Collage: उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म

कोलाज तुकडा १: मला "तुम बिन" सिनेमा विविध कारणांसाठी आवडला. त्या गोष्टीचा साधेपणा, पात्रांची संवेदनशीलता, गाणी इत्यादी इत्यादी..त्यात अजून एक मजेदार गोष्ट मला आवडते म्हणजे संथाली जेंव्हा प्रियांशुला सतत मधे मधे करण्यासाठी रागावते तेंव्हा तो बाहेर जाऊन पिज्झा घेऊन येतो आणि संथालीला सांगतो "मुझे जब भी कोई डांटता है, तो मुझे बहोत जोर से भुक लगती है." खाण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात!!

कोलाज तुकडा २: कॅन्टीन मधे मला जेवायला लागणारा वेळ हा तसा बरयापैकी थट्टेचा विषय आहे. म्हणजे मी अगदी "रवंथ" प्रकरणात मोडत नसलो तरी, शर्यत लागल्या सारखा ५ मिनीटातही मी "गिळू" शकत नाही. माझा अगदी साधा प्रश्न असतो, ही जी काही मरमर ज्या गोष्टी साठी सुरु आहे, तीच जर तुम्ही उरकणार असाल, तर कशाला अर्थ आहे? असो. हल्ली मी हा प्रश्न न विचारता, नवा प्रश्न विचारत असतो; "आज खाण्यासाठी जगणार की जगण्यासाठी खाणार?" थांबा. उत्तर द्यायची घाई करु नका. हा मोठा तात्विक प्रश्न नाहीये. याचा कॉमनसेन्सशीही संबंध नाहीये. जरा तुमच्या ताटात/डब्यात डोकावून बघा. आज तुम्ही सुरण, गाजराची रस्सा भाजी (पुण्यातल्या मेसवाल्यांचा हा शोध आहे. पेटंट प्रोसेस मधे असल्याने कॄपया ही भाजी सध्या घरी करु नये), आळूच फतफतं (भाजी नसून दलदल असल्यासारखं वाटतं नाही?) किंवा तत्सम भाजी आहे? असं असेल तर तुम्ही आज जगण्यासाठी खाणार! खाण्यासाठी जगायच असेल महाराजा, तर मोठं पुण्य लागतं पदराला. कॅन्टीन या जातीत मोडणारे असाल, तर हा प्रकार जरा uncontrollable होतो. या केस मध्ये तुमचा (पर्यायाने, कॅन्टीनवाल्याचा, भाजीपाला आणणारयाचा, बनवणारयाचा इ. इ.) पदर लयी मोठा लागतो. आणि पुण्यतर अजूनच जास्त. डबा (लिहीताना असा लिहीला तरी याचा खरा उच्चार डब्बाच आहे याची नोंद घ्यावी) प्रकरणवाले असाल तर थोडक्यात निभावतं. मागच्या पुढच्या जन्माचं सारं पुण्य जमा करायचं, कमी पडलं तर उधार उसनावार करायची पण पुण्य कमी पडता कामा नये आणि आपल्या सारख्या खाण्यापिण्याच्या (पिण्याभोवती "डबल कोट" नाही!!)आवडीनिवडी असलेला life partner शोधायचा. (अत्यंत चतूर लोकांना मी स्त्रीमुक्तीवाल्यांचा निषेधाचा कार्यक्रम हाणून पाडल्याचं लक्ष्यात आलं असेलच. तितक्याश्या चतूर नसणारया लोकांसाठी स्पष्टीकरण- मी life partner शब्द वापरला आहे, बायको नाही!!) ही सारी खाण्यासाठी जगणारया मंडळींची पुर्वतयारी झाली. याउपर शक्यतो भाजी आणताना सोबत जाणे जेणेकरुन गनिमीकाव्याने आपला घात होणार नाही याची काळजी घ्यावी. अजून महत्वाची सुचना म्हणजे स्वयंपाक सुरु असताना वादाचे मुद्दे न काढणे, त्याहूनही महत्वाचं म्हणजे सुचना न देणे. स्वयंपाकाच्या बाबतीत फुकटची कन्सलटन्सी हा "जे जे फुकट ते ते पौष्टीक" या नियमाला अपवाद आहे याची नोंद घ्यावी.

कोलाज तुकडा ३:गेल्या दिवाळीत आम्ही केरळला गेलो होतो. मनात पुकपुक होतीच. काय गिळायला मिळणार होतं देव जाणे. इयत्ता ५वीत असताना मी शाळेसोबत ट्रीपला हैद्राबादला गेलो होतो. २ दिवस उठताबसता भाताचा असा काही मारा झाला की मी भात खाणंच बंद केलं. आता केरळला जाऊन काय काय बंद होतयं बघू अश्या अत्यंत आशादायक विचारांनी भारुन आम्ही एकदाचे पोचलो. काय आश्चर्य!!! पुर्ण केरळभर आम्हाला पंजाबी खाण्याचा पर्याय मिळाला. पंजाबी लोक आक्रमक असतात माहीत होतं पण डायरेक्ट केरळ्यांच्या खाण्यापर्यंत पोचतील असं वाटलं नव्हतं. आम्ही आपले त्या खोबरेल तेलाचा अप्रतिम वास असणारं केरळीय अन्न चाखायला उत्सुक होतो आणि केरळी काही आमच्या हाती त्यांचा सांस्कॄतिक खजिना लागु देत नव्हते. एक अस्स्ल मराठी माणुस-केरळ मधे- पंजाबी खातोय!! राष्ट्रीय एकात्मता याहून वेगळी ती काय असते? शेवटी आम्ही डाव साधलाच (जनरली, नशीब डाव साधतं असा प्रवाद आहे. यावेळी आमचं नशीब फळफळलं). "पुट्टु" असं गोंडस नाव असणारा एक पदार्थ आम्ही मिळवलाच. एका वेबसाईट वर असणारं त्याचं वर्णन असं आहे : Puttu : 'Puttu' is made from rice flour and steamed in long hollow bamboo or metal cylinders. Depending on the taste preference, Puttu can be had with steamed bananas and sugar or with a spicy curry made from gram or chickpeas. थोडक्यात आम्ही अवियेल, अप्पम असे काही चांगले (असं म्हणतात बुवा लोकं) पदार्थ miss केले आणि पुट्टुची नळकांडी घश्याखाली घातली. Not bad!!

कोलाज तुकडा ४: खुप दिवस बाहेर गिळलं की मला घरच्या खाण्याची आठवण येते. सुगरण आई आणि नंतर सुगरण बायको मिळणं (सुगरण आई हे दैव आणि सुगरण बायको हे कर्म असं याच वर्गीकरण आहे!) आणि अस्मादिकांना स्वयंपाघरातलं ओ की ठॊ न कळणं असा दैवदुर्लभ योग माझ्या कुंडलीत असल्यानं मला बरयाचदा घरचं खाण्याची आठवण येते. दरवेळी भरलं ताट बघीतलं की मला अगदी गहीवरुनच येतं. केवळं जबरदस्त पुण्य असल्यानेच आपण भारतात, त्यातही महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत याची वारंवार खात्री पटते. अरे किती प्रकारच्या भाज्या, किती प्रकारचे मसाले, अगदी काही नाही तर साधं वरण- भात- तुप!! अगदी सोपी पाककॄती आहे त्याची. गुरगुट्या (म्हणजे मऊ शिजलेला)भात शिजवायचा, त्यात आळं करायचं आणि ही अशी चांगल्या तुपाची धार सोडायची आणि भाताच्या मुदीवर साध्या वरणानी सुंदर नक्षी काढायची. फिरंग्याना शेवट पर्यंत कळणार नाही की त्यांनी काय miss केलयं. काय ते एकेका भाजीचे transformation! आळूच फतफतं ते आळूची वडी!! वा!! क्या बात है! काय ते भाज्यांचे versions. वांग्याची भाजी- भरली वांगी- वांग्याचं भरीत-वांग्याचं बरच काही. बरं ही versions भाज्यांपुरतीच मर्यादीत नाहीत; कांद्याची भजी- दोन प्रकार (गोल आणि खेकडा भजी), बटाट्याची भजी, घोसावळ्याची भजी (हाय). कंबख्त, तुने भजी नही खायी तो क्या खाया?

कोलाज तुकडा ५: आमच्या घरी लहानपणी पपईचं झाडं होतं. अप्रतिम चवीची पपई कधी कधी सरळ सफरचंदाशी स्पर्धा करत गुरुत्वाकर्षणाचे नियम नव्याने पडताळत जमिनीवर झेपावायची. पच्चकन जमिनीवर पडलेल्या पपईचं काय करावं असं तुम्हाला वाटतं? आई त्याची पोळी करायची. पपईची पोळी!! नंतर विविध पराठे खाल्ले पण ती पोळी मस्तच...

कोलाज तुकडा ६: मराठी माणुस आणि पुरणपोळी खायाच नही? असं होऊ शकतं का? असं म्हणतात की आज्जी सारखी पुरणपोळी आईची कधीच होतं नसते. आज्जी असताना पुरणपोळी म्हणजे सुख होतं. पोटाला तडस लागे पर्यंत पुरणपोळी चापायची आणि बसल्या जागीच आडवे व्हायचं... राजेपण वेगळं काय असतं? ताटावरुन पाटावर...राजेपण आज्जी गेल्यावर ही कायम राहीलं ते सासुबाईंमुळे. तशीच पुरणपोळी!!

कोलाज तुकडा ७: पुणं हे खादाडांसाठी नदंनवन आहे आणि औरंगाबाद हा दुष्काळ. ईंजिनीरींगची चारही वर्ष अशीतशीच गेली. पुण्याबद्द्ल काय बोलावं? पुण्यातल्या कोणाचाही ब्लॉग काढला तर वैशाली, रुपाली, आम्रपाली अशा सुंदर सुकांतांचीच नावं आढळतात. मला पुर्ण डाऊट आहे की अस्सल पुणेकराच्या घरी रवीवारी चुल पेटतच नाही. आणि सुदैवाने मीही आता त्याच प्रकारात मोडतो.

कोलाज तुकडा ८: माझे रसिक खादाड मित्र आनंद आणि सागर सतत चांगल्या खाण्याच्या वासावर असतात. एक दिवस अचानक आनंदनी "तू नागपुरमधे खाल्लसं का?" असा गुगली टाकला. नागपुर आमच्या दोघांची सासुरवाडी असल्याने आणि तिथे संबंध उत्तम असल्याने मला प्रश्नाचा उद्देश कळाला नाही. शक्यतो सर्व सासवा आपल्या जावयांना तो या आधी कधीच जेवला नाही या गॄहीतकानुसार पोटफुटेस्तोर खाऊ घालतात. मग आनंदनी असं का विचारल या गोंधळात असतानाच त्याने नागपुर नावाचे एक हॉटेल पुण्यात आहे असं जाहीर केलं. माणसं प्रदेशाभिमानी असतात हे मान्यय, नागपुरकरांचा अभिमान जास्त तीव्र आहे हे ही मान्य आहे पण पुणेकरांच्या नाकातोंडातून जाळ काढणारं नागपुर नावाचं हॉटेल कुणी पुण्यात काढावं? आनंदच्या भाषेत सांगायचं तर ते हॉटेल बाथरुम एवढं लांब-रुंद आहे, तिथे भिंतीकडे तोंड करुन बाकावर बसून जेवाव लागतं आणि सर्वसाधारणपणे लोक तिथे जेवायची हिंमत करत नाहीत, पार्सल घेऊन जातात. आता बोला?

कोलाज ९: सुभाष अवचटनी स्टुडिओ नावाच्या पुस्तकात खाण्याच्या पारंपारीक पदार्थांचं अप्रतिम analysis केलयं.

कोलाज १०: खाणं ही पाककले इतकीच अवघड कला आहे. सर्व बल्लवांना फार वाईट वाटत असेल तर खाणं ही पाककलेला दिलेली दाद आहे असं ही म्हणू शकतो. चिन्यांबद्दल आपण सहज पणे म्हणतो की ते सर्व काही खातात. मी परवा त्यांचा एक नियम ऎकला "ज्याची पाठ आकाशाकडे आणि पोट जमिनीकडे ते सर्व काही आपण खाऊ शकतो."

Comments

Anonymous said…
mast lihilay. khoop aavadala.
Anand Sarolkar said…
Punyat la jevan tar mastach!!! Ani Aurangabad la ghar aslyamule nehmich changla jevayla milala :)
Pan ata ithe chennai madhe dosa idle khaun kantala ala ahe. Mala tar bhiti vatate ki me jar jast diwas ithe rahilo tar "Sabudana Khichdi" "Vada Pav" "Kande Pohe" "Shrikhand" "Puranpoli"
"Thalipeeth" "Pithali bhakari"...
(Jau de yaar...list khup mothi ahe)
he sarv padartha me visrun jain ek diwas.
अफाट सुरेख! मस्त. मजा आली.
पहिला तुकडा आणि दुसरा तुकडा वाचून लिंक लागेना. मग लागली आणि मग लागलीच!
नो नॉनव्हेज? तुझ्यासारखा खवय्या माणूस एन्जॉय करेल.
एकदम चविष्ट पोस्ट!
mad-z said…
संव्या. कधीतरी काहीतरी वेगळं लिही प्लीज. आरे मलाच कंटाळा आलाय आत्ता प्रत्येक वेळी "अप्रतीम" आणि "सुरेख" म्हणायचा. एकदा काहीतरी गचाळ असं लिही म्हणजे मला तोंड्सूख घेता येईल :).

सगळ्या पदार्थांची नावं वाचताना तोंडाला आलेलं पाणी आणखी झिरपायचंय. टप टप गळतंय. बाजूला बायकॊ फडका घेवूनंच बसलीय माझं तोंड पुसत. वाचून झालं आणि बर्याच दिवसात ऐकला नाही असा ढेकर आला बघ.

जरी सगळ्या खाद्यपदर्थांची नावं इथं घेणं शक्य नसलं तरी ही यादी सध्या अपुरी वाटते. आणि सगळ्यात आधी काय missing आहे तर ते म्हणजे चिकन आणि ठेचा-भाकरी. आणि दोन्हीही अगदी धाब्यावरचे. Actually ठेचा भाकर खावी तर गावकंडं रानात, तेही ऐन सुगीच्या दिवसात. हातावर भाकरीचा तुकडा घेवून वर ठेचा आणि गरम तेल ... अख्ख्या रानात चक्कर मारत हाताल येईल ते तोंडी लावत - मग ते एखादं ताजं गाजर असेल किंवा शेंगा. त्या रानातल्या गारव्यातल्या त्या "सुपरहॉट" खाण्याची सर कशालाच येत नाही.

औरंगाबादमधे जरी काही चांगलं चुंगलं खायला नाही मिळालं तरी काही मोजक्या जागा आमच्यासारख्या खान-बहाद्दर लोकांनी हेरल्याच. त्यातलाच एक फौजी धाबा. फ़र्स्टक्लास चिकन ते तिथंच मिळणार आणि आजकाल इथं अमेरीकेत बायकोच्या हातचं. नाकाला पाणी नाही आलं तर चिकन ते काय खाल्लंच नाही असं समजायचं. औरंगाबादची दुसरी जागा म्हणजे आपल्या कॉलेजचं कॅन्टीन. कॅन्टीन कसलं .. अड्डा होता तो आपला. कॉलेजची ४ वर्ष आणि त्यानंतरही काही काळ अगदी घरानंतर काही प्रिय असेल तर ते कॅन्टिन. त्याबद्दल तुला ते काय लिहायचं. अगदी ३-३ तास एकच कप चहा पिला तरी बिचारा अण्णा कांही म्हणत नसे. आणि म्हणेलही कसा. आपल्या सवयीमुळे त्याचा धंदापण कसा "भरभराटी"स आलेला. पण होटेल्सच्या बाबतीत औरंगाबाद सुधरलंय असं ऐकीवात आलंय. माझी देखील कितीतरी वर्षात चक्कर नाहीये तिकडं.

बाय द वे, तुझा कोलाज तुकडा ६ मधे जे तू म्हणतोस ना "मराठी माणुस आणि पुरणपोळी खायाच नही? असं होऊ शकतं का?" Well, आहे - आम्ही स्व. मला पुरणपोळी हा प्रकार कधीच आवडला नाही. एकदा सासूबाईंनी आग्रह करून पुरणपोळी वाढली आणि आम्ही declare करून टाकलं - "परत कधी सासरवाडीत परतणार नाही." बिचार्या सासूबाई, परत ज्या घेवून गेल्या पोळी .. आणि तेंव्हापासनं आजतोवर सासरी गेलं की पहिल्यादिवशी चिकन आणि दुसर्यादिवशी कोंबडी. सासरहून परत निघालंकी अख्खा रस्ताभर त्या कोंबडीची पीसं उडतान दिसतात. :)

Anyway, "खाण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात" हे अगदी बरोबर आहे. नाहीतरी प्रत्येक गोष्टीला काहीत्तरी कारण असतं असं म्हणतात. खाण्यासारखा जगमान्य प्रकार तर नक्कीच त्याला अपवाद नसावा.
Samved said…
Hey, thanks a ton for such mouth watering comments:)
VJ, तुझा arts वाला blog वाचला होता. आता मी लिस्टच करणार आहे काय काय वाचायच त्याची. तेंव्हा wait for it till I write seperately for you.
आनंद, मित्रा, माझी पुर्ण सहानुभुती:). तुझ्यासारख्या बाहेर असणारया अनेक मित्र, मैत्रिणींना डोक्यात ठेवूनच खुप पदार्थांची नाव लिहीली नाहीत. किती वाईट वाटत असेल हे मी समजु शकतो. यावर जरा risky उपाय आहे, लग्न करणे. मग खाण्याच्या बाबतीत "हे विश्वची माझे घर " होते की नाही बघ.
मेघना, non-veg नाही असं कसं वाटलं तुला? पण तो स्वतंत्र blog चा विषय आहे. उगाचच पुरणपोळीत हाडं मिसळून घासपुस खाणारया मंडळींची पंचायत कशाला करा म्हणून नाही लिहीलं
mad-z, लेका. तुझी comment कमी आणि वेगळा blog झाला आहे. मला विजु तुझ्या बाजुला बसून तोंड पुसतानाच दिसतेय. बाकी तुम्ही ते ही करु शकता म्हणा:). औरंगाबाद आणि hostel वर स्वतंत्र लिहू यार. इतके golden दिवस capture करायचे म्हणजे फुरसतीत लिहायला पाहीजे. काय? आणि पुरणपोळीचे तुझे किस्से मला माहीत आहेत. तेव्हड्या मिनीटांसाठी तुझी मराठी मंडाळातुन हकालपट्टी नक्की...
Aparna said…
Samved,
Atishay surekh blog!

Putu vishati alikadech dusaryanda vachle.. ekada Rarangdhang madhye Prabhakar Pendharkarankadun ani aata tuzyakadun!

Puranpoli kashi khavi hyavarahi kadhitari lihi.. Mala tupashi nahitar vatitalya dudhashi khatat asech mahit hote; mag babanni ekada patelyat saha polya dudhamadhe kagadachya lagadasarakhya kuskarun khallkya! Ani mi aajanma tupashich khain he tharavun takle! Ekada eka pangtit vadhtanna mala ek mahashay mala jara puranpolivar shrikhand vadhata ka?! ase vicharate zale! Mi hasu dable ani shrikhand vadhle khare, pan khare mhanaje mazya potat galabalale! Alikadech matoshrinni Aamba ghalun bhat ani aambashi puranpoli ase farmas updates pathvale! Anakhi kahi pangatitil anubhav!

BTW, mala marathit far chhan lihita yet nahi, pan changle marathi ani trasdayak marathi yatala farak kalato! He changle Ahe!

:)

Coffeephilic
Nandan said…
wa, wa. lekh chhan zaalay. aata non-veg vareel lekhachi utsukatene vaaT paahatoy.