भय शब्दांचे...

भय शब्दांचे कधीच नसते, नव्हतेही. पण कोणत्या तरी अनवट क्षणी शब्द फसतो. तो अर्थ शब्दापलीकडे जाऊन उरतो. मग मला ग्रेसच्या ओळी आठवतात..मन अर्थव्याकूळ होते..
"भय इथले संपत नाही"
मौनराग मधे एलकूंचवार लिहीतात, "मला घराबाहेर ऊपसून काढलं". ऊपसून काढणं यातील वेदना वेगळी आहे, त्यात जोर आहे, त्वेष आहे. जसं पाणी ऊपसून काढतात तसं कोणी तरी कोणालातरी ऊपसून काढतं?
साजणवेळात मुकुंद गातो " कसल्या दुःखाने सुचते हे गाणे, गळतात पाने झाडांचीही" किंवा "पुरातून येती तुझे पाय ओले, किती अंतराळे मधे मोकळी". त्याच्या गाण्यातली आर्तता शब्दात कशी बरे मांडावी? अख्तर बाईं सारखा मधेच त्याचा आवाज मधाळ फाटतो (त्याला पत्ती लागणे असेही म्हणतात!), त्या अनुभवाला कसे वर्णावे?
किशोरीबाईंचा हंसध्वनी किंवा कुमारांचा "उड जायेगा" मांडायलाही माझ्याकडे शब्द नसतात.
पण हे अनुभव असे सहजासहजी सोडत नाहीत. एकेक शब्दावर जीव आडतो.
हा सारा अट्टहास अश्याच न उलगडलेल्या कोड्यांसाठी..
त्यांच्यासाठी हे संदिग्ध अर्थाचे उखाणे!!

"डोळ्यांचे धुके होण्याआधी
पानापानांना फुटावे गाणे
तुझ्या हाती विसावताना सुटावेत
संदिग्ध अर्थाचे उखाणे"

Comments

Shantanu said…
Waah!
kadhi kadhi tar purna gaane kinva kavita keval ek shabdamuale/olimule avadun jate

ase sjun kunalahi avadate he vachun chhan vatale