Posts

Showing posts from March, 2007

व्हीन्सेंट व्हॅन गॉग

व्हीन्सेंट व्हॅन गॉग तारवटलेल्या डोळ्यांनी व्हीन्सेंट डोळ्यातील सूर्य कॅनव्हास वर उतरवीत राहीला पॅलेटमधे राहीलेला पिवळा रंग ईथर सारखा तरल माझ्या डोळ्यात भूतकाळ साकाळून माझं रक्तही तिथेच गोठलेलं इथे एक आवाज झाला तर मेंदूला वेदनांचे धुमारे फुटतात फोटोफोबीया, फोनोफोबीया, ओस्मोफोबीया... वेदमंत्रासारखे मायग्रेनचे सारे ट्रॅक्सचे मला आठवत राहातात मी स्तब्ध जसे की मला काहीच समजत उमजत नसते like a vegetable व्हीन्सेंट तरीही सूर्य रंगवीत असतो ------------------------------------------------------------------------------------------------ कविता इथेच संपते? एमिली डिकीन्सनच्या ओळी जुळ्या कवितेसारख्या तरीही अस्वस्थ करत असतात We don't cry- Tim and I, We are far too grand- But we bolt the door tight To prevent a friend- ... We must die -by and by- Clergymen say- Tim-shall-if I -do- I - too- if-he- How shall we arrange it- Tim-was-so-shy? Take us simultaneous-Lord- I-"Tim"-and Me!

आजीची गोष्ट

देशपांडे गल्लीच्या वळणावर गाडी आली की माझं रडणं सुरु व्हायचं " मी आज्जी कडे राहाणार नाही". लहान होतो, कोण ऎकणार? बहुतेक वेळा ताई सोबत असायची, तिला फार आवडायचं आज्जीचं घर. एकाच गावात आहोत तर कधी कधी आज्जी कडे का राहायचं हा कधीच उत्तर न मिळालेला प्रश्न डोळ्यात नाचत असतानाच आज्जीचं घर यायचं. आज्जीचं घर होतं लहान पण होतं गोष्टीतल्या सारखं. एक अंधारं स्वयंपाघर, बाहेर एक पडवी, छोटं अंगण, मग वरची खोली, तिच्या बाहेर गाय बांधलेली. प्रत्येक जागेची आपली एक ओळख होती. स्वयंपाघर भलं चांगलं आडवं होतं, गणितातल्या आयता सारखं. त्याला दोन छोट्या पण ऊंचं खिडक्या होत्या. बहुतेक वेळा तिथे अंधार असायचा आणि आज्जीची आणि आमची खूडबूड. आज्जी खाली बसून स्वयंपाक करायची आणि आम्ही तिच्या आजूबाजूला उंडारायचो. घरून आणलेली पुस्तके संपली की आज्जी कडचं सुपरहीट पुस्तक "चातुर्मास" ही चालून जायचं, कधी कधी बिचारं दाते पंचांगाचाही नंबर लागायचा, पण ते फार बोअर होतं. आमचं मुख्य आकर्षण होती ती वरची खोली. तिच्या खाली एक तळघर आहे आणि त्यात खजिना आहे असं कुणीतरी आम्हाला सांगीतलं होतं त्यामुळे आमच्यातला फास्टर फेण

पुल, संत आणि मराठी माणूस

या सगळ्या व्यक्ती/समाजाबद्दल अनेकांनी अनेक ठिकाणी लिहीलेले आहे, त्यात आता माझी ही भर! आपल्याला आपल्या श्रीमंत संत परंपरेचा भरपूर अभिमान आहे, पण माझ्या मते मराठी माणसाचं या सगळ्या प्रकारात खूप नुकसानही झालं आहे. रामदासांचा अपवाद वगळता, आपले बहूतेक संत या जगाबद्दल काहीच बोलत नाहीत. जे जग आपण पाहीलेच नाही त्याचे स्वप्नरंजन करण्याची एक घातक सवय या समाजाला लावली. याही पलीकडे जाऊन, आपले राहाते जग ही एक ताबडतोब सोडावी अशी जागा आहे, इथे मिळणारया प्रत्तेक सुखाची किंमत "तिथे" चुकवायची आहे, तेंव्हा ही सारी सुखे म्हणजे पाप आहे, मिथ्या आहे असा काहीसा अविर्भाव कितीतरी अभंगात दिसतो. अर्थात याचीच चांगली बाजू म्हणजे मराठी समाज भोगवादी झाला नाही. आश्चर्य वाटत ते रामदासांचं. ज्या माणसाने कधीही संसार केला नाही, तो अधिकारवाणीने इतका सुंदर उपदेश करु शकतो? ज्या काळात व्यवस्थापन शास्त्राची सुरुवातही झाली नव्हती, त्या काळात हा माणूस कालातीत सुत्रं सांगतो? पण हा अपवाद! आणि अपवाद हे उदाहरण होऊ शकत नाही!! दुसरा अपवाद ज्ञानेश्वरांचा ज्यांनी ही माझी लिहीती भाषा मला दिली!! तर अश्या मुशीतून तयार झालेला हा म

कवितांचा गाव..

इयत्ता ९वीतली गोष्टं आहे, कुळकर्णीबाई (तेंव्हा "मॅडम"चं राज्य नव्हतं!) "चिमण्या" नावाचा धडा शिकवत होत्या.."आणि हा धडा ग्रेस या लेखकाने लिहीलेला असून तो माणिक गोडघाटेंनी भाषांतरीत केला आहे"..अस्मादिकांनी ताबडतोब तीव्र निषेध व्यक्त केला.."बाई बाई..माणिक गोडघाटे म्हणजेच ग्रेस..एकच आहेत..टोपणनाव!!" बाईंनी उदार मनाने चूक कबूल केली आणि आमची छाती अभिमानाने भरुन आली. ग्रेसची आणि माझी ओळख अशी अपघातानेच झाली. आता थोडा अजून फ्लॅशबॅक.. घरात उठताबसता पुस्तकांची चर्चा सुरु असायची..आई दादा मराठीचे प्राध्यापक होते (आमच्या सुदैवाची हद्द!) आणि दादानां कवितांचा विलक्षण नाद. आमच्या लहानपणी त्यांनी किती तरी कविता आमच्याकडून चालीत पाठ करुन घेतल्या होत्या पण कवितांसारखा सुंदर अनुभव, सरकारी कॄपेने काही गुणांचा आणि आम्ही अजून थोडे हुशार असल्याने, निबंधात चांगली छाप पाडण्यापुरता मर्यादित होता. पण या "चिमण्या" प्रकारेने कशी ती माहीत नाही, एक जादूच केली. कवितांच्या बाबतीत शक्यतो बालभारतीच्या पुढे न जाणारी आमची गाडी सरळ संध्याकाळच्या कवितांच्या दारात येऊन ठाकली. मग

भय शब्दांचे...

भय शब्दांचे कधीच नसते, नव्हतेही. पण कोणत्या तरी अनवट क्षणी शब्द फसतो. तो अर्थ शब्दापलीकडे जाऊन उरतो. मग मला ग्रेसच्या ओळी आठवतात..मन अर्थव्याकूळ होते.. "भय इथले संपत नाही" मौनराग मधे एलकूंचवार लिहीतात, "मला घराबाहेर ऊपसून काढलं". ऊपसून काढणं यातील वेदना वेगळी आहे, त्यात जोर आहे, त्वेष आहे. जसं पाणी ऊपसून काढतात तसं कोणी तरी कोणालातरी ऊपसून काढतं? साजणवेळात मुकुंद गातो " कसल्या दुःखाने सुचते हे गाणे, गळतात पाने झाडांचीही" किंवा "पुरातून येती तुझे पाय ओले, किती अंतराळे मधे मोकळी". त्याच्या गाण्यातली आर्तता शब्दात कशी बरे मांडावी? अख्तर बाईं सारखा मधेच त्याचा आवाज मधाळ फाटतो (त्याला पत्ती लागणे असेही म्हणतात!), त्या अनुभवाला कसे वर्णावे? किशोरीबाईंचा हंसध्वनी किंवा कुमारांचा "उड जायेगा" मांडायलाही माझ्याकडे शब्द नसतात. पण हे अनुभव असे सहजासहजी सोडत नाहीत. एकेक शब्दावर जीव आडतो. हा सारा अट्टहास अश्याच न उलगडलेल्या कोड्यांसाठी.. त्यांच्यासाठी हे संदिग्ध अर्थाचे उखाणे!! "डोळ्यांचे धुके होण्याआधी पानापानांना फुटावे गाणे तुझ्या हाती विसाव