मोर

काळाला पीळ पाडला की अवकाशाचे संदर्भ पुर्णपणे बदलतात म्हणे. एकदा का अवकाशाची प्रतले वेगळी झाली की चेहरयावरची अनोळख देखील वैध ठरते. अवकाशाला माझ्यापुरता पीळ पडायला लागला की तुटून वेगळ्या झालेल्या अवकाशाबद्दल मला फारसं ममत्व नसतं. भुतकाळातुन हवी तेव्हढीच माणसं सोबत घ्यावित अन बाकीचे प्रसंग कॅलिडास्कोपमधली एक शक्यता म्हणून ठेवून द्यावित की झालं. अनोळखी कौतूक म्हणून मला भविष्यकाळ जास्त प्रिय. अर्थात लिहावं इतक्या सहजपणे पाय निघत नाही एका काळातून दुसरयात. इंजिनिअरिंगच्या सेन्डऑफला "एक राह रुक गयी तो और जुड गयी" या ओळी म्हणून झाल्यावर मैत्रिणीच्या दुखावलेल्या नजरेला नजर न देताच कसंबसं गाणं पुर्ण केलं तो क्षण किंवा "वुई आर अ टीम. तुम मुझे छोडके जा ही नही सकते" असं म्हणणारया मल्याळी बॉसच्या हातात राजिनाम्याचं थंड पत्र ठेवताना एका अदृष्य भिंतीवर शेवटची वीट चढवल्यागत वाटलं तो क्षण असे काही सन्माननिय अपवाद. अन्यथा काळ बदलाच्या शेवटच्या टप्प्यात बरयाच अंशी अस्तित्व नव्या शक्यतांना पडताळुन पाहाण्यातच जास्त गुंग असतं.

मुळ मुद्याची शब्दांच्या वजनावर गर्दन न उतरवता, लेट्स कम टू पॉईन्ट.
पुन्हा नव्या शक्यता पडताळुन पाहाण्याचे दिवस आले. नव्या नौकरीची नवलाई अजून सरली नाहीए तोवर हे अवतरण.


माहेराहुन येतो मोर
नाचवित कोर
दिठीभर रंग

उजळते अंग
तरी निःसंग
कवड्यांची कंठी माळ

पिवळसर फुलबावडी डुल
रुते बाभुळ
काट्यांना टोके दोन

दिशांचे मुळ
तीळाचे कुळ
पायात शोधतो मोर

Comments

Anand Sarolkar said…
juna sodun navin ghena nehmich avaghad pan titkach havhavasa vatnara.

btw your last 3 posts are dated:
January 28
December 28
November 28...Coincidence?
Samved said…
What an observation Anand! a pure coincidence. I noted it when you pointed out
Anonymous said…
एका दमात वाचून काढलं तर डोकं भंजाळून गेलंय नुसतं. विचार करायला वेळ पाहिजे. ’वाचलं’ एवढंच म्हणते आत्ता. मोठी खरी कमेंट द्यायला वेळ लागेल, पण घाई तरी काय आहे?
a Sane man said…
अवकाश‍-काळाला पीळ पडतात तेव्हा अर्थातच सगळं सापेक्षच असतं. का निरपेक्ष असं काही नसतंच म्हणून पीळ देऊन तोडावं लागतं? नि सगळंच सापेक्ष असलं तर तुटणं...तेही सापेक्षच?

काट्याचं दुसरं टोक जीवघेणं बोचलं. पण शेवटचं कडवं काही नीटसं नाही कळलं. कुठलाच पाय न ठरणारा मोराचा थयथयाट की तळ्यात मळ्यात करणारा आपलाच पाय, की दोन्ही, का काही भलतंच?
Samved said…
सापेक्ष ते निरपेक्ष असाच तर प्रवास असतो.

असं म्हणतात की पायावर तीळ असला की पायाला भिंगरी लागते, माणूस फिरतच राहातो...
Anonymous said…
Hi, this weekend is pleasant for me, as this time i am reading this fantastic informative article here at
my residence.