Posts

Showing posts from 2012

रेषेवरची अक्षरे-5

यंदा दिवाळीच्या आधी "रेषेवरची अक्षरे"चा अंक प्रकाशित करणं जमलंच. स्काईप, फाईल क्रॅशेस, चर्चा, असंख्य ब्लॉग यांचा लसावी म्हणजे यंदाचा अंक. वाचा-इतरांना वाचवा- आणि कसा वाटला हे नक्की नक्की नक्की कळवा http://reshakshare.blogspot.in/

फट्! म्हणता कविता झाली

झाडे दिसताच                                        चिमणी झाली पाणी दिसताच                                    गाणी झाली शब्द मिळताच                                      शहाणी झाली फट्! म्हणता कविता झाली चंद्र कोरताच                                रात्र झाली धुक्यामधून                                     भ्रमिष्ट झाली मी म्हणताच                                   विश्व झाली फट्! म्हणता कविता झाली वही बुडवताच                               गाथा झाली कोरे पाणी                                 निळी झिलाई अर्थ नुरताच                             सार्थ झाली फट्! म्हणता कविता झाली

"मंद्र"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो

परत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण लिहीलं कुणीच नाही, कधी प्रतिसादच मुळात शुन्य, कदाचित खो खोचे विषय चुकीचे असतील, कधी वेळेचा प्रश्न असतो..काहीही असो पण ब्लॉगची सध्याची परिस्थिती भीषण आहे हे खरं. पण काही लोकांना राष्ट्रभाषेत सांगायचं तर गुडदा इ इ असतो. म्हणून परत एकदा नवा खो खो सुरु करत आहे . खो वाचा, त्याहून महत्वाचं त्यावर प्रतिक्रिया द्या आणि अजून महत्वाचं म्हणजे सहभागी व्हा . सोनुबाई आणि कथलाचा वाळा हा खो खो अश्या पुस्तकांकरिता आहे जे गाजले पण वाचल्यावर हातात भुक्कड काहीही आलं नाही . हा खो खो सुरु करताना काही साक्षात्कार झाले तेही सांगतो म्हणजे तुम्ही परत त्याच घोळात अडकणार नाहीत. हा खो खो जेनरसाठी नाही. म्हणजे आपले नेहमीचे गिऱ्हाईक वपु घ्या आणि कल्हई काढा असं इथे अभिप्रेत नाही. वपु हा एक जेनर आहे, ज्यांना ते आवडतात, त्यांना ते आवडतात. किंवा सु.शि किंवा बाबा कदम हे कसे अभिजात नाहीत यासाठी हा खो खो नाही. तुमच्या नेहमीच्या आवडीच्या किंवा गाजलेल्या लेखकाचं एखादं उगाच गाजवलेल्या

मत्त गे गंडस्थळ झिंगुरांचे (2)

  Read Part 1 - भाग १ मत्त गे गंडस्थळ झिंगुरांचे (1) ..."नवीन येणाऱ्यात नुस्ता पुष्कर नव्हता . त्याच्या मागोमाग आठवड्याभरात वि . र . सहमोरे सर पण आले , भुगोल शिकवायला .".... वि . रं नी पहील्याच तासाला येताना जगाचा थोर मोठा नकाशा आणला . " अय्या , सरांपेक्षा नकाशाची पुंगळीच जास्त उंचै " चिमणी पुटपुटली चिमणीचं पुटपुटणं बाजाच्या पेटीच्या भाषेत बोलायचं तर सर्वसाधारण वरच्या पट्टीत असतं . वि . रं गर्रकन वळले आणि खडुचा एक ढेलपा त्यांनी उभ्या जागून चिमणीला फेकून मारला . खडू मिसाईल भिरभिरत रस्ता चुकून मिस वनच्या चष्म्यावर ताडकन आपटलं . शंकरानं मदनाला बाण लागल्यावर जसं नजरेनंच जाळून मारलं , अगदी डिट्टो तोच लुक मिस वननं वि . रं ना दिला . वि . र सॉरी म्हणतील अश्या आशेनं किंचित तक्रारवजा सुरात मंजु म्हणाली " सर , खडु मला लागला " नाव काय तुझं ?" चढ्या स्वरात वि . रं चा प्रश्न . मिस मंजु पाटील " मंजुच्या या मिस प्रकरणामुळेच बियाण्यानं तिचं नाव मिस वन ठेवलं होतं . मिस ?" वि . रं चा स्वर कडसर झाला " मातृभाषेत कुमारी असं म्हणतात पाट

मत्त गे गंडस्थळ झिंगुरांचे (1)

यत्ता आठवी म्हणजे कंच चिंच . कुमार बियाणीनं शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्याभरात आपण माजावर आल्याचा दाखला दिला . त्यानं कुमारी लाहोटीच्या सायकलवर खडुनं आरपार बाण गेलेलं दिल चितारलं आणि सोबत किडमिड्या अक्षरात एक चिठ्ठी . कुमार बियाणी जात , धर्म , सांस्कृतीक आणि त्याहुन महत्वाचं आर्थिक , सामाजीक इ इ सारं सारं अभ्यासुन कुमारी लाहोटीच्या प्रेमात पडला होता . पण हाय रे किस्मत . आदीम काळापासून प्यार का दुश्मन जमाना . अकबरानं जसं अनारकलीला भिंतीत चिणून सलीमच्या प्रेमाचा निक्काल लावला तस्स्संच खेळ शिकवणाऱ्या राठौर सरांनी काडीमात्र बियाण्याला आपल्या साडेसहा फुटी विशाल देहानं ढकलत ढकलत भिंतीच्या एका कोपऱ़्यात जवळ जवळ चिणलाच . ते विस्मयकारी , अभद्र विनोदी , भितीदायक इ इ दृश्य बघून बाजूनं जाणारा डब्बल भिंग्या न किंचाळता तर प्रेमापोटी चिणला गेलेला पहीला वीर म्हणून अनारकलीसारखंच कुमार बियाणीचं नाव झालं असतं . यत्ता आठवीची सुरुवात ही अशी दणदणीत झाली . शाळेत निदान दीड डझन मास्तरांचं नाव कुलकर्णी . त्यामुळे प्रत्येक मास्तरांना विशिष्ट उपनाम होतं . असेच एक आप्पासाहेब कुलकर्णी उर्फ आप्पासाहेब आठवी ड चे वर्गशि

शब्द संपले तसा संवाद सुरु झाला

शब्द संपले तसा संवाद सुरु झाला जळणाऱ्या कोंभाच्या आचेने निबरत्वाचे बंध तुटले तंबोऱ्याच्या तारांवर ताणून बसवलेला तीव्र मध्यम रेझोनेट झाला पोक्त पिवळ्या नारंगी रंगांच्या पॅलेटमधल्या मिश्रणाशी मला गायचे नसते माझे गाणे झाले मौनाचे तल्खली ऍबस्ट्रॅक्ट झाले गोठलेल्या देवराईत अशब्दांचे कल्लोळ झाले

सरसकट गोष्ट (२)

एमबीए म्हणजे धर्मराजाचा रथच जणु, जमिनीला स्पर्श न करता दशांगुळे वरुन चालणारा. म्हणजे असं एमबीए न झालेल्यांना वाटतं. खरं तर एमबीए झालेल्यांनाही असंच वाटतं. पण राजाराम उर्फ आर आरला असं वाटत नाही. कारण तो या गोष्टीचा बहुदा नायक आहे. तो जुन्या सिनेमातल्या नायकासारखा खुप गरिबीतून एमबीए झालाय. पण तो जुन्या सिनेमातल्या नायकासारखा गाजर हलवा, मुली का पराठा असं खात नाही, उठसुठ तो मां असा टाहो फोडत आईला बिलगतही नाही, मात्र तो जुन्या सिनेमातल्या नायकासारखा फर्स्टक्लास फर्स्ट आलाय, तेही आय आय एम सारख्या प्रिमिअम बी-स्कुल मधून. त्याला कॅम्पसमधून उच्चकोटीची नौकरी लागूनही तो नम्र इ आहे. असं असलं की माणसाची मुल्य वगैरे उच्च आहेत असं म्हणण्याची पद्धत आहे. हल्ली नागरीकशास्त्रासारखं मुल्यशिक्षण वगैरे शिकवतात म्हणे आय आय एम मधे, स्कोरिंगला बरं असणार. चिकट साखरेवर घोंघावणारी माशी वरच्यावर टिपावी तसं मायकी फर्नांडोनामक इसमाने आर आरला कॅम्पसमधे वरच्यावर उचललं. मायकी फर्नांडो नावावरुन जरी गोव्याच्या किनारी फेणी रिचवणारा किडूकमिडूक माणूस वाटत असला तरी तो जगप्रसिद्ध वगैरे असतो. जगप्रसिद्ध माणसं उधारी बाकी असल्य

सरसकट गोष्ट

एखादी कल्पना स्वतःची ओळख घेऊन येते, स्वतःचा फॉर्म घेऊन येते असं नेहमीच म्हटलं जातं. "सरसकट गोष्ट" जेव्हा सुचली तेव्हा तिचा फॉर्म सरसकट असणार नाही हे कुठं तरी ठाऊक होतं. पण वेळ, इच्छाशक्ती इ च्या अभावापाई ही गोष्ट मुळात अशी लिहीली गेली. एक गंमत, प्रयोग म्हणून दोन्ही फॉर्म (हा + थोडासा मला अपेक्षित) पोस्ट करत आहे. कुठला जास्त आवडला नक्की कळवा ॥गोष्ट॥ एखाद्या घटनेची सत्यता आपण अनुभवसिद्धतेवर पारखुन घेतो. राजाराम इथून पुढे जे सांगणार आहे ते कितीही अत्यर्क वाटले तरी त्याची गोष्ट खोटी असं का कोण जाणे पण म्हणवत नाही. ही गोष्ट राजारामच्या मते भविष्यात घडलेली आहे पण काल हा सापेक्ष असल्यानं भूत-भविष्य अश्या क्रमाला काहीच अर्थ नसतो. ॥ राजाराम ॥ आय आय एम ला नंबर लागणं, तिथे टॉप करणं हे जर स्वप्नवत असेल तर मायकीसाठी काम करणं हे पहाटेच्या स्वप्नासारखं होतं; विशफुल थिंकिंग! मायकी- माईक फर्नांडो म्हणजे ह्युमन रिसोर्सिंग क्षेत्रातला दादा. त्याला स्वतःला ह्युमन रिसोर्सिंग या शब्दाचा तिटकारा आहे. धातु, वीज, पैसा हे रिसोर्सेस झाले; त्याच पट्टीवर माणूस कसा मोजायचा असा त्याचा रास्त सवाल.

आभासी विश्वाचे वास्तव

वेब २.० आलं आणि दुतर्फा संवादाच्या असंख्य शक्यता नव्याने जन्माला आल्या. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग इ. ही सारी वेब २.०ची अपत्ये. प्रत्येकाचा हेतु एकच-संवाद. संवाद या एका मुलभुत गरजेच्या किती म्हणून मिती असाव्यात याच्या साऱ्या कल्पनांना मोडीत काढत, या माध्यमांनी, नवनवीन आभासी विश्वांना जन्म दिलाय. ब्लॉग बद्दल बोलायचं तर थोडसं नोंदवही/डायरी, असं रुप असलेलं, तुलनेनं अनाकर्षक असं हे माध्यम. आपण लिहीलेलं कुणी आणि का वाचावं या संभ्रमात असलेले ब्लॉगर्स (ब्लॉग-लेखक), शब्दांच्या महापुरात नेमकं काय आणि किती वाचावं याचा अंदाज घेऊ न शकणारे वाचक आणि (मुख्यतः) इंग्रजीतून संवादाचं बंधन यामुळे या माध्यमाचं भविष्य काय हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच युनिकोडच्या रुपानं प्रादेशिक भाषांमधे लिहीणाऱ्यांसाठी एक छोटीशी क्रांतीच झाली. युनिकोडमुळे कुठल्याही विशेष सॉफ्टवेअर्सच्या गरजांशिवाय मातृभाषेत लिहीण्याची सहजच सोय झाली. बघता बघता मराठीतही ब्लॉगर्सचा सुकाळ झाला. साहित्यीक, पाककलाविषयक, भविष्याबद्दल, तांत्रिक माहीती देणारे असे एक ना अनेक विविध विषयांवर मराठी ब्लॉग वेगाने उदयाला आले आणि बरेचसे वेगाने बंदही झाले. याच