पाऊस

सगळ्या आकाशवाण्यातून (आकाशातला वाणी नव्हे तर आकाशवाणीचं अनेकवचन)सुखरुपपणे पार पडत एकदाचा पाऊस आला. नेहमी प्रमाणे मुंबईला पुर आलाय, झोपड्या वाहून काही लोक मेलेत, निर्लज्जासारखे आपले नेते त्यासाठी कोण जबाबदार आहेत त्यांची जंत्री टीव्ही समोर वाचताहेत, पेपरवाले पिक्चरमधला पाऊस या नावाखाली कित्येक वर्षे राज-नर्गिस आणि टिपटिप बरसा पानी वाली रविना छापताहेत.

पण पाऊस काय हा एव्हढाच असतो? अरे हट्ट! ते वेडपट डबडं बंद करा आणि डोळे मिटा आणि शाळेत कधीतरी शिकलेली बालकवींची
"श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे" आठवा.

सोनलच्या मित्रानी लोणावळा फिरवला होता आम्हाला. तो तिथलाच त्यामुळे "नेहमीचंच सुप्रसिद्ध" टाळून त्यानी आम्हाला कुठेतरी दूर नेलं होतं, लोकांच्या पुरापासून लांब. खच्चून पसरलेलं मैदान, त्यावर सुखासीन लोळलेलं गवत, मधूनच झिरपणारा पाऊस, कधी डोळा चुकवून येणारं ऊन..असं वाटलं ठोमरेसाहेब इथेच कुठेतरी कोपरयात बसून श्रावणमासी लिहीत असतील. एका बाजूला कडेलोटासारखा डॅममधून ओतलं जाणारं पाणी आणि दुसरया बाजूला कवितेसारखं किंचित उलगडल्या सारखं वाटून-न-वाटल्यासाखं पावसाचं पाणी. निळ्या छत्रीवाल्याची करामत खरच अजीब आहे. पाऊस असा की कोणाच्या डोळ्यातलं पाणी विरघळून पण कुणाला कळूच नये.

सगळ्यात पहिल्यांदा ज्या कविता आपण शिकतो त्यात default "येरे येरे पावसा" असतेच. आजकाल जो प्रमाणाबाहेर पाऊस पडतोय त्याचं सारं खापर आमच्या-आपल्या पिढीवर. पावसाला इतके खोटे पैसे आपण चारले होते की "पाऊस आला मोठा" हे त्याचं resultant आज खरं होताना दिसतयं!! पावसाळ्याच्या अनेक तयारयांपैकी उन्हाळ्याचा सुट्टीत मुंबईहून येताना रेनकोट घेऊन येणे हा एक लहानपणीचा ठरलेला होता. केशवराजच्या आख्या इतिहासात रेनकोट घेऊन येणारा कदाचित मीच पहीला असेन. लातूरचा पाऊस तो काय..मिणमिणा..पण आख्ख माणूस भिजवला नाही तरी दप्तर भिजवण्याचं सामर्थ त्यात नक्कीच होतं. रेनकोटच्या आत दप्तर लपवून पळत पळत किंवा सायकलवर टांग मारुन घर गाठायचं आणि इतकं करुनही पुस्तक वह्या भिजल्यातर तव्यावर त्या "भाजायच्या"

लातूरच्या अशक्त पावसानंतर बरयाच वर्षांनी मुंबईत पावसांनी त्याचे "गट्स" दाखवले. फर्स्टक्लासचा पास काढून मी बोरीवलीला तिथूनच सुटणारी लोकल पकडून अंधेरीत उतरायचो आणि येताना अंधेरीहून बसनी यायचो. मी हाडाचा मुंबईकर नसल्याचा आणि उभ्या जन्मात कधी बनू शकणार नसल्याचा तो एक पुरावा होता. तर त्या दिवशी सकाळपासूनच पावसाची झड लागलेली. "अंधार असा घनभारी" कशाला म्हणतात ते प्रत्ययाला येत होते आणि मी ४ वाजता अंधेरीला पोचलो. रोजचा रस्ता म्हणजे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एक अजागळ पुल होता. रिक्षातून उतरल्यावर बरयाच वेळ लेदरचे बुट वाचवण्याचा प्रयत्न केला पण पाणीच जेव्हा गुढघ्या पर्यंत आलं तेव्हा सारा फोलपणा लक्षात आला. अजागळ पुलापाशी माणसांची झोंबी उडाली होती. एकमेकांचा हात धरुन लोक लगदा तुडवीत पुलापर्यंत पोचत होती. "हात का धरायचा?" मनातलं ऎकु आल्यासारखं एका खानदानी मुंबैकरानं आरोळी ठोकली "संभालके भाय...हात छुटा तो सिद्दा बांद्राके खाडीमे.." "च्यामायला...गटार thru' खाडी म्हटलं की पोहण्याचं कामच नाही" पोहता येत नाही त्याचा आज त्याचा अस्सा आनंद झाला!! पश्चिमेला पोचल्यावर लक्षात आलं की नेहमीप्रमाणेच लोकल बंद पडल्यामुळे रोडवर लोगोंका सागर उमड आया था. एकही बस थांबायला तयार नव्हती. असं वाटलं जुहुपर्यंत उलट जावं आणि तिथून त्याच बशीत बसून यावं. पण पावसाची झोंबाझोंबी बघून हिंमत झाली नाही. थोडं उलटं जाऊन पळतपळत एक बस पकडली. बस खचाखच भरली होती. कंडक्टरनं आरोळी ठोकली "दारात उभ्या असलेल्या लोकांनी बघून घ्यायचं की अजून कुणी चढत नाहीये नाहीतर बस बंद पडेल" ४० मिनीटांचा रस्ता त्या दिवशी ४ तासात "कटला". दुसरया दिवशी लोकांचे जागोजागी अडकलेल्या लोकांचे फोटो बघीतले आणि मलाच माझ्या धाडसाचं कौतुक वाटलं (अजून कुणाला कश्याला डोंबल्याला वाटेल?)

पावसाचे संदर्भ गुढ आणि कधी उदासही. सिग्नलवर भीक मारणारी छोटी मुलगी परवाच्या पावसात उघडी कुडकुडत होती. हिला पैसे द्यावे तर भिक मागण्याला उत्तेजन दिल्यासारखं होईल की कसं या टिपीकल मीडलक्लास डायलिमात असतानाच सिग्नल सुटला. हीटर लावून मी रॅट रेस मधे गाडी दामटली खरी पण त्या दिवशीचा पाऊस काही तरी उसवून गेला.

पावसाचे काही संदर्भ अबोलही.

सखीचे किनारे
असे पावसाळी
जसा बुध्द
डोळ्यातुनी हासला..

Comments

"पाऊस काही तरी उसवून गेला."
samarpak wisheshan sapadat nahi. 'zakas'war bhagawane bhag aahe.
Vidya Bhutkar said…
मी शाळेत असताना आम्हाला परकर-पोलके घालून जायला लागायचं, आणि त्यात माझा छोटा भाऊ आणि मी एकाच छत्रीत न भिजता जाण्याची पराकाष्ठा करायचो. दर पावसाळ्यात त्या दिवसाम्ची आठवण येते. :-)
पावसाळ्यात पुणे-सातारा प्रवास, सिंहगड किंवा काही अवघड ट्रेक्स(मराठी?),खडकवासल्याला कणीस खाणं किंवा नुसतंच गाडीवरून भिजत फिरणं हे ही रोमांचकारी.:-))
सुदैवाने मुंबईत राहूनही पावसात लोकल प्रवास करावा लागला नाही, निदान अडकून पडण्याइतका तरी नाही. :-) पण या वर्षीचीही भयानक चित्रे पाहून 'not again'... :-( असं वाटलं. असो, बाकी इथे पाऊस पडला की एकदम घरी आल्यासारखं वाटतं, कारण इथला उन्हाळा आणि थंडी दोन्ही आपल्यासारखे नाहीतच. :-)
कोहम said…
chaan lihilay....avadala....yauppar kay lihu? aaj ithe pan chaan paus padatoy.....nakkich paus kahitari usavoon jatoch..
Yogesh said…
सुंदर लिहिलंय. :)
mad-z said…
संव्या. सर्वांनी चांगलं लिहीलय असं म्हणून तारीफ केलीय. पण मला वाटतं जरा अधुरं आहे. एक तर तू जाम थकला असशील पण लिहायचंय म्हणून लिहीत असशील, नाहितर नक्की आतल्या खोलीतून आवाज आला असेल ... "बस कर". असं अर्धवट का लिहिलस? जमलं तर परत एकदा बसून पुर्ण कर.

बाकी लोणावळ्याची आठवण चांगली आहे. अगदी मागल्याच आठवड्यात मी त्या बद्दल लिहिणार होतो. पण असो. नंतर कधीतरी.
Anand Sarolkar said…
Paus toch asto pan pratyekala tyaccha ek veglach roop disat asta.

>>आकाशातला वाणी, पाऊस काही तरी उसवून गेला<<

Bhari statements ahet hi...
Anand Sarolkar said…
>>पाऊस काही तरी उसवून गेला<<

Paus toch asto pan pratyekala tyacha ek veglach roop dista.
Megha said…
nashib godavaru shala mulinchi hoti nahitar aai ne tula tyach shalet takala asta....aani mag tu pavasa var ya blog pekshahi horrible lihila asta....hi hi just kidding...chaan lihila aahes....te haat chuta to sidda bandra ke khadi me..aamacha pan asach vhayacha...direct shalepasun nighaala ki hanumaan chaok yayacha...btw...mahila mandal pan aavadala...