रावणाप्पा

वेगळ्याच संदर्भात मला आज जुनी कविता आठवते

"स्विकाराचा वा नकाराचा पर्याय नसावा
तशी गुणसुत्रातुन आपसुक वाहात आलेली नाती.. "

किंवा असचं काहीसं लिहीलेलं कधी काळी.

मला लख्खकन रावणाप्पा आठवतो. नावात काही नसतं पण ओळखी दडवल्या की खपलीखालच्या काही जुन्या जखमा बिनचेहरयाच्या वाटु शकतात म्हणून ही धडपड. एक शक्यता, दुसरं काय? रावणाप्पाच्या गोष्टीला कन्फेशन म्हणुया? पाप कबुल करण्याला कन्फेशन म्हणतात. वास्तवमांडणीच्या अनुभुतीला काय म्हणतात? प्रश्नचिन्हांखालची टिंबे पुर्णविरामात बदलण्याआधी मला ही गोष्ट सांगायलाच हवी.

"रावणाप्पा, पाणी आणता का हो पटकन? पुजा खोळंबली आहे" वहिनींची हाक इतकी खणखणीत होती की त्या चौसपी वाड्यात किती तरी वेळ तो आवाज घुमत राहीला. मोठं शुन्य. सामंत पुजा सोडून तरातरा चालत निघाले. वाड्याच्या दहा-बारा खोल्या ओलांडुन येताना त्यांचा संताप वाढतच चालला होता. डोक्यावरचं माळवद करकरलं तसं छताचं तेलपाणी राहीलेलं आठवुन त्यांच्या संतापाचा पारा फुटण्याच्या बेतात आला. रावण कुठे असेल हे त्यांना नक्की माहित होतं. ते पडवीत आले तसा आडापाशी पाणी शेंदण्याच्या बादलीत काही तरी करताना पाठमोरा रावण त्यांना दिसला. हातातली चंदन उगाळण्याची सहाण दुसरया क्षणी रावणाच्या पाठीत बसली. त्या धक्क्याने रावणाच्या हातातले कासव धाडकन आडात पडले. रावणाला वाटले पुन्हा एकदा त्याची आईच त्या आडात पडली. माणसासारखी कासवं पाण्यात बुडून मरत नाहीत हे माहीत असुनही रावणाचा जीव कासावीस झाला.

असो. आता तुम्ही विचारल, सामंत कोण? मी कोण आणि कोण तो रावण? सामंत म्हणजे गावातील देशपांडे आणि रावण म्हणजे त्यांचा क्रमांक ५ किंवा ६ चा लहान भाऊ. रावणाचा नंबर फारसा महत्वाचा नाही जसा की आख्खा रावण. रावणाचं गाव महाराष्ट्र-आंध्र सीमेवर असल्यानं नावाचं फारसं कौतुक वगैरे नाही. सामंताची अवस्था सुंभ जळाला तरी..अशी होती. वडील गेल्यानंतर त्यांनी सारया भावांना सांभाळलं आणि कामं धंद्याला लावून दिलं होतं. रावण म्हणजे शेंडेफळ, आईवेगळा आणि शिक्षणात यथातथाच. त्यामुळे सामंतांच्या घरात हक्काचा नौकर झालेला. सामंतांचं घर आमच्या शेजारीच आणि रावण आमच्याहुन दोन चार वर्षं मोठा म्हणून आम्ही त्याला रावणाप्पा म्हणायचो झालं. आम्ही रावणाप्पा म्हणायचो म्हणून हळुहळु सारेच त्याला रावणाप्पा म्हणू लागले. त्याच्या आयुष्यातला तो बहुदा एकमेव सन्मान असावा.

काहीही केलं नाही म्हणून कुणासाठी वेळ थांबत नसतो. सामंतांनी रावणाप्पाचं एक गरीब पण नर्स म्हणून काम करणारया मुलीशी लग्न लावून दिलं. पोरगी चटपटीत होती, लग्नानंतर काहीच महिन्यात तिनं वेगळं घर भाड्याने घेतलं. कलणारया घरातल्या सावल्या जरा कमी झाल्या तसं सामंतांनी हुश्श केलं. सामंत वहिनींचा मात्र हातच मोडल्यागत झालं, काही दिवस. चुलीला घासलेलं मांजर कुठूनही घरी येतं तसा रावणाप्पा बायको दवाखान्यात गेली की परत वहिनींच्या दिमतीला येऊन बसु लागला. रावणाप्पाच्या बायकोने विविध प्रकारे त्याला कामाला लावायचे प्रयत्न केले पण घरबसव्या रावणाप्पाला कशाचच काही नव्हतं. भरीतभर म्हणून आता त्याला मुलगा हवा होता, वंशाचा दिवा म्हणून. "व्यायला काय? कुत्री मांजरपणं वितात. तुला काय धाड भरलीय?" रावणाप्पाचा मर्दपणा सीमापार झाला तसं त्या बिचारीनं मान तुकवली. बाईचं राबणं दिसत नसतं पण चांदणं पडतं म्हणे तिच्या गर्भार डोळ्यातुन. रावणाप्पा एका मुलाचा बाप झाला.

काही दिवस किंवा महिने समजु, गेले असतील. रावणाप्पा आजारी आजारीच असायचा. त्याच्या बायकोने सरकारी दवाखान्यात त्याला भरती केलं. केवड्याच्या पानासारखं पिवळं धम्म त्याचं शरीर पाहूनच डॉक्टरांनी कावीळीचं निदान केलं. रावणाप्पाच्या बायकोने तिला जमतिल आणि परवडतील तेव्हढे उपचार सुरु ठेवले. परिस्थिती खालावली तसं तिनं सामंतांना साकडं घातलं. रावणाप्पाला मोठ्या दवाखान्यात न्यायला हवं होतं. सामंतांची मुलगी त्याच वर्षी उजवली गेली होती. तंग हात अधिकच आखडला होता. सामंतांनी घरगुती वैद्यांचे उपचार सुरु केले. रावणाप्पाच्या पेंगुळलेल्या डोळ्यांत दिवसाही स्वप्नांनी हैदोस घालायला सुरुवात केली.

सामंतांच्या घरातील पडवी. पडवीतला शेवाळलेल्या काठांचा आड. आडातलं सदोदित काळं पाणी. रावणाप्पाचं स्वप्न रोज इथेच संपायचं. हळुहळु आडात आडवं पडलेलं कासव डोळ्यात तरळायला लागलं, त्याचं पांढरं शुभ्र पोट आणि त्यावर उमटलेली लाल फिकुटशी रेघ. काळ्या पाण्यात उमटलेले तरंग विरण्याच्या आत लाल रेघा काळ्या वर्तुळांभोवती फेर धरायच्या आणि तरंगांचे परीघ वाढतच जायचे. त्या दिवशी अघटित घडलं. स्वप्नातल्या कासवाची आई झाली. रावणाप्पा हलला. किती दिवस झाले होते त्याला आईला भेटून, तिच्या कुशीत दडून. त्याने हलकेच तिच्या बर्फगार खांद्यावर डोक ठेवलं आणि डोळे मिटले.

रावणाप्पाच्या जाण्यानंतरही त्याची बायको एकटीच राहायची. उगाच प्रवाद नकोत म्हणून सामंतांनी तिला घरी आणलं. रावणाप्पा गेला तेव्हा तिला दुसरयांदा दिवस होते. रावणाप्पा आजारी असल्यापासुनच तिच्या बद्दल गावात अफवा होत्या. अफवांनी सामंतांच्या घराचे दरवाजे ठोठावले तसं सामंतांनी रावणाप्पाच्या बायकोला घराबाहेर काढली. कसल्या साक्षी-कसले पुरावे. ऎन गर्भारपणात रावणाप्पाची बायको घराबाहेर पडली. घर सोडताना तिच्या डोळ्यात विश्वासघाताच्या खुणा ताज्याच होत्या.

काही वर्षं गेली आणि रावणाप्पाच्या बायकोचं गावातलं अस्तित्व नितळपणे पुसलं गेलं. काळाचे सुड मोठे विचित्र असतात. काहीच दिवसांनी सामंतांची मुलगी आणि तिचा काही वर्षांचा मुलगा घर सोडून सामंतांकडे कायमचे राहायला आले. गणितातल्या हिशोबांनी बेरीज-वजाबाक्या करुन सामंतांच्या घरात उत्तर तेच राहीलं फक्त मतितार्थ बदलले. सामंतांचा वाडा खचतच राहीला.

रावणाप्पासाठी रिल्केचे हे अवतरण

why is that I am always neighbor
to those lost ones who are forced to sing
and to say; Life is infinitely heavier
than the heaviness of all things

Comments

या 'व्हाय'ला उत्तर नाही. अप्रतिम.
Anonymous said…
काळाचे सुड मोठे विचित्र असतात...गणितातल्या हिशोबांनी बेरीज-वजाबाक्या करुन सामंतांच्या घरात उत्तर तेच राहीलं फक्त मतितार्थ बदलले
ekadam zakasa lekha.. aavadala..
aniruddha
Megha said…
shevatacha avataran khasach!! but somehow mala kuthetari kunashi tari sadharmya vatata aahe....u know what i mean??
a Sane man said…
अप्रतिम !
खो दिला आहे तुला. लिही लवकर.
Raj said…
सुंदर. 'गुणसुत्रातुन आपसुक वाहात आलेली नाती.'' आवडले.