Posts

Showing posts from November, 2016

टोगो आणि ज्येनुफी बॉईज

॥ १ ॥ एखाद्या वास्तुचा चेहरामोहरा हळु हळु त्यात राहाणाऱ्या माणसांसारखा होत जातो . नुक्तंच लग्न झालेल्या कुण्या नववधूची वास्तु अंगावर रंगांची उधळण मिरवत असते , तिचं नवथरपण , तिची अनाघ्रात वळणे कुठल्याशा चुकार क्षणी झट्कन दिसून येतात . एखादं रोपटं कुणाला न जुमानता सज्ज्याच्या तळातून उगवतं , ढासळत चाललेला एखादा अनवट चीरा जीवाच्या आकांतानी निर्जीव चुनखडीत बोटं रुतवु पाहातो , अश्या वास्तूत लांबलेल्या सावल्या पेलत जीर्ण वृद्ध तगून असतात . महालांचंही तसंच असतं . त्यांच्या चेहऱ्यावर उमटत नसतात कोणत्याच संवेदना , डोळ्यांनी दिसत नसतात जीवघेणी भुयारं - त्यांच्यात राहाणाऱ्या राजवंशी अस्तित्वांसारखीच . त्यामुळेच सबाला तिच्या महालाची झालेली वाटणी हृद्यभंगासारखी वाटली . सबाचा , सबाराणीचा महाल एकाच देठाला लहडलेल्या दोन फळांसारखा होता . अबोर आणि चिलका ; आरश्यातल्या प्रतिमा असाव्यात तसे दोन भव्य प्रासाद ! त्यांचे मार्ग वेगळे होते खरे पण त्यांचं उगमस्थान एकच होतं - कमलबिंदु . कमलबिंदुशी येऊन सबाराणी