नंतर इथे भाडेकरु मिळणं कठीण झालय हे खरं. आजुबाजुची मुलं देखील इथून जाताना चट्कन न बोलताच घाईघाईने पुढे सटकतात. माझं ठीक आहे, माझ्या काही फारश्या गरजा नाहीत पण आक्काच्या एक्कलकोंड्या संसाराला याच फ्लॅटचा टेकू आहे. निदान तिच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून का होईना, या फ्लॅटमधे कुणीतरी राहायला यायला हवं. मिस्टर गुरुनाथ शब्दे, टेक अ डीप ब्रीद...सगळं काही ठीक होईल. किणीबाईंची नोट तुमच्याच हातात पडली हे किती चांगलं झालं!

तुमच्याशी बोलत काय बसलोय? पुढचा भाडेकरु यायची वेळ झाली तरी मी अजून इथेच हे कळालं तर आक्का खवळेल. घ्या! आलीच वाटतं मंडळी.

गुरुनाथ शब्देंनी दार आतून उघडायला आणि लॅचची चावी फिरवुन आक्का आत यायला एकच गाठ पडली. दारासमोरुन उड्या मारत जाणारी दोन लहान मुलं अचानक आलेल्या कुबट गार वारयानं गुदमरायला झाली आणि शब्दांचं ओझं असह्य झाल्यागत चिवचिवाट बंद करुन चुपचाप चालती झाली. व्हरांड्यात घू घू करणारी कबुतरं मरणांतिक भीतीनं आवाज न करताच उडून गेली. आक्कांनी सांडणारं हसु ओठ दुमडून तिथंच थांबवलं आणि भसाड्या आवाजात त्यांनी "या" असं आमंत्रण दिलं. गुरुनाथ शब्देंनी अंग चोरुन आक्कांना आत येऊ दिलं. त्यांच्या मागोमाग आलेल्या पाहुण्यांनां आक्कांनी निरस सुरात विचारलं "नाव काय म्हणालात तुमचं?"


"नयन महेश्वरी" शंकाच नाही. अहो शाळेपासून सोबत होतो आम्ही. अगदी दोन वेण्या ते पोनी टेल असा सारा प्रवास मी तिच्या सोबत केलेला आहे. गेली १-२ वर्ष मी तिला पाहीली नाही म्हणून काय झालं? नो मिस्टेक, नयनच ती. शाळा-कॉलेजातले कोणतेही ग्रुप फोटो तुम्ही काढून बघाल तर नयनच्या जवळपास मी दिसेनच दिसेन. नाही, तशी घट्ट मैत्री वगैरे नव्हती आमची. मुलींशी मैत्री म्हणता आक्कानी उभा सोलला असता मला. आक्का सोडून बाई माणसाशी बोलण्याचा प्रसंगच आला नाही कधी. खरं तर हिंमत झाली नाही असं म्हणायला हवं आणि ..जाऊच द्या.

काही दिवस सुरळीत गेले पण नंतर..

नयन बेचैनपणे कुस पालटत राहीली. या जागेचे संकेत आणि ऎकलेल्या अफवा तिला अस्वस्थ करत होत्या. दाराच्या उंबरयावरच खिळा धसून पाऊल रक्ताळले होते तिचे. नवाच गृहप्रवेश केल्यासारखी पावलं उमटली होती तिची घरभर. आणि यावर त्या घरमालकीणबाई म्हणाल्यापण,"कशी लक्ष्मीसारखी पावलं उमटलीत. घर लाभणार तुम्हाला. आता काही सोडत नाही तुम्ही हे घर". आपण घराला की घर आपल्याला सोडणार नाही? नौकरीचा हट्ट न करतो तर आज स्वतःच्या घरात आपण झोपलो असतो, नयनने सुस्कारा टाकला.

नयनला लाभायलाच हवं हे घर. तुम्हाला सांगतो, स्वतःच्या घरापासून असं दूर राहून नौकरी करणं सोपं असतं का? मला वाटतं आय शुड स्पीक विथ हर. आक्काला अजूनही ते आवडणार नाही पण तिच्याशी मी बोललो तर तिला कदाचित एकटं वाटणार नाही. एकटेपणाबद्दल तुमचा काही अनुभव?

कुजत चाललेलं स्थिर पाणी, त्यावर शेवाळ्याचा हिरवट काळसर जाड थर. एखादा खडा उडून आला तर त्याला शोषून प्रत्त्युतरादाखल पाण्याचा एखादा थेंबही न उडवणारा असह्य डोह. जुन्या, अस्पर्श पाण्याला वासनेची डूब असते. ते अंगाला लागले की पाण्यालाच तहान लागते देहाची. स्पर्शासारखे देहभर पसरत जाते ते आणि उभ्या देहाचे पाणीच करुन टाकते. नयन अर्धवट जागी झाली ती अश्या काही तरी भयंकर विचित्र स्वप्नामुळे. तिच्या पलंगभर शेवाळलेले पाणी पसरले होते.

हे गुरुनाथ शब्देचं घर आहे? आक्कांना भेटून आल्यावर कितीतरी वेळ नयन विचार करत होती.
गु.. रु.. ना.. थ.. श.. ब्दे. गु..रु..लहानपणापासून तिच्या वर्गात असणारा एक किडूकमिडूक नगण्य मुलगा. भेदरल्या डोळ्यांचा आणि ज्याचे शब्द कधी ओठापर्यंत आलेच नाहीत असा मुलगा. ज्याने...

...ज्याने एक वर्षापुर्वी गावाबाहेरच्या जुनाट डोहात आत्महत्या केली तो गुरुनाथ शब्दे! नयन, आयुष्यभर तू कधी तरी माझ्याशी बोलशील याची मी वाट पाहीली. प्रत्येक फोटोत आपल्या आजुबाजुला धडपडणारा, मुकाटपणे परस्पर तुझी कामं करणारा सश्याच्या काळजाचा मुलगा तुला कधी तरी आवडेल असं मला वाटत राहीलं. पण तू तुझ्या जगात मश्गुल राहीलीस. मग मी हिंमत करुन आक्काला तुझ्याबद्दल सांगीतलं. बेभान आक्काचे अशुभ शब्द आठवले की अजूनही काटा येतो अंगावर. शब्दांनी शब्द वाढले आणि नकळत आक्काच्या प्रौढ कुमारीपणाचा उल्लेख झाला. तिरमिरीत आक्कानं तापल्या तेलाचं भांडं ढकललं आणि अंगभर आयुष्यसरुन उरणारया वेदनांचा डोंब उठला. संतापाच्या भरात दाह मिटवणारं पाणीच जवळ केलं मी. त्या शेवाळलेल्या गर्द काळ्या पाण्याने सारं देहपणच नष्ट केलं आणि तरीही फिरुन इथेच आलो मी, सारया अपुरया ईच्छा, वासना घेऊन, माझ्याच घरात. नयन, तुला आठवतय नां?

नयन बधीर होऊन पलंगाच्या काठावर बसली होती. परत परत हातातले फोटो चाळूनही तिला त्यातला गुरुनाथ शब्दे नक्की ओळखु येत नव्हता. खोलीभर पसरलेल्या अनंत शांततेचा कोलाहल तिला असह्य होत होता.

टेक अ डीप ब्रीद गुरुनाथ..तिला आठवेल. नाही आठवतय तिला. टेक अ डीप..श्वास नाही पुरत आता. टेक अ..श्वासाची गरजच नाही गुरुनाथ आणि नयनचा श्वास कोंडायला...

...बघता बघता खोली निर्वात होत गेली. नयनला वाटलं भिंती जवळ जवळ येऊन तिला चिणून टाकतील. अंधारातही भिंतींचं काळं होणं लपत नव्हतं. घरभर धुकं पसरत होतं. ओलं, शेवाळी, काळं धुकं.